चालू घडामोडी : १३ एप्रिल

अमेरिकेकडून इसिसवर बॉम्बहल्ला

  • अमेरिकेने १३ एप्रिल रोजी अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतातील अचीन जिल्ह्यातील इसिसच्या आश्रयस्थानावर जीबीयू-४३बी या अतिशय मोठ्या अण्वस्त्रविरहित (नॉन न्यूक्लिअर) बॉम्बने हल्ला केला.
  • नांगरहार भागातील इस्लामिक स्टेट अर्थात इसिसचे बोगदे आणि बंकरला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात सुमारे ९४ दहशतवादी ठार झाले.
  • इसिसमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांचे प्रशिक्षण या भागात दिले जात असल्याचा संशय आहे. पाकिस्तान सीमेलगतच असलेल्या या भागात इसिसचे एक ते पाच हजार दहशतवादी असण्याचा अहवाल आहे.
  • अमेरिकेच्या विशेष हवाई पथकाने एमसी-१३० या विमानातून जीपीएसच्या साह्याने हा बॉम्ब टाकला.
  • या हल्ल्यात नागरिकांचे मृत्यू टाळण्यासाठी अमेरिकेने हल्ल्यापूर्वी आवश्यक ती सर्व सावधानता बाळगली होती, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले.

 जीबीयू-४३बी 
  • जीबीयू-४३बी हा शक्तिशाली बॉम्ब अमेरिकेने इराक युद्धावेळी २००३मध्ये तयार केला होता आणि त्यावेळी त्याची चाचणीही झाली होती.
  • मदर ऑफ ऑल बॉम्ब अशा नावाने कुप्रसिद्ध असलेला जीबीयू-४३बी हा अमेरिकेच्या ताफ्यातील हा सर्वांत शक्तिशाली अण्वस्त्ररहित बॉम्ब आहे.
  • अणूबॉम्ब प्रमाणे या बॉम्बमुळे पुढच्या पिढयांमध्ये शारीरीक व्यंग निर्माण होणार नसले तरी, प्रचंड विध्वंस घडवण्याची क्षमता यामध्ये नक्कीच आहे. 
  • मॅसिव्ह ऑर्डीनंस एअर ब्लास्ट ही या बॉम्बची प्रणाली आहे. या प्रणालीचा वापर शत्रूवर मानसिक दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने केला जातो.
  • मॅसिव्ह ऑर्डीनंस एअर ब्लास्टचा वापर करणारा अमेरिका हा पहिला देश ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता.
  • या बॉम्बचे वजन सुमारे २१६०० पौंड (९८०० किलो) असून, त्याची लांबी ३० फूट व व्यास ४०.५ इंच आहे. या बॉम्बमध्ये ११ टनाचा ज्वालाग्राही पदार्थ होता.
  • हा सॅटलाईड गाईडेड स्मार्टबॉम्ब असल्यामुळे यामध्ये अचूकता जास्त असते. जमिनीपासून ६ मीटर उंचीवर हवेतच या बॉम्बचा स्फोट होता. त्यामुळे याची परिणामकारकता जास्त असते.
  • हा बॉम्ब अतिशय विध्वंसक असतो. याच्या स्फोटानंतर सर्व दिशांना साधारणत: एका मैलापर्यंत नुकसान होते. मात्र हा अणूबॉम्ब नसल्याने यामुळे कोणताही किरणोत्सार होत नाही.
  • स्फोटानंतरच्या अवघ्या काही सेकंदांनतर आसपासच्या भागातील ऑक्सिजन संपतो. त्यामुळे परिसरातील लोकांचा श्वास गुदमरतो, झाडे उन्मळून पडतात आणि इमारती कोसळतात.
  • असे असले तरी हा जगातील सर्वात मोठा बॉम्ब नाही. टी-१२ए हा १९,८०० किलो वजनाचा क्लाऊडमेकर म्हणून ओळखला जाणारा बॉम्ब जगातील सर्वात मोठा बॉम्ब आहे. 
  • दहशतवाद्यांकडून नागरिकांच्या होणाऱ्या हत्या थांबविण्यासाठीच या हल्ल्याचे नियोजन अनेक दिवसांपूर्वीच झाल्याचेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
  • अशा प्रकारचा बॉम्ब एखाद्या संघर्षात वापरण्याची ही अमेरिकेची पहिलीच वेळ असून, याद्वारे अमेरिकेने आपल्या शक्तीचे पुन्हा दर्शन घडविले आहे.
  • ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पद सांभाळल्यापासून इसिस विरोधात मोहीम उघडली आहे. याआधी अमेरिकेच्या सहकार्याने इराकी सैन्याने पूर्व मोसूलमध्ये हल्ले केले. त्यामध्ये आयसिसचे ३०० दहशतवादी ठार झाले होते.
  • तसेच काही दिवसांपूर्वी सिरियामध्ये रासायनिक हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने सिरियातील शायरात हवाईतळावर ५०-६० टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.

जीएसटीला राष्ट्रपतींची मंजुरी

  • वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकाशी संबंधित एकूण चार विधेयकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी देत त्यावर स्वाक्षरी केली आहे.
  • या विधेयकांना ६ एप्रिल रोजी राज्यसभेत २९ मार्च रोजी लोकसभेत मंजुरी देण्यात आली होती. १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे.
  • अवाजवी कर गुंता टाळून सुटसुटीतपणा आणणारा जीएसटी हा एक-सामाईक अप्रत्यक्ष कर संपूर्ण देशस्तरावर सारख्याच दराने लागू होईल. 
  • जीएसटीमुळे सर्व देशात वस्तूंचे एकसमान दर राहतील. देशभरात एकसमान करप्रणाली तयार होईल आणि त्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल. 
  • एका मर्यादेपेक्षा जास्त नफा कंपन्यांना मिळविता येणार नाही. हा जास्तीचा नफा किमती कमी करून ग्राहकांपर्यंत पोहोचवावा लागेल, अशी व्यवस्था जीएसटीमध्ये करण्यात आली आहे.
  • केंद्र व राज्य सरकारकडून सध्या विविध कर आकारले जातात. हे सर्व कर एका छत्राखाली आणून कररचना सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने जीएसटी आवश्यक आहे.
  • जीएसटी लागू झाल्यानंतर भाववाढ आणि चलन फुगवटा होऊ शकतो. १ जुलै पासून काही काळ ही भाववाढ अनुभवास येऊ शकते. नंतरच्या काळात किमती स्थिर देखील होतील.
  • भविष्यात जीएसटीमुळे किमती कमी होऊन कार्यक्षमता वाढेल. परिणामी सकळ देशांतर्गत उत्पादनात १ ते २ टक्के वाढ होईल, असे जाणकारांचे मत आहे.
  • जीएसटी परिषदेने ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के अशी चार टप्प्यांतील कररचना निर्धारित केली आहे.
  • कोणती वस्तू कोणत्या टप्प्यात बसवायची याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या १८ व १९ मे रोजी होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल.
  • जीएसटी संदर्भातील शेवटची मंजुरी १७-१८ मे रोजी मिळेल असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे.

आलिया, दीपा आणि साक्षी यांना फोर्ब्सच्या यादीत स्थान

  • फोर्ब्सने नुकत्याच जारी केलेल्या आशियातील ३० वर्षाच्या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री आलिया भट्टचा समावेश जाहीर केली आहे.
  • आलियाने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले. यानंतर तिने आतापर्यंत जवळपास १० चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
  • उडता पंजाब या चित्रपटातील अनोख्या भूमिकेसाठी तिला सर्वोकृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • आलिया भट्ट शिवाय खेळाचे मैदान गाजविणाऱ्या दीपा कर्मारकर आणि साक्षी मलिकला यांनादेखील फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळाले आहे.
  • रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावणारी दीपा ऑलिम्पिकमध्ये ५२ वर्षांच्या कालावधीत सहभागी होणारी भारताची पहिली जिम्नॅस्ट ठरली होती.
  • तर साक्षीने ५८ किलो फ्रीस्टाईलमध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावले होते. भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी ती पहिली महिला मल्ल ठरली होती.

गोव्यात लेट नाईट पार्टी करण्यास बंदी

  • संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले मनोहर पर्रिकर यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गोव्यात रात्री १०च्या पुढे पार्टी करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
  • पर्रिकर मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री विनोद पालियेकर यांनी गोव्यातील लेट नाईट आणि रेव्ह पार्टीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पर्रिकरांनी हा निर्णय घेतला आहे.
  • राज्यात सुरू असलेल्या अमली पदार्थ व देहविक्री व्यवसाय आणि अवैध जुगार संपुष्टात आले पाहिजे, अशी सक्त ताकीद पर्रिकर यांनी पोलिस विभागाला दिली आहेत.
  • उत्तर गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांची येथे सातत्याने गर्दी असते. परंतु, सरकारने सूचना करूनही गोव्यातील लेट नाईट पार्टी बंद झाल्याचे दिसत नाही.
  • गाण्यांच्या कर्णकर्कश आवाजात पहाटे ३ ते ४ पर्यंत येथे पार्ट्या सुरू असतात. याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांना तसेच परिसरातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असल्याचे सांगण्यात येते.

बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांचे निधन

  • भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने १३ एप्रिल रोजी निधन झाले. ते कॉंग्रेसचे नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री होते.
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणी व्ही के वर्मा यांना अटक झाल्यानंतर गुप्ता यांनी २०१२मध्ये बॅडमिंटन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
  • २०१४मध्ये त्यांची चार वर्षांसाठी एकमताने फेरनिवड झाली होती. गेल्या वर्षी आशियाई बॅडमिंटन महासंघाच्या अध्यक्षपदीसुद्धा त्यांची निवड झाली होती.
  • त्यांच्या पुढाकारामुळे भारताने २०१४मध्ये थॉमस-उबेर करंडक, सुपर सीरिज अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे आयोजन केले.
  • तसेच सय्यद मोदी स्मृती स्पर्धेचा दर्जाही आंतरराष्ट्रीय पासून ग्रांप्री गोल्डपर्यंत वाढविण्यात आला.
  • २०१३मध्ये भारतीय बॅडमिंटन लीगच्या संयोजनात त्यांचा मोठा वाटा होता. २०१५मध्ये प्रिमीयर बॅडमिंटन लीगमध्ये याचे रूपांतर झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा