चालू घडामोडी : २० एप्रिल

बाबरी मशीद प्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप

  • भारतीय राजकारणाला वेगळे वळण देणाऱ्या सन १९९२मधील बाबरी मशीद न्यायालयीन प्रकरणावर न्या. पी सी घोष व न्या. आर एफ नरिमन यांनी १९ एप्रिल रोजी निवाडा दिला.
  • लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारतींसह अन्य भाजप नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवून खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
  • या प्रकरणातील बड्या आरोपींवर गुन्हेगारी कटाचा आरोप पुन्हा ठेवण्याची केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) याचिका न्यायालयाने मान्य केली.
  • या आदेशामुळे आगामी राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असलेले ८९ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना धक्का बसला आहे.
  • अडवाणींसह सहा आरोपींना आता धर्माच्या आधारे दोन गटांत वैमनस्य निर्माण करणे, प्रक्षोभक विधाने करणे अशा विविध आरोपांना तोंड द्यावे लागेल.
  • हे आरोप सिद्ध झाल्यास दोन ते पाच वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.
 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील ठळक मुद्दे 
  • अडवाणी व इतर पाच आरोपींवर रायबरेली येथील विशेष न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू असलेला खटला लखनौ येथील अतिरिक्त सेशन्स न्यायमूर्तीच्या न्यायालयात वर्ग करावा.
  • या सहा आरोपींवर कलम १२० बी अन्वये फौजदारी कटाचा आरोप नव्याने ठेवून कटला चालविला जाईल.
  • लखनौ येथील या न्यायालयात अयोध्या प्रकरणीच्या दुसऱ्या खटल्याची सुनावणी सुरू आहेच. हे दोन्ही खटले तेथे एकत्रितरीत्या चालवले जावेत.
  • त्यानंतर लखनौ येथील न्यायालयाने चार आठवडय़ांच्या आत या खटल्यांवर रोज सुनावणीस प्रारंभ करावा.
  • अडवाणी व इतर आरोपींविरुद्धचा कटाचा आरोप वगळण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा होता.
  • बाबरी पडणे व कटकारस्थान या दोन प्रकरणांतील जवळपास सारे पुरावे समानच असल्याने ते एकमेकांपासून वेगळे करता येणार नाहीत.
  • मात्र एकत्रितपणे चालणारा हा खटला पूर्णपणे नव्याने चालणार नाही. रायबरेली व लखनऊ न्यायालयात आधी ज्या टप्प्यापर्यंत कामकाज झाले होते तेथून पुढे काम सुरु राहील.
  • खटला संपेपर्यंत न्यायमूर्तीची बदली केली जाणार नाही. एखाद्या दिवशी खटला चालविणे अगदीच अशक्य आहे, असे वाटल्याखेरीज खटला तहकूब केला जाणार नाही.
  • आजच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर दोन वर्षांच्या आत लखनौ येथील न्यायालय यावर निकाल देईल.
  • या प्रकरणातील साक्षीदार दररोज सुनावणीसाठी हजर राहतील आणि खटल्याच्या सुनावणीत विलंब होणार नाही याची सीबीआयने दक्षता घ्यावी.
  • लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्याखेरीज साध्वी ऋतंबरा, विनय कटियार व विष्णू हरी दालमिया अशा एकूण सहा आरोपींवर कटाचा खटला चालविला जाईल.
  • याच प्रकरणातील अशोक सिंघल व गिरीराज किशोर या दोघा नेत्यांचे याआधी खटला चालू असताना निधन झाले.
  • बाबरी प्रकरण घडले तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व आत्ताचे राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह हे देखील या प्रकरणातील आरोपी आहेत. मात्र राज्यपाल असल्याने तूर्तास ते यातून सुटले आहेत.
  • मात्र ते राज्यपालपदावरून पायउतार होताच त्यांच्यावर आरोप ठेवले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
 पार्श्वभूमी 
  • बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी जमीनदोस्त केली, त्या वेळी मुरली मनोहर जोशी भाजपाचे अध्यक्ष होते.
  • बाबरी मशीद प्रकरणात पहिली एफआयआर लखनौत दाखल झाली होती. तर दुसरी एफआयआर फैजाबादमध्ये दाखल झाली होती व काही दिवसांनी हा गुन्हा रायबरेलीकडे वर्ग करण्यात आला.
  • अशाप्रकारे बाबरी मशिद पाडण्याच्या संदर्भात रायबरेली आणि लखनौ येथे दोन स्वतंत्र खटले सुरु होते.
  • यापैकी रायबरेलीचा खटला बाबरी पाडणाऱ्या अज्ञात कारसेवकांविरुद्धचा तर लखनऊचा खटला चिथावणीखोर वातावण तयार करणाऱ्या नेत्यांविरुद्धचा होता.
  • या गुन्ह्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, गिरीराज किशोर, अशोक सिंघल, उमा भारती अशा ८ मोठ्या नेत्यांविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होता.
  • यानंतर हे दोन्ही गुन्हे लखनौ न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. सीबीआयला तपासादरम्यान या नेत्यांविरोधात कट रचल्याचे पुरावे सापडले होते.
  • कालांतराने आरोपींमध्ये बाळासाहेब ठाकरेंसह आणखी १३ नेत्यांचा समावेश झाला. यानुसार एकूण आरोपींची संख्या २१ झाली होती.

सायरा बानो आणि विक्रम गोखले यांना राज्य शासनाचे पुरस्कार

  • ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे यंदा राज्य शासनाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.
  • मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना दरवर्षी राज्य शासनातर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
  • सायरा बानो यांना ‘राजकपूर जीवनगौरव’, तर विक्रम गोखले यांना ‘चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  • याशिवाय, ‘व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेते अरुण नलावडे यांना आणि ‘राजकपूर विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे.
  • जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५ लाख रुपये  व स्मृतिचिन्ह तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे.

‘टाईम’च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदी

  • ‘टाईम’ मासिकातर्फे जाहीर करण्यात आलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या अंतिम यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर यांनी स्थान मिळवले आहे.
  • या यादीत समावेश असणारे ते दोघेच भारतीय आहेत. गेल्या वर्षभरात आपल्या उल्लेखनीय कामगिरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चा प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींचा या यादीत समावेश आहे.
  • मोदींशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचाही या यादीत समावेश आहे.

नक्षलवादी चळवळीचे कार्यकर्ते नारायण संन्याल यांचे निधन

  • सशस्त्र क्रांतीचा नारा देत नक्षलवादी चळवळीच्या प्रसारासाठी सारे आयुष्य पणाला लावणारे नारायण संन्याल यांचे १७ एप्रिल रोजी कर्करोगाने निधन झाले.
  • त्यांच्या निधनाने, निधनाने या चळवळीतील फूट आणि एकीकरण जवळून अनुभवणारा एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. नक्षली चळवळीतील एके काळच्या आदर्शवादाचे प्रतीक लोपले.
  • संन्यालांचा जन्म आता बांगलादेशात असलेल्या बोग्रा जिल्ह्यात झाला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या त्यांच्या वडिलांनी स्वातंत्र्यलढय़ात सरोजिनी नायडूंसोबत काम केलेले.
  • संन्याल मात्र राजकारणात कधी रमले नाहीत. उत्कृष्ट फुटबॉलपटू असलेल्या संन्यालांनी युनायटेड बँकेत नोकरी धरली.
  • १९६०च्या दशकात चारू मुजुमदारांनी दिलेला सशस्त्र क्रांतीचा नारा त्यांना भावला.
  • देशातील पीडित, गरीब व भूमिहीनांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रांतीशिवाय दुसरा मार्ग नाही या विचाराने प्रेरित झालेले संन्याल नक्षलवादींच्या लढय़ात सामील झाले.
  • या चळवळीतील नेत्यांमध्ये मतभेद झाल्यावर नारायण संन्याल थेट बिहारमध्ये गेले. तेथे त्यांनी सत्यरंजन सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली जमीनदारांच्या विरोधात भूमिहीनांची सशस्त्र सेना उभारली.
  • जेहानाबाद व पलामू क्षेत्रातील दुर्गम जंगलात राहून भूमिगत पद्धतीने काम करणाऱ्या संन्यालांनी देशभरातील सर्व क्रांतिकारी गटांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले. त्याला २००४मध्ये यश मिळाले.
  • पडद्याआड राहून या एकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संन्यालांना भाकप माओवादी या नव्याने स्थापन झालेल्या पक्षात पॉलिट ब्यूरोत स्थान देण्यात आले.
  • चळवळीच्या विस्तारासाठी कधी बस्तर तर कधी झारखंड असा प्रवास करणाऱ्या या जहाल डाव्या नेत्याला २००५ला झारखंडमध्ये अटक करण्यात आली.
  • कारागृहात असताना संन्याल यांनी डॉ. विनायक सेन यांना अनेक पत्रे लिहिली होती. याचाच आधार घेत सेन यांनाही नंतर अटक झाली.
  • २०१४ला प्रकृतीच्या कारणावरून जामीन मिळाल्यानंतर संन्याल दक्षिण कोलकात्याला राहायला गेले.
  • चळवळीच्या सध्याच्या स्वरूपाबद्दल निराशा प्रकट करणारे संन्याल शेवटपर्यंत चळवळीचा सच्चा कार्यकर्ता म्हणूनच वावरले.
  • संन्याल यांच्या जाण्यामुळे आता चारू मुजुमदारांसोबत काम केलेले दोघेच चळवळीत उरले आहेत.
  • त्यापैकी प्रशांता बोस सध्या छत्तीसगडच्या जंगलात भूमिगत आहेत, तर अमिताभ बागची २००९ला अटक झाल्यापासून कोलकात्याच्या तुरुंगात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा