चालू घडामोडी : १९ नोव्हेंबर

‘आयएनएस चेन्नई’वर सुरक्षा’कवच’

  • ‘आयएनएस चेन्नई’ या विनाशिकेवर भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना शत्रूपासून रोखणारे सर्वात पहिले ‘कवच’ चढविण्यात आले आहे.
  • गेल्या काही वर्षांपासून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (डीआरडीओ) ‘कवच’ या नव्या चकवायंत्रणेची निर्मिती करण्यासंबंधी संशोधन सुरू होते.
  • या ‘कवचा’चे सर्व चाचण्या ‘आयएनएस चेन्नई’ या विनाशिकेवर करण्यात आल्याव त्या यशस्वी झाल्यानंतर सर्वात पहिले ‘कवच’ही आता याच युद्धनौकेवर चढविण्यात आले आहे.
  • यापुढे नौदलात दाखल होणाऱ्या सर्व युद्धनौकांनाही हे ‘कवच’ चढविण्यात येणार आहे.
 ‘कवच’प्रणाली 
  • पूर्वी टेहाळणीदरम्यान शत्रूने भारतीय युद्धनौकांवर क्षेपणास्त्र डागल्यास युद्धनौकेचा बचाव करण्यासाठी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्र वापरण्याखेरीज दुसरा पर्याय नौदलाकडे उपलब्ध नव्हता.
  • म्हणूनच गेली काही वर्षे ‘डीआरडीओ’तर्फे शत्रूच्या क्षेपणास्त्राला चकवा देणाऱ्या ‘कवच’ या नव्या चकवायंत्रणेची निर्मिती सुरु होती.
  • शत्रूचे क्षेपणास्त्र येते आहे, हे लक्षात येताच ‘कवचा’द्वारे युद्धनौकेपासून दूर अंतरावर एक मोठी युद्धनौका असल्याचा आभास निर्माण होतो.
  • क्षेपणास्त्राला अधिक मोठी युद्धनौकाच असल्याचा आभास आहे, हे लक्षात येत नाही आणि युद्धनौकेऐवजी त्या आभासी ठिकाणी जाऊन ते फुटते. परिणामी युद्धनौकेचा यशस्वी बचाव होतो.
 आयएनएस चेन्नई 
  • भारतीय नौदलाच्या ‘प्रकल्प १५ अल्फा’मधील कोलकाता वर्गातील गायडेड मिसाईल विनाशिकांपैकी ही तिसरी आणि अखेरची विनाशिका आहे.
  • या तीन विनाशिकांच्या प्रकल्पावर नौदलाने सुमारे साडेअकरा हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.
  • १६४ मीटर्स लांबीच्या या विनाशिकेचे वजन साडेसात हजार टनांचे असून त्यावर भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणारी ब्राह्मोस, त्याचप्रमाणे लांब पल्ल्याची भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बसविण्यात आली आहेत.
  • याशिवाय पाणतीरांचा मारा झाल्यास त्यालाही चकवा देणारी ‘मारीच’ नावाची यंत्रणा प्रथमच बसविण्यात आली आहे.
  • शत्रूचा संहार करणारी या अर्थाने संस्कृतमधील ‘शत्रो संहारक:’ हे या विनाशिकेचे घोषवाक्य आहे.
  • २१ नोव्हेंबर रोजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते ही विनाशिका समारंभपूर्वक नौदलात दाखल होईल आणि ती नौदलाच्या पश्चिमी ताफ्यामध्ये कार्यरत असेल.

जागतिक पातळीवरही पुणे ‘स्मार्ट’

  • देशांतर्गत ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या पुणे शहराने जागतिक पातळीवरही नावलौकिक मिळविला आहे.
  • ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड कॉंग्रेस’ या उपक्रमात सहभागी झालेल्या ४५ देशांतील २५० शहरांमधून अंतिम ६ शहरांच्या यादीत पुण्याने स्थान पटकावले आहे.
  • आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी, निधी उभारणीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे.
  • बार्सिलोना येथे झालेल्या या स्पर्धेत तीन गटांमध्ये विविध देशांतील शहरांनी भाग घेतला होता.
  • त्यामध्ये ‘प्रोजेक्ट’ विभागात भुवनेश्वर आणि ‘सिटी’ विभागात पुणे शहराने भाग घेतला होता.
  • अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराने यात पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर सोल (कोरिया), हॉलंड (नेदरलॅंड), जिउक्वॉन (चीन) आणि मॉस्को (रशिया) व पुणे या शहरांनी अनुक्रमे २ ते ६ क्रमांक पटकावले.  
  • शाश्वत विकास, जगण्यायोग्य शहर आणि नागरिकांचा लोकसहभाग या तीन निकषांवर पुण्याची निवड अंतिम सहा शहरांच्या यादीत करण्यात आली आहे.
  • त्यामुळे आता जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांमध्ये योग्य संदेश जाण्यास मदत होईल आणि पुण्यातील प्रकल्पांसाठी निधी उभारणे सोपे होऊ शकेल. 
  • केंद्र सरकारने यापूर्वी देशांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत भुवनेश्वर शहराने पहिला तर पुणे शहराने दुसरा क्रमांक पटकावला होता.

वाहतूक नियमांचे २० वेळा उल्लंघन केल्यास परवाना रद्द

  • वाहतूक नियमनात ई-चलन प्रणाली अस्तित्वात आल्याने आता वाहतूक नियमांचे २० वेळा उल्लंघन केल्यास चालकाचा वाहन परवाना कायमचा रद्द करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्राच्या गृह विभागात काही अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • त्यानुसार मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. उर्वरित महापालिका क्षेत्रातही ही यंत्रणा बसविण्याचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे.
  • वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यावर दंड भरताना किंवा कारवाई करताना वाहनचालक आणि पोलिसांदरम्यान भांडणाचे प्रसंग ओढवतात, परिणामी वाहतूक विस्कळित होते.
  • यासाठी ई-चलन व्यवस्था कार्यान्वित केली आहे. वाहनचालकाने नियम तोडल्यास त्याला ई-चलनाची नोटीस जागेवरच देता येईल किंवा घरच्या पत्त्यावर जाईल. दंडाची रक्कम त्याला संगणकाद्वारे भरता येईल.
  • या यंत्रणेमुळे वाहनचालकाने किती वेळा नियम तोडला त्याचा तपशील उपलब्ध असेल.
  • दहा वेळा नियम तोडल्यास दोन महिन्यांसाठी, तर वीस वेळा नियम तोडल्यास कायमस्वरूपी चालक परवाना रद्द करण्यात येणार आहे. 
 गृह विभागात होणारे अन्य बदल 
  • पोलिस भरतीसाठी संगणकाद्वारे वजन, उंची व धावण्याच्या चाचण्या.
  • आग, आरोग्य, पोलिस मदतीसाठी देशभरात एकच ११२ टोल फ्री क्रमांक.
  • पोलिसांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी, उपलब्धता याचा तपशील स्वतंत्र ॲपवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा