चालू घडामोडी : १६ एप्रिल

जलयुक्त शिवार अभियानासाठी सोलापूरला प्रथम पुरस्कार

  • महाराष्ट्रात राज्यशासनाने ५ डिसेंबर २०१४पासून सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जिल्हा-तालुका-गावांच्या पुरस्काराची घोषणा शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने केली.
  • या अभियानात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार जाहीर झाले.
  • सोलापूर जिल्ह्याला राज्यातील पहिला पुरस्कार जाहीर झाला. ५० लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • गांव पातळीवर बार्शी तालुक्यातील मळेगावने या अभियानात केलेले काम राज्यात उत्कृष्ट ठरले. यासाठी २५ लाखांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • तर तालुकास्तरावर पुण्यातील पुरंदर तालुक्याला प्रथम क्रमांकाचा ३५ लाखांचा पुरस्कार जाहीर झाला.
  • जलयुक्त शिवारसाठी जिल्हा, तालुका, गाव, व्यक्ती/वैयक्तिक संस्था, अधिकारी/कर्मचारी, पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी राज्यस्तरावर हे पुरस्कार देण्यात आले.
  • राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, तर जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावे हे पुरस्कार जाहीर झाले.
  • जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्कारांची निवड केली. हे पुरस्कार २०१५-१६ या वर्षासाठी आहेत.
  • पुरस्कार विजेते:-
  • गावे
    • प्रथम: मळेगांव (ता.बार्शी, जि. सोलापूर) २५ लाख रु
    • द्वितीय: वेळू (ता. कोरेगांव, जि. सातारा) १५ लाख रु
    • तृतीय: कर्जत (ता. कर्जत, जि. अहमदनगर) ७.५ लाख.
  • तालुके
    • प्रथम: पुरंदर, जि. पुणे, ३५ लाख रु
    • द्वितीय: कोरेगांव, जि. सातारा, २० लाख रु
    • तृतीय: चांदवड, जि. नाशिक, १० लाख रु
  • जिल्हे
    • प्रथम: सोलापूर, ५० लाख रु
    • द्वितीय: पुणे, ३० लाख रु
    • तृतीय : अहमदनगर, १५ लाख रु
 जलयुक्त शिवार अभियान 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१४मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरु केले होते.
  • राज्यातील दुष्काळी गावांतील पाणी समस्या लक्षात घेऊन जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.
  • या अभियानात २०१९अखेर संपूर्ण महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
  • या अभियानातील दोन टप्प्यांवर आत्तापर्यंत सुमारे ३,२०० कोटी रुपये एवढा खर्च झाला आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील ५ हजार गावांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
  • राज्यातील विविध विभागांच्या समन्वयातून एकात्मिक पद्धती विकास आराखडा तयार करून शेती आणि पिण्यासाठी शाश्वत पाण्याची उपलब्धी करण्याचा प्रयत्न केला जात आहेत.
  • अभियानाची उद्धिष्टे
    • २०१९अखेर संपूर्ण महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करणे.
    • पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावात शिवारातच अडविणे.
    • भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे.
    • विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे.
    • पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे.
    • अस्तित्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनस्थापित करणे.
    • पाणी अडविणे-जिरविणे याबाबत जनतेला प्रोत्साहित करून लोकसहभाग वाढविणे.

बीबीसीवर भारताकडून पाच वर्षांची बंदी

  • काझीरंगा अभयारण्याची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर (बीबीसी) भारताकडून पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
  • या बंदीमुळे आता बीबीसीला पुढील पाच वर्षे भारतामधील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करता येणार नाही.
  • काही दिवसांपूर्वी बीबीसीकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या एका माहितीपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिष्ठेची न भरुन येणारी हानी झाल्याचे सरकारने म्हटले आहे.
  • या माहितीपटात काझीरंगा अभयारण्यातील शिकार रोखण्यासासंदर्भातील धोरणाविषयी भाष्य करण्यात आले होते.
  • त्यामुळे १० एप्रिल २०१७पासून बीबीसीला भारतात माहितीपट किंवा वार्तांकनासाठी चित्रीकरण करू न देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
  • फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) काझीरंगा अभयारण्यातील परिस्थितीचे चुकीचे पद्धतीने वार्तांकन केल्याप्रकरणी बीबीसीचे दक्षिण आशियातील प्रतिनिधी जस्टीन रॉवलाट यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
  • तसेच बीबीसीवर बंदी टाकण्याची शिफारसही केली होती. केंद्रीय वनमंत्रालयाने एनटीसीएचा हा निर्णय उचलून धरला आणि त्यामुळे बीबीसीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

साई प्रणीतला सिंगापूर ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद

  • भारताच्या साई प्रणीतने भारताच्याच किदाम्बी श्रीकांतला पराभूत करत सिंगापूर ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावले आहे.
  • सिंगापूर ओपन सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत यंदा दोन्ही खेळाडू भारतीय होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही भारतीय खेळाडूंनी खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.
  • अंतिम सामन्यात प्रणीतने श्रीकांतचा १७-२१, २१-१७, २१-१२ असा तीन गेममध्ये पराभव केला. साई प्रणीतचे हे पहिले सुपर सीरिज विजेतेपद आहे. 
  • प्रणीतने याआधी श्रीकांतला ४ वेळा पराभूत केले होते, तर केवळ एकदा पराभव पत्करला होता.
  • प्रणीत सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. याआधी श्रीकांतने सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावले आहे.
  • या स्पर्धेत उपांत्य फेरीत श्रीकांतने इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिंटिंगला, तर साई प्रणीतने कोरियाच्या ली डाँग केयूनवर मात केली.

अहमदनगरच्या एसीसीएस संस्थेला राष्ट्रपती मानक बहाल

  • अहमदनगर येथील आर्मर्ड कार्प सेंटर अ‍ॅण्ड स्कूल या लष्करी प्रशिक्षण संस्थेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती मानक देऊन गौरविण्यात आले.
  • सन १९४८पासून देशसेवेत समर्पित आर्मर्ड कोअर सेंटरने त्याग, समर्पण, व्यावसायिक कौशल्य आणि नि:स्वार्थ सेवेचा आदर्श घातला आहे.
  • एक शांतताप्रिय देश म्हणून राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय ऐक्य कायम ठेवण्यासाठी आपल्या क्षमतेचा त्यांनी उत्तम रीतीने उपयोग केला आहे.
  • राष्ट्रपतींचे मानक मिळणे हे कोणत्याही सैनिक तुकडीचा सर्वोच्च सन्मान व दुर्मीळ क्षण असतो. सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम हे निशाण करते.
  • ६९ वर्षांच्या कामगिरीच्या आधारे या संस्थेला हा सर्वोच्च बहुमान पहिल्यांदाच मिळाला आहे.
  • या संस्थेला यापूर्वी २ व्हिक्टोरिया क्रॉस, २ परमवीर चक्र, १६ महावीर चक्र तसेच ५२ वीर चक्रांनी सन्मानित करण्यात आले आहे.
  • अर्जुन, टी ९०, टी ७२, भीष्म, अजेय आदी अनेक भेदक रणगाडे एसीसीएसच्या ताफ्यात आहेत. भारतीय लष्कराबरोबरच मित्रराष्ट्रांच्या अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षण दिले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा