चालू घडामोडी - १५ एप्रिल २०१५


    Narendra modi visits Germany
  • नरेंद्र मोदी यांच्या जर्मनी दौऱ्याची वैशिष्ट्ये :
  • हॅनोव्हर येथे व्यापार मेळ्याचे उद्‌घाटन 
  • जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांची भेट
  • भारतात गुंतवणूक करण्याचे जर्मन कंपन्यांना आवाहन 
  • बर्लिन येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान अकादमीला भेट
  • जर्मनीतील उद्योजकांशी बैठक 
  • ‘मेक इन इंडिया’चा जोरदार प्रचार

  • ‘सेव्ह द इंटरनेट’ मोहिमेतून अनेकांनी ‘नेट न्युट्रॅलिटी’वर आक्षेप नोंदविल्यानंतर फ्लिपकार्टने ‘एअरटेल झीरो’शी सुरू असलेली चर्चा संपुष्टात आणत यातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. 
  • भारती एअरटेलने ‘नेट न्युट्रॅलिटी’ संकल्पनेची पाठराखण करताना हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असून, याद्वारे कोणताही भेदभाव न करता इंटरनेट देण्याचा आपला मानस असल्याचे म्हटले आहे. 
  • अनेक यूजर्सनी ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘एअरटेल’चा हा प्रयोग ‘नेट न्युट्रॅलिटी’ला घातक असल्याने मोबाईलवरून ‘फ्लिपकार्ट’ ऍप काढून टाकत याचा निषेध नोंदविला होता. यानंतर ‘फ्लिपकार्ट’नेही ‘नेट न्युट्रॅलिटी’ची बाजू घेत प्रस्तावित चर्चेतून पाऊल मागे घेतले. 
  • एअरटेलने मात्र आपल्या ‘एअरटेल झीरो’ या ‘टोल फ्री डेटा प्लॅटफॉर्म’बाबत काही गैरसमज असल्याचे म्हटले आहे. त्यात दराबाबतचा कोणताही प्रस्ताव नसून, तो सर्वांसाठी खुला मार्केटिंग प्लॅटफॉर्म असल्याचे या कंपनीने म्हटले आहे.

  • थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंबंधीची कागदपत्रे खुली करण्याची मागणी करत संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी बोस यांच्या कुटुंबियांनी कोलकाता येथे रॅलीचे आयोजन केले होते. 
  • जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याकडे नेताजींचे पणतू सूर्य कुमार बोस यांनी नेताजींच्या संबंधातील सर्व कागदपत्रे खुली करण्याची मागणी केली आहे. 
  • नेताजींच्या कुटुंबियांवर सलग वीस वर्षे पाळत ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर कुटुंबियांनी ही मागणी केली आहे. 
  • नेताजींच्या संदर्भातील १५० पेक्षा अधिक कागदपत्रे खुली करण्याची मागणी केंद्रासह पश्चिम बंगाल सरकारकडे करण्यात आली. 
  • कोलकताच्या मध्यवर्तीभागातून तीन किलोमीटरपर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान कागदपत्रे खुली करण्याची मागणी करणारे पत्रके लोकांना वितरित करण्यात आली.

  • अमेरिकेच्या ‘टाइम’ या नियतकालिकाने ऑनलाइन मतचाचणी घेतल्यानंतर जाहीर केलेल्या जगभरातील १०० प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्थान मिळविले आहे. 
  • ‘टाइम’च्या या यादीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पहिले स्थान मिळविले आहे. त्यांना ६.९५ टक्के एवढी मते मिळाली. पॉपस्टार लेडी गागा (२.६ टक्के), रेहाना (१.९ टक्के) व टेलर स्विफ्ट (१.८ टक्के) यांनी पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे. 
  • नरेंद्र मोदी (०.६ टक्के) तर अरविंद केजरीवाल (०.५ टक्के) यांना एवढी मते मिळाली आहेत.
  • ऑनलाइन चाचणीमध्ये राजकीय, मनोरंजन, व्यावसायिक, टेक्नॉलॉजी, विज्ञान, धार्मिक व अन्य क्षेत्रांतील मान्यवरांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला होता.

  • ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधि’ने ‘ई-पासबुक’ सेवा सुरु केली असून, ज्यामुळे आता भविष्य निर्वाह निधी सदस्य लॉग इन करून आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्याची माहिती मिळवू शकतील.
  • भविष्य निर्वाह निधि कर्मचारी (सदस्य) आपल्या ‘पीएफ’ संबंधित खात्याची संपूर्ण माहिती http://members.epfoservices.in/  या संकेतस्थळावर (साइट) लॉग इन करून घेऊ शकतो. 
  • या सुविधेमुळे पीएफ खातेधारक आपल्या खात्यात पैसे/योगदान जमा करण्यात आले आहे वा नाही हे तपासू शकतो. शिवाय पीएफ खात्यातील चालू रक्कम देखील जाणून घेऊ शकणार आहे. 
  • या संकेतस्थळाची देखरेख केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांच्याकडे असणार आहे.

  • कॉंग्रेसच्या आमदार रुमि नाथ यांना पोलिसांनी विधानसभा वसतिगृहाच्या परिसरातून अटक केली. 
  • कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा म्होरक्या अनिल चौहान याच्याशी संपर्क ठेवणे आणि विधानसभेत येण्यासाठी त्याच्या गाडीला येण्यास परवाना दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
  • याप्रकरणी अनिल चौहान याला गेल्याच आठवड्यात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चौहानची १७ बॅंक खातीदेखील गोठविली आहेत. 
  • रुमि यांचे दुसरे पती जॅकी झाकिर यांनाही याप्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली आहे.

  • गीर अभयारण्यातील बेकायदा हॉटेलवर गुजरात उच्च न्यायालयाने कारवाईचा हातोडा उगारला असून, यामुळे जंगल परिसरातील ताज समूहाचे ‘गेट-वे गीर फॉरेस्ट’ हे प्रसिद्ध हॉटेल बंद होणार आहे. 
  • याच भागातील अन्य बेकायदा हॉटेलचे भवितव्यदेखील टांगणीला लागले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ताज हॉटेलला कुलूप ठोका, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने वन अधिकाऱ्यांना दिले आहेत.

  • शिक्षणात अग्रेसर म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची अवस्था किती विदारक आहे, याचा पुरावा सरकारनेच आपल्या जिल्हा शिक्षण माहिती प्रणालीच्या (डायस) यंदाच्या अहवालात दिला आहे. 
  • ६४ हजार ३६३ शाळांत नियमित मुख्याध्यापक नाहीत. १६३ शाळांत शिक्षक नाहीत. ४३७ शाळांना वर्गखोल्याच नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे. शिक्षक नसलेल्या सर्वाधिक ३२ शाळा रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.
  • राज्यातील तब्बल ६ हजार ४६७ शाळांत विजेची जोडणीच नाही, असेही हा अहवाल सांगतो. अशा सर्वाधिक शाळा बीड जिल्ह्यात आहेत. नांदेड, जालना, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर व गडचिरोली जिल्ह्यातील शाळांत अद्याप वीजजोडणी मिळालेली नाही.
  • दरवर्षी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी विनाअनुदानित अशा सर्व शाळांचा आढावा घेण्यात येतो. 
  • शाळांनी शिक्षण हक्क कायद्याचे निकष पूर्ण केलेत की नाहीत, शाळांत कोणत्या सोईसुविधा आहेत किंवा नाहीत याची माहिती संकलित करण्यात येते. यंदाचा अहवाल नुकताच जारी झाला आहे.

  • कोलकाता येथील राज्य सरकार संचलित कलकत्ता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बसचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी ६३२ बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 
  • जवाहलाल नेहरू राष्ट्रीय शहर पुनर्विकास मोहिमेच्या विस्तारित प्रकल्पाअंतर्गत हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक बसमध्ये तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातील पहिली स्मार्ट सिटी उभारण्याचे काम गुजरातमधील साबरमती नदीकाठी गांधीनगरमध्ये उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
  • गांधीनगरमध्ये उभारण्यात येणाऱ्या या स्मार्ट सिटीला ‘गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी’ असे संबोधण्यात येणार आहे. 
  • इ.स.२०५० पर्यंत नागरी लोकसंख्या ही ८१ कोटींपेक्षा अधिक असणार आहे. चीननंतर सर्वात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेला भारत हा दुसरा देश ठरणार आहे. वाढत्या नागरीकरणाच्या गरजा भागविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २०२२ पर्यंत १०० स्मार्ट सिटी उभारण्याचे आश्वासन दिले आहे.

  • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी १ लाख १२ हजार ९५३ मतांनी विजय मिळविला आहे. 

  • वांद्रे पूर्व मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी जवळपास १९ हजार मतांनी नारायण राणे यांचा पराभव केला. तर, एमआयएम हा पक्ष तिसऱ्या स्थानावर राहिला. एमआयएमचे उमेदवार राजा रेहबर खान यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
  • अंतिम निकाल : तृप्ती सावंत (शिवसेना) - ५२७११ मते | नारायण राणे (काँग्रेस) - ३३७०३ मते | राजा रेहबर खान (एमआयएम) - १५०५० मते |

    Nokia buy Alcatel-Lucent
  • भारतात मोबाईल क्षेत्रात आघाडीवर असलेली नोकिया कंपनी लवकरच फ्रेंच दूरसंचार कंपनी ‘अल्काटेल-ल्यूसेंट’ची खरेदी करणार आहे. या कंपनीच्या खरेदी करारावर नोकियाने शिक्कामोर्तब केले आहे. 
  • सर्व व्यवहार १५.६ अब्ज युरोला ( सुमारे १६.५ अब्ज डॉलर) करण्यात येणार आहे.

    Inflation
  • घाऊक महागाई निर्देशांकात (डब्ल्यूपीआय) मार्चमध्ये लक्षणीय घट झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांक अपेक्षेपेक्षा जास्त चांगला आल्याने, घाऊक महागाई निर्देशांक पुन्हा शून्याखाली येत मार्चमध्ये -२.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे. 
  • फेब्रुवारीमध्ये डब्ल्यूपीआय -२.०६ टक्क्यांवर पोहोचला होता. घाऊक महागाई निर्देशांक जानेवारीमध्ये ०.३९ टक्के होता, तर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये (२०१४) घाऊक किंमत निर्देशांक ‘शून्यावर’ पोहोचला होता. 
  • जून २००९ नंतर जानेवारी महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक सर्वांत कमी झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा