चालू घडामोडी : २७ एप्रिल

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये अनौपचारिक चर्चा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये वुहानमध्ये झालेल्या दोन दिवसीय (२७ व २८ एप्रिल) अनौपचारिक शिखर परिषदेत अनेक महत्वाच्या विषयांवर आश्वासक चर्चा झाली.
  • दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाच्या मुद्यांवर एकमत झाले असून, यामध्ये सीमेवर शांतता ठेवण्याच्या विषयाचा समावेश आहे.
  • लष्करी संघर्ष टाळण्यासाठी यापुढे दोन्ही देश रणनितीक संवाद वाढवण्यावर भर देणार आहेत. सीमेवरील संघर्षाच्या घटना टाळण्यासाठी दोन्ही नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे.
  • फक्त लष्करीच नाही अन्य क्षेत्रांमध्येही भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले आहे.
  • या अनौपचारिक शिखर परिषदेत कुठल्याही करारावर स्वाक्षरी झाली नाही किंवा घोषणा झाली नाही फक्त द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.
  • डोकलामच्या संघर्षापासून भारत-चीन संबंधात निर्माण झालेला कडवटपणा संपवणे हा मोदी-जिनपिंग यांच्या भेटीमागे उद्देश होता.
  • या शिखर परिषदेत भारत आणि चीनने अफगाणिस्तानमध्ये प्रथमच संयुक्त आर्थिक प्रकल्पावर एकत्र काम करण्याचा निर्णयही घेतला आहे. मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये या प्रकल्पाबद्दल एकमत झाले आहे.
  • महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमात २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिंनपिंग यांच्यात पहिली अनौपचारिक बैठक झाली होती. त्यानंतर आता चीनमधील वुहान येथे या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.

फुटबॉलपटू बायचुंग भुतियाकडून राजकीय पक्षाची स्थापना

  • भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने ‘हमरो सिक्कीम पार्टी’ या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.
  • युवकांची टीम बांधून सिक्कीमच्या विकासासाठी काम करणे आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देणे असे या पक्ष स्थापनेमागील उद्देश आहे.
  • २०१४मध्ये बायचुंग भुतियाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण निवडणुकीत एस एस अहलुवालीया यांनी त्याचा पराभव केला होता.

दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची ऐतिहासिक भेट

  • दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग २७ एप्रिल रोजी दोन्ही देशांना विभागणारी सीमारेषा पार करत परस्परांशी ऐतिहासिक हस्तांदोलन केले.
  • या ऐतिहासिक भेटीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमधील नव्या पर्वाला सुरुवात झाल्याची भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. 
  • तसेच आण्विक युद्धाचे ढग जमा झालेल्या कोरियन द्वीपकल्पात सध्या शांततेचे वारे वाहू लागतील, अशी आशाही व्यक्त केली जात आहे.
  • आता कोरियन द्वीपकल्पावर कोणत्याही स्वरुपात युद्ध होणार नाही तसेच या द्वीपकल्पावरील अण्वस्त्रे पूर्णतः नष्ट केली जातील असे नमूद करणारा करार उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये करण्यात आला आहे.
  • गेली सात दशके युद्धजन्य स्थितीत असणाऱ्या या देशांनी शांततेचा काळ आता सुरु झाल्याचे द्योतक असणाऱ्या या करारावर स्वाक्षरी केली.
  • १९५३नंतर उत्तर कोरियाची सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन हे पहिले उत्तर कोरियन नेते ठरले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा