चालू घडामोडी : २६ सप्टेंबर

इस्त्रोद्वारे एकाचवेळी ८ उपग्रहांचे प्रक्षेपण

  • इस्त्रोच्या पीएसएलव्ही सी ३५ या प्रक्षेपकाने आठ उपग्रहांसह श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात झेप घेतली.
  • एकूण आठ उपग्रहांमध्ये तीन भारताचे, तीन अल्जेरियाचे, कॅनडा आणि अमेरिकेचा प्रत्येकी एक उपग्रह आहे.
  • २ तास १५ मिनिटाच्या या मिशनमध्ये प्रथमच पीएसएलव्ही-सी३५ दोन वेगवेगळया कक्षांमध्ये हे आठ उपग्रह प्रस्थापित करणार आहे.
 प्रक्षेपित करण्यात आलेले उपग्रह 
  • कॅनडाचा उपग्रह: एनएलएस १९
  • अमेरिकेचा उपग्रह: पाथफाईंडर १
  • अल्जेरियाचे उपग्रह: अल्सेट १बी (१०३ किलो, पृथ्वी निरीक्षण उपग्रह), अल्सेट २बी (११७ किलो, रिमोट सेन्सिंग उपग्रह) आणि अल्सेट १एन (७ किलो, तंत्रज्ञान निदर्शन उपग्रह)
भारताचे उपग्रह
  • पायसॅट (PISAT): बेंगळुरुच्या पीएसई महाविद्यालयाचा रिमोट सेन्सिंग उपग्रह 
  • स्कॅटसॅट १: या उपग्रहाचे वजन ३७१ किलोग्रॅम असेल. या उपग्रहांमुळे  सागरी तसेच हवामानसंबंधीच्या अभ्यासात मदत होणार आहे.
  • ‘स्कॅटसॅट-१’कडून हवामानाबरोबर वादळ आणि त्याच्या स्थितीची पूर्वसूचना मिळणार आहे.
  • उड्डाणानंतर १७ मिनिटांनी पीएसएलव्ही-सी ३५ने  ‘स्कॅटसॅट-१’ या भारताच्या अत्याधुनिक उपग्रहाला अवकाश कक्षेत प्रस्थापित केले.
  • प्रथम: मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या उपग्रहाचे वजन १० किलो असून इस्रोच्या स्कॅटसॅट उपग्रहाला तो मदत करणार आहे.
  • प्रथम या उपग्रहामुळे विद्यूत परमाणू मोजता येणार असून त्यामुळे जीपीएस प्रणाली आणखी सक्षम होण्यास मदत होणार आहे.
  • आयआयटी मुंबईच्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या दोन विद्यार्थ्यांनी 'प्रथम' विकसित केला आहे.
  • विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान संशोधनात रस निर्माण व्हावा या उद्देशाने ‘इस्रो’ने विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली होती.
  • अंतराळात झेपावलेला ‘प्रथम’हा सातवा विद्यार्थी उपग्रह असून, त्याच्या निर्मितीसाठी दीड कोटी रुपये खर्च आला आहे.

५००व्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय

  • भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक ५००व्या कसोटी क्रिकेट सामन्यात १९७ धावांनी विजय मिळवत, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे.
  • भारताच्या या विजयाचे फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा शिल्पकार ठरले.
  • भारताने दिलेल्या ४३४ धावांच्या आव्हानापुढे न्यूझीलंडचा दुसरा डाव २३६ धावांत संपुष्टात आला. भारताचा हा १३०वा कसोटी विजय ठरला.
  • अश्विनने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ६ बळी घेतले. यामुळे त्याने पुन्हा एकदा दोन्ही डावात दहा बळी मिळविण्याची कामगिरी केली. 
  • अर्धशतकी खेळी आणि सामन्यात ६ विकेट्स मिळविलेला रवींद्र जडेजा सामनावीराचा मानकरी ठरला.
  • भारतीय संघाची ही ५००वी कसोटी कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळली गेली.

भारतीय बॉक्सिंग महासंघ स्थापन

  • २६ सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय बॉक्सिंग महासंघाची (बीएफआय) स्थापना करण्यात आली आहे.
  • ‘स्पाइस जेट’चे कार्याध्यक्ष व व्यवस्थापक अजय सिंह यांची बीएफआयच्या अध्यक्षपदी तर जय कवळी यांची सरचिटणीसपदी निवड झाली.
  • ही निवडणूक योग्य रीतीने पार पडल्याचे प्रशस्तीपत्र आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे (एआयबीए) उपाध्यक्ष एडगर टॅनर यांनी दिले.
  • यामुळे आता भारतीय बॉक्सिंगपटूंचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचे दरवाजे उघडले आहेत. तसेच राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाचा मार्गही मोकळा झाला आहे.
  • बॉक्सिंग इंडियाच्या बांधणीत घाईघाईत चुका राहिल्या होत्या आणि त्यामुळे ती संघटना कोलमडली.
  • बॉक्सिंग इंडियाच्या वेळी झालेल्या चुका यंदा सुधारण्यात आल्या आहेत. ही बॉक्सिंग इंडियाची सुधारित आवृत्ती आहे.
  • भारतीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना करताना एआयबीए, केंद्र सरकार यांच्या नियमांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यानुसार ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.

पुण्यात मराठा क्रांती मोर्चा

  • कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावे, अशा विविध मागण्यांसाठी २५ सप्टेंबर रोजी पुण्यात मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला.
  • युवती आणि महिलांनी केलेले मोर्चाचे नेतृत्व, हे या मराठा मोर्चाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. 
  • कोणतीही गडबड नाही, गोंधळ नाही असे वातावरण होते. नागरिक स्वयंप्ररणेने आणि स्वयंशिस्तीने आपापल्यापरीने मोर्चात सहभागी झाले होते.
  • लाखो लोक असूनही पोलिस यंत्रणेवर कोणताही ताण जाणवत नव्हता. पोलिसांनीही अत्यंत चोख नियोजन केले होते.
  • वाहतूक व्यवस्था आणि मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. 
  • कोपर्डीतील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा, मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळावे आदी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.
  • डेक्कन जिमखाना गरवारे पुलावरील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पाच युवतींनी पुष्पहार अर्पण केल्यावर सकाळी साडेदहाच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली.
  • सुरवातीला काही अपंग व्यक्ती, पाठोपाठ युवती, महिला, डॉक्टर, वकील अशा क्रमाने मोर्चाची लांबी उत्तरोत्तर वाढत गेली.
  • लक्ष्मी रस्ता, आंबेडकर रस्ता मार्गे मोर्चा दुपारी एकच्या सुमारास पुणे स्टेशनजवळील विधानभवन चौकात पोचला.
  • तेथे पाच युवतींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर सामूहिकरित्या राष्ट्रगीत झाल्यावर मोर्चा संपला.
  • मराठा समाजातील सर्वसामान्यांबरोबरच सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.
  • या शिवाय समाजकारण, उद्योग, व्यापार, साहित्य, कला संस्कृती, क्रीडा आदी क्षेत्रातील मराठा समाजबांधव मोर्चात आघाडीवर होते.
  • मोर्चाच्या नियोजनात युवतींचा पुढाकार आणि त्यांना मिळालेली युवकांची साथ, यामुळे शिस्तीचे पालन होण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट सार्थकी लागल्याचे दिसून आले.
  • हा मोर्चा पुण्यातील मोर्चांचेच नव्हे, तर इतर कार्यक्रमांना जमलेल्या जनसागराचे आतापर्यंतचे विक्रम मोडीत काढणारा ठरला. मोर्चात ३५ ते ४० लाख जण सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा