चालू घडामोडी : ११ जुलै

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री

  • अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तसेच झहीर खानकडे भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  • तर भारतीय संघ परदेश दौऱ्यावर असताना राहुल द्रविडकडे फलंदाजीच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी असणार आहे.
  • रवी शास्त्रींची निवड दोन वर्षांसाठी करण्यात आली असून, २०१९च्या विश्वचषकापर्यंत ते संघाचे प्रशिक्षक राहणार आहेत.
  • येत्या २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी मालिकेपासून शास्त्री कार्यभार सांभाळतील. 
  • अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यावर प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार, याबद्दल मोठी उत्सुकता होती.
  • रवी शास्त्री यांना प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात यावी, यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आग्रही होता.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षक पदासाठी पाच जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
  • अनिल कुंबळे प्रशिक्षक म्हणून येण्याआधी रवी शास्त्री यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत संघाच्या मुख्य व्यवस्थापकाची भूमिका पार पाडली होती.
  • बीसीसीआयच्या क्रिकेटविषयक सल्लागार समितीने शास्त्री यांची निवड केली. या समितीमध्ये सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश होता.
  • या तिघांनी प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
  • प्रशिक्षकपदासाठी शास्त्री यांच्यासह वीरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, फिल सिमन्स, रिचर्ड पायबस आणि टॉम मुडी यांनीही अर्ज दाखल केला होता. 
 रवी शास्त्री 
  • मुंबईत जन्मलेल्या रवी शास्त्री यांना लहानपणापासूनच क्रिकेटची क्रेझ होती. डॉन बास्को शाळेमधून त्यांनी क्रिकेटचा आपला प्रवास सुरु केला.
  • ज्युनीअर कॉलेजमध्ये शिकत असताना शास्त्री यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळवले.
  • युवराज सिंगपूर्वीच रणजी करंडक स्पर्धेत रवी शास्त्री यांनी ६ चेंडूत ६ षटकार मारत, वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर गॅरी सोबर्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.
  • २१ फेब्रुवारी १९८१मध्ये रवी शास्री यांनी न्युझीलंडविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली.
  • १९८३साली कपील देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिला विश्वचषक जिंकला. रवी शास्त्री या भारतीय संघाचे सदस्य होते.
  • त्यांनी ८० कसोटीत ११ शतके आणि आणि १२ अर्धशतकांच्या जोरावर ३८३० धावा केल्या आहेत.
  • तर एकदिवसीयमध्ये १५० सामन्यात त्यांनी ४ शतके आणि १८ अर्धशतकाच्या मदतीने ३१०८ धावा केल्या आहेत.
  • फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही त्यांनी अनुक्रमे ३६ आणि ४० वेळा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.
  • क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती घेतल्यानंतर रवी शास्त्री यांनी समालोचनाकडे वळले.

गोपाळकृष्ण गांधी यूपीएचे उपराष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार

  • काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) उपराष्ट्रपतीपदासाठी महात्मा गांधींचे नातू व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.
  • सत्ताधारी एनडीएने उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यापूर्वीच १८ विरोधी पक्षांच्या वतीने गांधी यांना उमेदवारी दिली आहे.
  • उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची कारकीर्द १० ऑगस्ट रोजी संपणार आहे.  त्यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.
 गोपालकृष्ण गांधी 
  • गोपालकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे व देशाचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांचे नातू आहेत.
  • २२ एप्रिल १९४५ मध्ये गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.
  • गांधी यांनी विविध देशांत राजदूत म्हणून काम पाहिलेले आहे. ते काही काळ राष्ट्रपतींचे सचिवही होते.
  • दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत ते उच्चायुक्त होते. वर्ष २००४ ते २००९ या कालावधीत ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.

भारताने अमेरिकेकडून खनिज तेलाची आयात करणार

  • भारताने पहिल्यांदाच अमेरिकेकडून खनिज तेलाची आयात करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीचा करार नुकताच झाला आहे.
  • या करारानुसार खनिज तेलाची पहिली खेप ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेमधून भारतात पोहोचणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच अमेरिका दौरा केला आहे. त्यानंतर काही आठवड्यांतच खनिज तेलाच्या आयातीसाठी अमेरिकेसोबत करार झाला आहे.
  • भारत हा खनिज तेलांचा जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. खनिज तेलाची पहिली खेप ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतून भारतात पोहोचणार आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादक कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अमेरिकेशी हा करार केला आहे.
  • अमेरिकेकडून खरेदी करण्यात येणारे यूएस मार्स वजनदार आणि उच्च प्रतीचे सल्फर ग्रेडचे खनिज तेल आहे. याचे शुद्धीकरण ओडिशामधील कारखान्यात होणार आहे.
  • खनिज तेलाच्या मर्यादित साठ्यांमुळे भारताला उर्जासाधनांसाठी आतापर्यंत आखाती देशांवर अवलंबून राहावे लागत होते.
  • चीन आणि कोरिया आदी देशही आखाती देशांकडून तेल खरेदी करण्याऐवजी अमेरिकेकडून खनिज तेल खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

नायलॉनच्या मांजावर पूर्ण बंदी

  • पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांजावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) घेतला आहे.
  • एनजीटीने सर्व राज्य सरकारांना दिलेल्या आदेशात सिंथेटिक मांजा किंवा नायलॉनच्या दोऱ्याची निर्मिती, विक्री, त्याची साठवणूक, खरेदी आणि वापरावर तात्काळ बंदी घालण्यास सांगितले आहे.
  • पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा नागरिकांचे गळे चिरणारा आणि झाडांवर अडकलेला मांजा पक्ष्यांना जखमी करणारा ठरला आहे.
  • त्यामुळे पक्षीप्रेमींनी या मांजावर बंदीची मागणी केली होती. मात्र, या निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नव्हती.
  • शहरी भागात नायलॉनच्या मांजामुळे नागरिकांचे विशेषत: वाहनधारकांचे नाक, कान, गळे चिरण्याच्या घटना पतंगोत्सवाच्या सुमारास घडत आहेत. यात पक्षीदेखील मोठय़ा प्रमाणात जखमी होतात.
  • या पार्श्वभूमीवर एनजीटीकडून याबाबत आता सक्तीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन

  • व्यंग्यचित्रातून दिसतो ‘चेहऱ्याआडचा माणूस’ असे सांगणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे ११ जुलैच्या मध्यरात्री आजारपणाने निधन झाले.
  • ज्यांच्या व्यंग्यचित्रांनी प्रसंगी अनेकांना अंतर्मुख केले... कागदावर जणू जगण्याचे तत्त्वज्ञानच मांडले... अशी मंगेश तेंडुलकर यांची ओळख होती.
  • वाढते दारिद्य्र, शहरातील टेकडीफोड, वाहनांचा गोंगाट, रस्त्यांची दुर्दशा, अशा गंभीर अन्‌ हलक्या-फुलक्या विषयांवरील वेगळा विचार देणारी त्यांची व्यंग्यचित्रे होती.
  • तेंडुलकर यांनी १९५४ पासून व्यंगचित्रे काढण्यास सुरवात केली होती. भुईचक्र, संडे मूड, कार्टुन ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
  • संडे मूड या पुस्तकासाठी त्यांनी वि. मा. दी. पटवर्धन पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिं. वि. जोशी पुरस्कारही मिळाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा