चालू घडामोडी : १० जानेवारी


जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट

  • पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला सरकार स्थापनेत विलंब झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी जम्मू-काश्मीरच्या घटनेच्या कलम ९२ अन्वये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केल्याची घोषणा केली. ती ८ जानेवारीपासून अमलात आली आहे.
  • गव्हर्नर एन.एन. व्होरा यांनी दोन्ही पक्षांना (पीडीपी व भाजप) पत्र लिहून सरकारस्थापन करण्याबाबत स्थिती स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
  • जम्मू काश्मीरमध्ये एकाच वर्षात दुसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी २०१५मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपाल राष्ट्रपती लागू झाली होती.
  • राज्यात मार्च १९७७ मध्ये पहिल्यांदा ही राजवट लागू झाल्यानंतर राष्ट्रपती राजवट येण्याची ही सातवी वेळ आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभेची सद्यस्थिती
पक्षसदस्य
पीडीपी२८
भाजप२५
नॅशनल कॉन्फरन्स१५
काँग्रेस१२
जेकेपीसी
सीपीएम
अपक्ष
बहुमतासाठी ४४ आमदार आवश्यक

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी झालेल्या करारानुसार १९७५ साली नॅशनल कॉन्फरन्सचे शेख अब्दुल्ला सत्तेवर आले होते. सईद यांच्या नेतृत्वातील प्रदेश काँग्रेसने अब्दुल्ला यांच्या या अल्पमतातील सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे २६ मार्च १९७७ रोजी राज्यात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ती १०५ दिवस चालली.

महाराष्ट्र केसरी २०१६ : विजय चौधरी

  • महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम आणि चित्त थरार लढतीत जळगावच्या विजय चौधरीने मुंबईच्या विक्रांत जाधवला धोबीपछाड देत सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढत पाहण्यासाठी उपस्थित होते.
  • या चुरशीच्या लढतीत वि़जय चौधरीने चपळाईचे प्रदर्शन करत विक्रांत जाधवला ६-३ अशा फरकाने चीत केले आणि सलग दोन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ होणारा तो सहावा पैलवान ठराला आहे.
  • या कामगिरीबद्दल विजय चौधरीला चांदीची गदा व या स्पर्धेत प्रथमच देण्यात येणारे १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर उपविजेत्या ठरलेल्या विक्रांतला ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
  • या आधी झालेल्या मॅट गटात मुंबईच्या विक्रांत जाधवने तर माती गटात जळगावच्या विजय चौधरीने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला होता.

 ‘अर्जुन’साठी ताकदवान तोफगोळे तयार

  • भारताचा सर्वाधिक शक्तिशाली रणगाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जुनसाठी तितकेच ताकदवान तोफगोळे तयार करण्यात आले असून, १० जानेवारी रोजी ओडिशातील चांदीपूर येथे त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • पुण्यातील ‘डीआरडीओ’च्या लॅबोरेटरीज आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट आणि हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च या संस्थांनी हा दारूगोळा तयार केला आहे.
  • लष्कराचे अधिकारीदेखील या दारूगोळ्याच्या चाचण्यांमध्ये सहभागी झाले होते. दारूगोळ्याचे भारतातच मूल्यमापन करण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे अर्जुनचे बळ कित्येक पटीने वाढणार आहे.

नव्या राज्यघटनेसाठी श्रीलंकेमध्ये प्रक्रिया सुरू

  • देशासाठी नवी राज्यघटना तयार करण्याच्या प्रक्रियेला श्रीलंकेच्या संसदेमध्ये सुरवात झाली असून सर्व सदस्यांचे मिळून घटना मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी संसदेमध्ये सादर केला. 
  • घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी सर्व सदस्यांचा सहभाग आवश्यक असून, त्यावर नियंत्रण आणि समन्वय ठेवण्यासाठी १७ सदस्यांची नियुक्ती करावी, असे विक्रमसिंघे यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.
  • अध्यक्षांना सर्वोच्च अधिकार असलेली १९७८ मध्ये स्वीकृत केलेल्या राज्यघटनेऐवजी नवी राज्यघटना अस्तित्वात आणली जाणार आहे. घटना मंडळातील सदस्य नव्या राज्यघटनेचा मसुदा तयार करून त्यावर चर्चा करतील, तसेच नागरिकांकडूनही प्रतिक्रिया मागवतील. 
  • नव्या युगाच्या मागण्या लक्षात घेता नवी राज्यघटना तयार करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सीरिसेना यांनी नागरिकांना केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा