चालू घडामोडी : ३० सप्टेंबर

टीबी उच्चाटनासाठी भारताचा अमेरिकेसोबत करार

  • क्षयरोगाच्या (टीबी) उच्चाटनासाठी भारताने अमेरिकेसोबत करार केला असून, त्यांतर्गत USAID-India End TB Allianceची स्थापना करण्यात आली आहे.
  • या अलायन्समध्ये शिक्षणतज्ञ, वैज्ञानिक, संशोधक, गुंतवणूकदार इत्यादींचा समावेश आहे.
  • या अलायन्सचे विशेष तज्ञ भारतात क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी नाविन्यपूर्ण उपाय सादर करणार आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या उप-महासंचालक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांचाही या अलायन्समध्ये समावेश आहे.
  • टीबी उच्चाटनासाठी यूएस एजेंसी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) भारताला ३० दशलक्ष डॉलर्सचे अर्थसहाय्यही देणार आहे.
क्षयरोग
  • क्षयरोग हा पूर्ण बरा होणारा एक जिवाणुजन्य आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते.
  • क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जिवाणूंमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. १८८२साली डॉ. रॉबर्ट कॉक यांनी या जिवाणूंचा शोध लावला.
  • यात मुख्यतः ७५ टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते.
  • जगातील एकूण टीबीच्या रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण भारतात आहेत. टीबीमुळे भारतात दरवर्षी ४.२१ लक्ष मृत्यू (प्रतिमिनिट एक मृत्यू) होतात.
  • भारत सरकारचे क्षयरोग नियंत्रणासाठी युध्दपातळीवरून प्रयत्न चालू आहेत. सरकारच्या डॉट्स या उपक्रमात टीबीची मोफत तपासणी व पूर्ण कालावधीसाठी मोफत उपचार सरकारी इस्पितळात केले जातात.
  • मार्च २०१७मध्ये भारत सरकारने २०२५पर्यंत क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाचे लक्ष्य ठेवेले आहे.
  • क्षयरोगाच्या धोक्यासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

मध्यप्रदेशला एडीबीकडून १५० दशलक्ष डॉलरचे कर्ज

  • आशियाई विकास बँकेने मध्यप्रदेशातील बहु-कौशल्य (मल्टी-स्किल) पार्कची स्थापना करण्यासाठी १५० दशलक्ष डॉलरच्या कर्जाला मंजुरी दिली आहे.
  • मध्यप्रदेशच्या राजधानी भोपाळ येथे हे ग्लोबल स्किल पार्क (जीएसपी) स्थापन केले जाईल. सुमारे २०,००० लोकांना या केंद्राद्वारे लाभ होईल.
  • याशिवाय आशियाई विकास बँकेद्वारे जपान दारिद्र्य निर्मुलन फंडामधूनही २ दशलक्ष डॉलरचे आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे.
ग्लोबल स्किल पार्क
  • मध्यप्रदेशात तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी या स्किल पार्कमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण सुविधा पुरविल्या जातील.
  • यामुळे राज्यातील कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सक्षम होईल.
  • तसेच यामुळे मध्यप्रदेशातील तरुणांना नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल, जेणेकरुन त्यांना रोजगार मिळेल आणि राज्य व देशाच्या विकासात त्यांना योगदान देता येईल.
  • या पार्कच्या सहाय्याने राज्यात १० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण केले जाऊ शकते. या संस्थांचे कौशल्य अभ्यासक्रमदेखील आवश्यकतेनुसार अद्ययावत केला जाईल.
पार्श्वभूमी
  • मध्य प्रदेश देशातील सर्वात कार्यक्षम राज्यांपैकी एक आहे. मध्यप्रदेशचे मनुष्यबळ २०१६मधील ४८ दशलक्षवरून वाढून २०२६पर्यंत ५६ दशलक्ष होईल.
  • परंतु इतक्या मोठ्या संख्येतील पात्र तरुणांकडे रोजगार प्राप्त करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि कौशल्य नाही.
  • आशियाई विकास बँकेच्या मते, मध्यप्रदेशातील ५५ टक्के मनुष्यबळ शेतीमध्ये, २२ टक्के उद्योगामध्ये आणि २३ टक्के सेवा क्षेत्रात कार्यरत आहे.
  • मध्यप्रदेशातील एकूण मनुष्यबळापैकी फक्त १.२ टक्के लोकांनीच व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे.
आशियाई विकास बँक
  • आशियाई विकास बँक (एशियन डेव्हलपमेंट बँक: एडीबी) ही आशियाई देशांच्या आर्थिक विकासाला सहाय्य करण्यासाठी १९ डिसेंबर १९६६ रोजी स्थापन झालेली एक प्रादेशिक विकास बँक आहे.
  • या बँकेचे मुख्यालय मनिला (फिलिपाइन्स) येथे आहे. सध्या जपानचे ताकेहीको नकाओ एडीबीचे अध्यक्ष आहेत. एडीबीच्या अध्यक्षपदी आतापर्यंत नेहमी जपानी व्यक्तीचीच निवड करण्यात आली आहे.
  • स्थापनेच्यावेळी या बँकेचे ३१ देश सदस्य होते. आता या बँकेची सदस्य संख्या ६७ आहे. ज्यापैकी ४८ देश आशिया व पॅसिफिक प्रदेशातील तर १९ देश गैर-आशियाई आहेत.
  • आशिया आणि पॅसिफिक प्रदेशाच्या आर्थिक-सामाजिक विकासाला गती देणे हे या बँकेचे प्रमुख लक्ष्य आहे.
  • त्यासाठी ही बँक आपल्या विकसनशील सदस्य राष्ट्रांना आर्थिक-सामाजिक विकासासाठी कर्जे देते तसेच समभाग गुंतवणूक करते.

२८ सप्टेंबर : जागतिक रेबीज दिन

  • २८ सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश रेबीज आणि त्याच्या प्रतिबंधांविषयी जागरुकता निर्माण करणे आहे.
  • जागतिक रेबीज दिन २०१८ची थीम ‘Rabies: Share the message. Save a life’ ही होती.
  • प्राणी आणि मानवांवर रेबीजच्या प्रभावांबद्दल आणि रेबीज रोखण्याच्या पद्धतींबद्दल जागरुकता पसरविणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
  • ग्लोबल अलायन्स फॉर रेबीज कंट्रोलच्या पुढाकाराने २००७साली जागतिक रेबीज दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
  • फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीव वैज्ञानिक लुई पाश्चर यांच्या मृत्यूच्या दिवशी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो. लुई पाश्चर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह रेबीजसाठीच्या पहिल्या लसीचा शोध लावला होता.
  • या विशिष्ट दिवशी लसीकरण मोहीम, कुत्र्यांचे नपुसंकीकरण, कवायती, शैक्षणिक सभासत्रे, विविध सोहळे आणि कार्यक्रम आयोजित होतात.
  • रेबिज हा रोग बरा होतो, तरीही जगभरात दर दहा मिनिटाला एक पेशंट या रोगाने बाधित होऊन मृत्युमुखी पडतो.
रेबीज
  • रेबीज हा एक विषाणूजन्य रोग आहे, यामुळे उष्ण रक्त असणाऱ्या सजीवांच्या मेंदूला तीव्र सूज येते.
  • हा एका प्रजातीपासून दुसऱ्या प्रजातीमध्ये संक्रमित होणारा रोग आहे. लस न टोचलेले कुत्रे चावल्याने हा रोग प्रामुख्याने जडतो.
  • पाळीव प्राण्यांचे लसीकरण केल्यास रेबीज नियंत्रित करता येतो. मात्र याकडे जगभरात सर्रासपणे दुर्लक्ष होते. कारण या औषधाची किंमत गरीबांना परवडणारी नसते.

पहिल्यांदाच कृत्रिम गर्भधारणेद्वारे सिंहाच्या छाव्यांचा जन्म

  • दक्षिण आफ्रिकेमध्ये टेस्ट ट्युब तंत्रज्ञानाद्वारे सिंहाच्या दोन छाव्यांचा जन्म झाला आहे. कृत्रिम गर्भधारणेद्वारे जन्माला आलेली जगातील ही पहिली सिंहांची जोडी आहे.
  • आयव्हीएफ म्हणजे कृत्रिम गर्भधारणा पद्धतीचा वापर करून या छाव्यांचा जन्म झाला आहे. यापैकी एक नर आणि एक मादी आहे.
  • दक्षिण अफ्रीकेतील प्रिटोरिया मॅमल रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये २५ ऑगस्ट रोजी या दोन्ही छाव्याचा जन्म झाला आहे. १८ महिन्यांचे परिक्षण आणि मेहनीतीनंतर संशोधकांना हे यश आले आहे.
  • अशा प्रकारे यापुढे अनेक छाव्यांना जन्माला घातले जाऊ शकते. सिंहाप्रमाणे इतर प्राण्यांची निर्मितीही कृत्रिम पद्धतीने करता येऊ शकते. ज्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना वाचवले जाऊ शकते.
  • आफ्रिकेच्या २६ देशांतील सिंहाच्या काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांच्या संख्येत ४३ टक्केंनी कपात झाली आहे.
  • आता फक्त २० हजार सिंह जिंवत राहिले आहेत. जर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर भविष्यात आपण सिंहाला पाहू शकणार नाही.

भारताच्या ४ अणुभट्ट्या IAEAच्या देखरेखीखाली

  • भारताने ४ अणुभट्ट्यांना आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अणुऊर्जा विभागाचे अध्यक्ष शेखर बसू यांनी १९ सप्टेंबर रोजी ही घोषणा केली.
  • या ४ अणुभट्ट्यांमध्ये २ रशियन डिझाइनचे प्रेशराइज्ड लाइट वॉटर रिॲक्टर आणि २ प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टरचा समावेश आहे.
  • याबरोबरच IAEAच्या देखरेखीखालील एकूण अणुभट्ट्यांची संख्या २६ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था
  • IAEA: International Atomic Energy Agency
  • ही अणुऊर्जेच्या शांततामय वापराचा प्रसार करणारी आणि अणुउर्जेचा व आण्विक शस्त्रांचा लष्करी उद्देशासाठी वापर करण्यास प्रतिबंध घालणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 
  • २९ जुलै १९५७ रोजी एक स्वायत्त संस्था म्हणून या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे मुख्यालय ऑस्ट्रियाच्या राजधानी व्हिएन्ना येथे आहे.
  • ही संस्था आंतरराष्ट्रीय अणुशक्तीसाठी वॉचडॉग म्हणून काम करते. १५१ देश या संस्थेचे सदस्य आहेत.
  • ही संस्था जरी संयुक्त राष्ट्रांपासून स्वतंत्र असली, तरीही ती संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला आणि सुरक्षा परिषदेला आपल्या कार्याचा अहवाल देते.
  • IAEA आणि या संस्थेचे माजी महानिर्देशक मोहमद अल बर्देई यांना २००७साली संयुक्तपणे नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

जी-४ देशांकडून युएन सुरक्षा परिषदेच्या कार्याचा आढावा

  • जी-४ देश भारत, ब्राझिल, जर्मनी आणि जपानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सुधारणांच्या प्रक्रियेत कोणतीही महत्त्वपूर्ण प्रगती नसल्याने चिंता व्यक्त केली आहे.
  • सुरक्षा परिषदेच्या सुधारणा प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी जी-४ देशांनी एक बैठक आयोजित केली होती. भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या बैठकीचे यजमानपद भूषविले.
  • अमेरिकेमध्ये स्थित भारतीय मिशनमधील जी-४ देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीला उपस्थित होते.
  • या बैठकीत जी-४ देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी आणि अस्थायी सदस्यांची संख्या वाढविण्यास सहमती दर्शविली.
जी-४ देश
  • जी-४ देश हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये नकाराधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे ४ देश आहेत. हे देश एकमेकांना या उद्देशासाठी पाठिंबा देतात.
  • जी-४ देशांमध्ये भारत, ब्राझिल, जर्मनी आणि जपान यांचा समावेश आहे, हे सर्व सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी एकमेकांना समर्थन देतात.
  • जी-४ देशांच्या मागणीचा विरोध कॉफी क्लबद्वारे केला जात आहे. कॉफी क्लब पाकिस्तानसह १२ देशांचा गट असून याचे नेतृत्व इटली देश करतो. कॉफी क्लबचे सदस्य देश जी-४ देशांचे आर्थिक व राजकीय प्रतिस्पर्धी आहेत.
  • संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेनंतर सर्व देशांना क्रमाक्रमाने सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व मिळाले आहे. जी-४चे मुख्य उद्दीष्ट सुरक्षा परिषदेची स्थायी सदस्यता मिळवणे आहे.
  • सध्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अमेरिका, चीन, रशिया, इग्लंड आणि फ्रान्स हे केवळ ५ देश स्थायी सदस्य आहेत.
संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद
  • संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. सुरक्षा परिषदेवर जागतिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी आहे.
  • सुरक्षा परिषदेत एकूण १५ सभासद राष्ट्रे असतात. अमेरिका, फ्रान्स, इग्लंड, रशिया व चीन ही ५ राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत. तर १० अस्थायी सभासद राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून २ वर्षासाठी केली जाते.
  • सुरक्षा परिषदेच्या ५ स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो. स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या अधिकाराला नकाराधिकार म्हणतात.
  • कोणत्याही निर्णयात या ५ राष्ट्रांचा होकार असावा लागतो. यांपैकी एकाही राष्ट्राने संमती देण्यास नकार दिल्यास निर्णय फेटाळला जातो.
  • जागतिक शांतता व सुरक्षिततेची जोपासना करणे, वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे, आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणे, गरज भासल्यास आक्रमक देशाविरुद्ध आर्थिक किंवा लष्करी कारवाई करणे इत्यादी कामे सुरक्षा परिषद पार पाडते.

एनडीआरएफ सुरू करणार ४ अतिरिक्त बटालियन

  • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) लवकरच ४ अतिरिक्त बटालियन सुरू करणार आहे.
  • या ४ बटालियन जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्लीच्या राजधानी क्षेत्रामध्ये तैनात करण्यात येतील.
  • या बटालियनला आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारवायांसाठी तयार केले जाणार आहे. आपत्ती दरम्यान महिलांना मदत करण्यासाठी यामध्ये विशेष महिला दलही असेल.
  • एनडीआरएफच्या ४ अतिरिक्त बटालियन सुरु करण्याचे मुख्य उद्दीष्ट, आपत्ती दरम्यान त्वरित कारवाई करणे आहे.
  • सुरुवातीला २ बटालियन इंडो-तिबेटियन सीमा पोलिस, १ बटालियन आसाम रायफल्सच्या आणि १ बटालियन सीमा सुरक्षा दलाच्या अंतर्गत सुरु करण्यात येणार आहेत. नंतर या ४ बटालियनांना एनडीआरएफ बटालियनमध्ये रूपांतरित केले जाईल.
  • एनडीआरएफने आपल्या सर्व बटालियनमध्ये २५० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची व्यवस्था केलेली आहे.
  • आपत्तीदरम्यान पीडितांमध्ये अन्न आणि औषधे सारख्या सर्व आवश्यक वस्तू वितरित करण्यासाठी या निधीचा वापर केला जातो.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल
  • इंग्रजी: National Disaster Response Force (NDRF)
  • एनडीआरएफ हे आपत्तीदरम्यान त्वरित कारवाई करणारे दल आहे. याची स्थापन २००६मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५द्वारे करण्यात आली.
  • एनडीआरएफचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. हे दल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.
  • एनडीआरएफसाठी धोरण, नियोजन आणि मार्गदर्शक तत्वे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे (एनडीएमए) तयार केले जाते.
  • नैसर्गिक आपत्ती, मानव निर्मित आपत्ती, अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफ मदत आणि बचावकार्य करते.
  • या काळात एनडीआरएफ जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक संस्थांच्या सहकार्याने कार्य करते.
  • सध्या एनडीआरएफच्या १२ बटालियन देशाच्या वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आल्या आहेत.

चालू घडामोडी : २९ सप्टेंबर

आशिया चषक स्पर्धेचे भारताला विजेतेपद

  • अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारताने बांगलादेशवर मात करत सातव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
  • नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने बांगलादेशला २२२ धावांमध्ये गुंडाळले.
  • मात्र धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव मधल्या षटकांमध्ये काहीसा गडबडला.
  • मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा ३ गडी राखून पराभव केला. अखेरच्या चेंडूवर केदार जाधवने एकेरी धाव काढून भारताला विजय मिळवून दिला.
  • या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या बांगलादेशच्या लिटन दासला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  • तर मालिकेत ५ सामन्यात २ शतकांसह सुमारे ७०च्या सरासरीने ३४२ धावा करणाऱ्या शिखर धवनला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आले.
  • गतविजेत्या भारताने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेत बाजी मारताना सर्वाधिक सातव्यांदा आशिया पटकावला.
  • यापूर्वी भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१० आणि २०१६मध्ये या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते.
  • बांग्लादेश सलग दुसऱ्यांदा तर एकूण तिसऱ्यांदा आशिया चषक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहचला. परंतु एकदाही त्यांना ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
यष्टीमागे ८०० फलंदाजांना बाद करणारा धोनी पहिला भारतीय
  • अंतिम सामन्यातील बांगलादेशचा लिटन दासला बाद करत धोनीने यष्टीमागे ८०० फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम केला.
  • हा विक्रम रचणारा तो पहिला भारतीय ठरला. आतापर्यंत एकाही भारतीय यष्टीरक्षकाला हा आकडा गाठता आलेला नाही.
  • सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत धोनी आता मार्क बाऊचर (९९८ बळी) आणि अॅडम गिलख्रिस्ट (९०५ बळी) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे.
आशिया चषक जिंकणारा रोहित तिसरा मुंबईकर
  • आशिया चषक पटकावणारा रोहित शर्मा हा तिसरा मुंबईकर कर्णधार ठरला आहे.
  • भारताने पहिल्यांदा १९८४साली पहिल्या आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. तेव्हा भारताचे कर्णधार मुंबईकर सुनील गावस्कर होते.
  • त्यांनतर दिलीप वेंगसरकर यांनी भारताला १९८८मध्ये दुसऱ्यांदा आशिया चषकाचे जेतेपद जिंकवून दिले होते. वेंगसरकर हेदेखील मुंबईचेच होते.

अॅगमार्कसाठी ऑनलाइन सॉफ्टवेअरची सुरुवात

  • केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनांच्या अॅगमार्क गुणवत्तेच्या प्रमाणीकरणासाठीच्या अर्जांच्या प्रक्रियेसाठी ऑनलाइन सॉफ्टवेअर सुरू केले आहे.
  • गुणवत्ता नियंत्रण कार्यांच्या अंमलबजावणीसाठी अॅगमार्क ऑनलाइन प्रणाली देशभरात लागू केली जात आहे. ही प्रणाली २४ तास आठवड्याचे सर्व दिवस उपलब्ध असेल.
  • यामुळे अॅगमार्क अर्जांची प्रक्रिया सुलभ, वेगवान आणि पारदर्शक बनेल. ही ऑनलाइन व्यवस्था सुलभ, विश्वासार्ह आणि किफायतशीर आहे.
  • केंद्रीय कृषीमंत्री: राधा मोहन सिंग
अॅगमार्क
  • अॅगमार्क म्हणजे शेती उत्पादनाच्या शुद्धता आणि दर्जासाठी सरकारच्या निरीक्षण आणि विपणन संचालनालयाच्या मानकांनुसार दिलेले प्रमाणपत्र होय.
  • कृषी उत्पादन (ग्रेडिंग व मार्किंग) कायदा, १९३७ (१९८६मध्ये सुधारणा) याद्वारे अॅगमार्क लागू करण्यात आले.
  • सध्या अॅगमार्क मानकामध्ये अन्नधान्य, डाळी, भाजीपाला, फळे आणि भाज्या आणि अर्धप्रक्रिया झालेले खाद्यपदार्थ अशा २०५ वस्तू समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
निरीक्षण व विपणन संचालनालय
  • हे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी, सहकार आणि शेतकरी विभागांतर्गत काम करते.
  • याची स्थापना १९३५मध्येकृषी विपणन धोरण आणि विकासासाठी करण्यातआली होती.
  • हे संचालनालय केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा म्हणून कार्य करते.

निधन: ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर

  • पद्मश्री पुरस्कार विजेते ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे वयाच्या ८४व्या वर्षी आजारामुळे निधन झाले.
  • गोव्यातील बोरी या गावामध्ये १८ नोव्हेंबर १९३४ साली तुळशीदास बोरकर यांचा जन्म झाला होता.
  • गोवा सोडून पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांनी मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम वादनाचे धडे गिरविले.
  • त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी उस्ताद आमीर खान, पं. भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी कलावंतांना साथ केली.
  • शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल २०१६साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
  • त्यांच्या निधनामुळे सोलो हार्मोनियम वादनातील एक आदर्श व्यक्तिमत्व हरपले आहे.

भूकंपानंतर इंडोनेशियाला त्सुनामीचा फटका

  • इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर २८ सप्टेंबर रोजी ७.५ रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसला.
  • नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत सुमारे ४०० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
  • भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने इंडोनेशियात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवतात. यापूर्वी डिसेंबर २०१४मध्ये सुमात्रा बेटावर ९.३ रिश्टर स्केलाचा भूकंप झाला होता.
  • त्यानंतर हिंदी महासागरात आलेल्या त्सुनामीमुळे विविध देशांत २,२०,००० जणांचा मृत्यू झाला होता. त्यात इंडोनेशियाच्या १,६८,००० नागरिकांचा समावेश होता.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची पहिली महासभा भारतात

  • आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्यापहिल्या महासभेचे २ ऑक्टोबर रोजी भारतात आयोजन करण्यात येणार आहे.
  • यासोबतच इंडियन ओशन रिम असोसिएशनची दुसरी अक्षय ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक तसेच जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक बैठक २०१८ या कार्यक्रमांचेही आयोजन २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीत होणार आहेत.
  • त्याशिवाय सौर सहकार्याशी संबंधित व्यापार आणि तांत्रिक वस्तुंचे प्रदर्शनही या दरम्यान नोएडा येथे आयोजित केले जाईल.
  • केंद्रीय नवीकरण आणि अक्षय ऊर्जा विभागाने हे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी
  • इंग्रजी: International Solar Alliance (ISA)
  • भारताचा उपक्रम असलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सुरुवात पॅरिस येथे आयोजित युनायटेड नेशन्स क्लाइमेट चेंज कॉन्फरन्स (COP 21) दरम्यान नोव्हेंबर २०१५मध्ये करणायत आली.
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले होते.
  • ११ मार्च २०१८ हा दिवस आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला गेला.
  • याचे मुख्यालय गुरूग्राम, हरियाणा येथे राष्ट्रीय सौर उर्जा संस्थेमध्ये (NISE) स्थित आहे. भारतात मुख्यालय असलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय अंतर-सरकारी संस्था आहे.
आयएसएची उद्दिष्टे
  • कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यानच्या सौर ऊर्जेच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या १२१ देशांना या पर्यायी ऊर्जेचा शाश्वत विकासासाठी उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • एकत्रित प्रयत्नांद्वारे सौर उर्जेच्या उत्पादनासाठी लागणारी उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा खर्च कमी करणे.
  • मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी २०३०पर्यंत या क्षेत्रात १,००० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणे.

शाश्वत विकास आराखड्यावर स्वाक्षऱ्या

  • नीती आयोग आणि संयुक्त राष्ट्र (भारत) यांनी २०१८ ते २०२२ या काळासाठीच्या शाश्वत विकास आराखड्यावर नवी दिल्ली येथे स्वाक्षऱ्या केल्या.
  • शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताची कटिबद्धता आणि प्रयत्न या करारातून प्रतिबिंबित होत आहेत.
  • या आराखड्यानुसार शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र कार्य करतील.
  • नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि संयुक्त राष्ट्रांचे भारतातील समन्वयक युरी आफान्सीव यांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • सरकारी संस्था, सामाजिक प्रतिनिधी, शिक्षण तसेच खाजगी क्षेत्राशी चर्चा करुन हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
  • दारिद्रय निर्मुलन, नागरीकरण, आरोग्य, पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, अन्न सुरक्षा आणि पोषण आहार, हवामान बदल, स्वच्छ उर्जा, कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार निर्मिती, स्त्री-पुरुष समानता आणि युवा विकास या क्षेत्रावर यामध्ये भर देण्यात आला आहे.
  • यामध्ये कमी उत्पन्न असणाऱ्या बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, ओरिसा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या ७ राज्यांसह ईशान्येकडील राज्ये आणि नीती आयोगाने चिन्हांकित केलेल्या अतिमागास जिल्ह्यांवर भर देण्यात येईल.
  • या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी ११,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून, यापैकी ४७ टक्के निधी सरकारी व खाजगी क्षेत्रासह इतर स्रोतांकडून निर्माण करण्यात येईल.
  • २०१८-२०२२ हा काळ भारताच्या विकास गाथेसाठी महत्वाचा आहे. कारण २०२२मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्णहोत आहेत.

२७ सप्टेंबर: विश्व समुद्री दिन

  • सप्टेंबर महिन्याचा शेवटचा गुरुवार (यावर्षी २७ सप्टेंबर) जगभरात दरवर्षी विश्व समुद्री दिन (वर्ल्ड मरीन डे) म्हणून साजरा केला जातो.
  • याद्वारे शिपिंग सुरक्षिततेचे महत्व, सागरी सुरक्षा व सागरी पर्यावरणाची सुरक्षा तसेच समुद्री उद्योगांवर प्रकाश टाकण्यात येतो.
  • यावर्षीच्या विश्व समुद्री दिनाची थीम: IMO 70: Our Heritage – Better Shipping for a Better Future.
  • इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनतर्फे (आयएमओ) हा दिवस १९७८पासून साजरा केला जातो.
इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन
  • इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन (आयएमओ) ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. ती सागरी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी कार्य करते.
  • या संस्थेची स्थापना १९४८मध्ये जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे आंतरराष्ट्रीय आंतर-सरकारी समुद्री सल्लागार संस्थेच्या स्वरूपात झाली होती.
  • १९८२मध्ये या संस्थचे नामकरण इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन असे करण्यात आले.
  • या संस्थेचे मुख्यालय लंडनयेथे स्थित आहे. या संस्थेचे १७१ सदस्य आणि ३ सहयोगी सदस्य आहेत. १९५९मध्ये भारत आयएमओचा सदस्य बनला.
  • सागरी वाहतुकीसाठी आणि त्याच्या संमतीसाठी एक व्यापक नियामक संरचना विकसित करणे हे आयएमओचे मुख्य कार्य आहे.
  • या संरचनेमध्ये सुरक्षा, कायदेशीर समस्या, पर्यावरणीय समस्या, तांत्रिक सहकार, समुद्री सुरक्षा आणि सागरी वाहतूक दक्षता इत्यादींचा समावेश होतो.

चालू घडामोडी : २८ सप्टेंबर

शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश

  • सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
  • महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे हे घटनाबाह्य असून प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिर प्रवेशाचा हक्क आहे. त्यांना लिंगभेदावरून प्रवेश नाकारता येणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी स्त्री व पुरुषावरून भेदभाव करणे योग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
  • त्यामुळे देशातील सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करण्याचा महिलांचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश एम. खानविलकर, आर. एफ. नरीमन, डी. वाय. चंद्रचूड यांनी महिलांच्या बाजूने एकमताने निर्णय दिला. तर न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांनी शबरीमाला मंदिराच्या बाजूने निर्णय दिला.
का होती मंदिरात प्रवेशबंदी?
  • केरळच्या पत्थनमथिट्टा जिल्ह्यात डोंगरावर शबरीमाला मंदिर आहे. शबरीमाला मंदिरात विराजमान असणारे अयप्पा ब्रह्मचारी आहेत.
  • शबरीमाला यात्रेच्या आधी ४१ दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग ४१ दिवस व्रत करू शकत नाहीत.
  • मासिक पाळीच्या काळात पावित्र्यता जपली जात नाही. त्यामुळे महिलांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे मंदिर प्रबंधन समितीने कोर्टात स्पष्ट केले होते.
  • त्यामुळेच १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. ८०० वर्ष जुन्या या मंदिरात प्रथा-परंपरेचे कारण देऊन महिलांना प्रवेश नाकारला जात होता.
  • न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे शबरीमालातील ८०० वर्षाची परंपरा आता मोडीत निघणार आहे.

बीएसएफ महासंचालकपदी रजनीकांत मिश्रा

  • केंद्रीय निवड समितीने वरिष्ठ आयपीएस अधिकारी रजनीकांत मिश्रा यांची सीमा सुरक्षा बलाचे (बीएसएफ: बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) महासंचालक म्हणून नियुक्ती केली.
  • ते त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजेच ३१ ऑगस्ट २०१९पर्यंत या पदावर काम करतील. सप्टेंबर महिन्याखेर सेवानिवृत्त होत असलेल्या के के शर्मा यांची ते जागा घेतील.
  • रजनीकांत मिश्रा १९८४च्या बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
सीमा सुरक्षा बल
  • सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) भारताच्या पाच निमलश्करी दलांपैकी एक आहे. याला भारतीय प्रदेशाच्या सीमा सुरक्षांची पहिली तुकडीही म्हटले जाते.
  • बीएसएफ शांतिकालात गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते.
  • याची स्थापना १ डिसेंबर १९६५ रोजी करण्यात आली. भारताच्या सीमा सुरक्षित करणे हा बीएसएफचा उद्देश आहे.
  • बीएसएफ जगातील सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल आहे. यात १८६ बटालियन आहेत, ज्यामध्ये २,५७,३६३ कर्मचारी कार्यरत आहेत.
  • यात हवाई (एअर) तुकडी, समुद्री (मरीन) तुकडी, आर्टिलरी रेजिमेंट आणि कमांडो युनिट देखील समाविष्ट आहे.
  • बीएसएफला इंडो-पाक सीमा, भारत-बांग्लादेश सीमा आणि नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्यासह तैनात केले जाते. नक्षलवादी विरोधी कारवायांमध्येही बीएसएफ कार्य करते.

एसएसबी महासंचालकपदी एस एस देसवाल

  • केंद्रीय निवड समितीने वरिष्ठ आयपीएस अधिकारी एस एस देसवाल यांना सशस्त्र सेना बलाचे (एसएसबी) महासंचालक म्हणून नियुक्त केले आहे.
  • ते त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजेच ऑगस्ट २०२१पर्यंत या पदावर काम करतील.
  • १९८४च्या बॅचचे हरियाणा कॅडरचे ते आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते सीमा सुरक्षा बलाचे (बीएसएफ) विशेष महासंचालक म्हणून कार्यरत होते.
सशस्त्र सेना बल
  • सशस्त्र सेना बल (एसएसबी) भारताच्या पाच निमलश्करी दलांपैकी एक आहे. एसएसबीचे कार्य हे नेपाळ आणि भूतानच्या भारताच्या सीमेची सुरक्षा आहे.
  • इन्डो-चीन युद्धानंतर १९६३मध्ये एसएसबीची स्थापना झाली. एसएसबी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
  • ‘सेवा, सुरक्षा आणि बंधुता’ हे एसएसबीचे बोधवाक्य आहे.

निधन: छायाचित्रकार त्यागराज पेंढारकर

  • दो आँखें बारह हाथ, नवरंग अशा गाजलेल्या चित्रपटांचे छायांकन करणारे त्यागराज पेंढारकर यांचे २८ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
  • ज्येष्ठ अभिनेते बाबुराव पेंढारकर यांचे चिरंजीव त्यागराज पेंढारकर यांना सुरुवातीला अभियंता व्हायचे होते. मात्र, यानंतर ते छायाचित्रकार म्हणून काम करु लागले.
  • मुंबईत आल्यावर ते राजकमल स्टुडिओसाठी काम करु लागले. सहाय्यक कॅमेरामन व मग मुख्य कॅमेरामन म्हणून त्यांनी छाप पाडली.
  • मराठी, हिंदीसह गुजरात व मद्रासी सिनेसृष्टीतही त्यांनी काम केले. दो आँखें बारह हाथ, राजकमल, नवरंग, श्री ४२० अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले.
  • मराठीत त्यांनी यशोदा, आंधळा मारतो डोळा, देवा शपथ खर सांगेन या चित्रपटांसाठी काम केले.
  • अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी हा पुरस्कार, एस. एन फिल्म सोसायटीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार, व्ही शांताराम व दादासाहेब फाळके तांत्रिक क्षेत्रातील पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.

२६ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय आण्विक शस्त्रे उन्मूलन दिवस

  • २६ सप्टेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय आण्विक शस्त्रे संपूर्ण उन्मूलन दिवस म्हणून पाळला जातो.
  • आण्विक निशस्त्रीकरणासाठी जागतिक समुदायाची वचनबद्धता दर्शविणे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
  • लोकांना आणि नेत्यांना परमाणु शस्त्रांच्या धोक्यांविषयी जागरूक करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे.
पार्श्वभूमी
  • डिसेंबर २०१३मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने आंतरराष्ट्रीय आण्विक संपूर्ण उन्मूलन दिन जाहीर केला होता.
  • २६ सप्टेंबर २०१३ रोजी न्यूयॉर्क येथे परमाणु निशस्त्रीकरणाबद्दल उच्चस्तरीय बैठक आयोजित केली गेली.
  • टीप: संयुक्त राष्ट्र महासभा २९ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय परमाणु परीक्षण निषेध दिवस म्हणून साजरा करते.

लोकपालसाठी ८ सदस्यीय शोध समिती स्थापन

  • २७ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्र सरकारने भ्रष्टाचारविरोधी संस्था लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नावाची शिफारस करण्यासाठी ८ सदस्यीय शोध समिती स्थापन केली.
  • ही समिती लोकपालच्या उमेदवारांचा शोध घेईल आणि नंतर सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस करेल.
  • या समितीच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची निवड करण्यात आली आहे.
  • लोकपाल (लोकायुक्त) कायदा २०१३मध्ये पारित केल्यानंतर ४ वर्षांनी लोकपाल शोध समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • लोकपाल निवड समितीचे अध्यक्ष हे पंतप्रधान आहेत. याशिवाय लोकसभा अध्यक्ष, लोकसभेटील विरोधी पक्षनेते, देशाचे सरन्यायाधीश किंवा त्यांनी शिफारस केलेला सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायाधीश आणि राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित एक नामवंत कायदेपंडित यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
लोकपाल शोध समितीचे सदस्य:
  • अध्यक्ष: सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई.
  • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य.
  • प्रसार भारतीचे प्रमुख ए सूर्यप्रकाश.
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) माजी चेअरमन किरण कुमार.
  • अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. सखाराम सिंह यादव.
  • गुजरात पोलिसांचे माजी प्रमुख शबीर हुसेन एस. खांडवाला.
  • राजस्थान कॅडरचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी ललित पवार.
  • माजी सॉलिसिटर जनरल रंजीत कुमार.
लोकपालचे फायदेः
  • लोकपालकडे सैन्याला वगळता पंतप्रधानापासून शिपायापर्यंतच्या (सरकारी अधिकारी, मंत्री, पंचायत सदस्य ई.) कोणत्याही लोकसेवकाच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारीसाठी खटला चालविण्याचा अधिकार असेल.
  • विशेष परिस्थितीत, लोकपालाकडे एखाद्या व्यक्तीविरूद्ध न्यायालयीन खटला चालवण्याचा आणि त्याला २ लाखांचा दंड ठोठावण्याचा अधिकार असेल.

जीएसटीएनला सरकारी कंपनीमध्ये परिवर्तीत करण्यासाठी मंजुरी

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्तू आणि सेवा नेटवर्कला (GSTN) सरकारी कंपनीमध्ये परिवर्तीत करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता जीएसटीएनमध्ये सरकारची १०० टक्के हिस्सेदारी असेल.
  • जीएसटीएनच्या माध्यामतून वस्तू आणि सेवा कर भरणा, नोंदणी, परतावा प्रक्रिया, रीटर्न फायलिंग इ. कार्ये केली जातात.
पार्श्वभूमी
  • मे २०१८मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कराची बैठक झाली, ज्यामध्ये राज्याचे अर्थमंत्र्यांनी देखील भाग घेतला.
  • या बैठकीत जीएसटीएनला सरकारी कंपनी म्हणून परिवर्तीत करण्यास संमती देण्यात आली होती.
  • यानुसार जीएसटीएनमध्ये केंद्र आणि राज्य सरकारची प्रत्येकी ५० टक्के भागीदारी करण्याचे ठरविण्यात आले.
  • जीएसटीएन पोर्टलवर १.१ कोटीहून अधिक व्यापारी कंपन्या नोंदणीकृत आहेत.
  • जीएसटीएन कर संग्रहापासून डेटा ॲनालिटिक्ससारखी सर्व कामे करते, त्यामुळे सरकारने या कंपनीला सरकारच्या अधिपत्याखाली आणण्याचा निर्णय घेतला.
वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (जीएसटीएन)
  • जीएसटीएनची स्थापना २०१३मध्ये ना-नफा तत्वावर कार्य करणारी, गैरसरकारी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून झाली.
  • वस्तू व सेवा करासाठी आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सेवा प्रदान करण्यासाठी जीएसटीएनची स्थापना केली गेली.
  • स्टॉकहोल्डर्स, टॅक्सपेयर्स आणि सरकार या तिघांनाही लागणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा जीएसटीएन पुरविते.
  • सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांचा जीएसटीएनमध्ये ४९ टक्के (प्रत्येकी २४.५ टक्के) हिस्सा आहे.
  • तसेच आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकांचा प्रत्येकी १०-१० टक्के, तर एचडीएफसीचा १० टक्के वाटा आहे.
  • याशिवाय एनएसई स्ट्रॅटेजिक इनव्हेस्टमेंट कंपनीचा ११ टक्के आणि एलआयसीचा १० टक्के वाटा आहे.

भारत आणि मोरोक्कोदरम्यान दोन करार

  • संरक्षण क्षेत्रामध्ये द्विपक्षीय सहकार्याला प्रात्साहन देण्यास भारत आणि मोरोक्को यांच्यामध्ये सहमती झाली.
  • मोरोक्कोचे संरक्षण मंत्री अब्देलिट लुदेडी आणि भारतीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यातील नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मोरक्कोच्या संरक्षण मंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
  • या बैठकीत हायड्रोग्राफी, शांतता मिशन, टेलिमेडिसिन, माहिती व तंत्रज्ञान, दहशतवादविरोधी कारवाया या विषयांवरही द्विपक्षीय सहकार्यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे.
  • त्याचबरोबर जहाज बांधकाम क्षेत्रामध्ये संरक्षण सहकार्याबद्दलही चर्चा झाली. दोन्ही देशांनी यावेळी खालील दोन द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी केली
  • सायबर सिक्युरिटी क्षेत्रात इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) आणि मोरक्कन कॉम्प्यूटर रिस्पॉन्स टीम (MA-CERT) यांच्यातील सहकार्यासाठी करार.
  • बाह्य अंतराळ क्षेत्राचा शांततापूर्ण कार्यासाठी वापर करण्यासाठी इस्रो आणि मोरक्कन रिमोट सेंसिंग सेंटर यांच्यातील सहकार्य करार.

भारतातील सर्वात मोठी सायक्लोट्रॉन सुविधा कार्यान्वित

  • कोलकाता येथील व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन केंद्रात भारतातील सर्वात मोठी सायक्लोन-३० ही मेडिकल सायक्लोट्रॉन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. हे केंद्र अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत कार्य करते.
  • ही सुविधा संपूर्ण देशासाठी विशेषत: पूर्व भारतासाठी किफायतशीर रेडिओ आयसोटोप्स आणि रेडिओ फार्मासिटीकल्स उपलब्ध करेल.
  • सायक्लोट्रॉनचा वापर कर्करोग निदान आणि उपचारांसाठी रेडिओ आयसोटोप (समस्थानिके) तयार करण्यासाठी केला जातो. या रेडिओ आयसोटोपद्वारे कर्करोगाच्या पेशी विकिरणाने नष्ट करता येतात.
  • देशातील अशी एकमेव सुविधा आहे, जिथे जर्मेनियम ६८च्या रेडिओ आयसोटोपचे उत्पादन केले जाईल. याचा वापर स्तनांच्या कर्करोग निदानासाठी केला जातो.
  • या सायक्लोट्रॉनमध्ये पॅलेडियम १०३च्या रेडिओ आयोटोपचेही उत्पादन केले जाईल. प्रोस्टेट कर्करोगाच्या उपचारात याचा वापर होतो.
  • आयोडीन १२३ आयोटोपचेदेखील भविष्यात या सुविधेत तयार होईल, ज्याद्वारे थायरॉईड कर्करोगाचे निदान केले जाऊ शकते.
  • या सायक्लोट्रॉनच्या मदतीने रेडिओ आयसोटोप स्वस्त दरात उपलब्ध होतील आणि त्यामुळे त्यांची आयातदेखील कमी होईल. भविष्यात भारता हे रेडिओ आयसोटोप निर्यातही करू शकतो.
  • भारत जर्मेनियम ६८ आणि गॅलियम ६८ची निर्मितीदेखील करू शकेल. भौतिक विज्ञान आणि आण्विक भौतिकी संशोधनासाठी यांचा वापर होतो.
पार्श्वभूमी
  • लँसेट ग्लोबल हेल्थच्या अभ्यासानुसार, २०१६मध्ये भारतात ८.३ लाख मृत्यू कर्करोगाने झाले होते.
  • सध्याकर्करोगाच्या उपचारांसाठी रेडिओ आयसोटोप आयात करावे लागतात. तर काही आयसोटोप अप्सरा अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये निर्माण केले जातात.
  • देशातील बहुतेक सायक्लोट्रॉन सुविधा खासगी रुग्णालयात आहेत, त्यामुळे कर्करोगाचा उपचार खूप महाग होतो.

सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोर्टल सुरू

  • गृह मंत्रालयाने बालके आणि महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी www.cybercrime.gov.in हे पोर्टल सुरू केले आहे.
  • या पोर्टलद्वारे ऑनलाइन आक्षेपार्ह सामग्रीवर बंदी घातली जाईल. या पोर्टलद्वारे लोक आपली ओळख न उघडता तक्रार दाखल करू शकतात.
  • या पोर्टलद्वारे, समाजातील जबाबदार नागरिक ऑनलाइन बाल अश्लीलता (पोर्नोग्राफी) आणि इतर लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित सामग्रीविरुद्ध तक्रार नोंदवू शकतात.
  • तक्रारदार आपत्तीजनक सामग्रीची लिंक अपलोड करू शकतो, ज्यामुळे राज्य पोलिसांना त्यावर प्रतिबंध घालण्यात मदत होईल.
  • नॅशनल क्राइम रिकॉर्ड्स ब्यूरो (एनसीआरबी) अशी आक्षेपार्ह सामग्री चिन्हांकित करेल आणि इंटरनेटवरून ते काढण्यासाठी पावले उचलेल.
  • यासाठी एनसीआरबीला माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९ (३) बी अंतर्गत नोडल एजन्सीचा दर्जा देण्यात आला आहे.

चालू घडामोडी : २७ सप्टेंबर

व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे आयपीसी कलम ४९७ रद्द

  • विवाहबाह्य संबंध (व्यभिचार) हा गुन्हा ठरवणारे भारतीय दंड विधानातील (आयपीसी) कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. ए एम खानविलकर, न्या. आर एफ नरिमन, न्या. डी वाय चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा या घटनापीठाने हा निर्णय दिला.
  • अनिवासी भारतीय असलेले जोसेफ शाइन यांनी वकील सुविदुत सुंदरम यांच्या मार्फत कलम ४९७च्या वैधतेला आव्हान दिले होते. यात गुन्हेगारी दंडसंहिता कलम १९८(२)चाही समावेश आहे.
  • व्यभिचारात केवळ पुरूषांनाच दोषी ठरवून शिक्षा केली जाते, याबाबत स्त्रियांचाही विचार समान पातळीवर करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
  • जानेवारी २०१८मध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या तीन सदस्यीय पीठाने ही जनहित याचिका घटनापीठाकडे सुनावणीसाठी दिली होती.
या निकालातील ठळक मुद्दे:
  • पती हा पत्नीचा मालक नाही. महिलेचा सन्मान करणे महत्त्वाचे. आयपीसीचे कलम ४९७ हे महिलांच्या सन्मानाविरोधात आहे.
  • व्यभिचार हा गुन्हा नसला तरी पतीच्या विवाहबाह्य संबंधातून पत्नीने आत्महत्या केल्यास पुराव्यानिशी पतीविरोधात खटला चालवला जाऊ शकतो.
  • व्यभिचार हा गुन्हा नसला तरी विवाहबाह्य संबंधाच्या कारणाने स्त्री किंवा पुरुष दोघांनाही घटस्फोट घेता येऊ शकतो.
  • भारतीय दंड विधानातील हे कलम ४९७ असंवैधानिक.
भादंवि कलम ४९७
  • यानुसार एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या पुरूषाच्या पत्नीशी त्याच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवले तर तो बलात्कार ठरत नाही, तर त्याला व्यभिचाराचा गुन्हा म्हणतात.
  • त्यानुसार विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या विवाहित पुरुषाविरोधात संबंधित महिलेचा पती तक्रार दाखल करू शकत होता. यात ५ वर्षे तुरूंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होते.
  • पण संबंधित स्त्री जी असे लैंगिक संबंध ठेवते तिला दोषी धरले जात नाही किंवा शिक्षाही दिली जात नाही.
  • या कलमानुसार केवळ संबंधित महिलेच्या पतीने गुन्हा दाखल केला तरच गुन्हा नोंद होतो. तिचा मुलगा, मुलगी किंवा इतर नातेवाईक गुन्हा नोंद करू शकत नाहीत.
  • त्यामुळे या कायद्यातून पत्नी ही पतीची खाजगी मालमत्ता असल्याचेच अधोरेखित होते.
  • पतीने दुसऱ्या महिलेसोबत शरीर संबंध ठेवले तर त्या पुरुषाची पत्नी पती किंवा संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करू शकत नाही. तशी या कायद्यात तरतूद नाही.
  • यात केवळ विवाहित महिलेशी लैंगिक संबंध ठेवणे हा व्यभिचार ठरतो. विधवा, वेश्या किंवा अविवाहित महिलांना हे कलम लागू होत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने ब्रिज लाल विरूद्ध राज्य सरकार (१९९६) खटल्यात स्पष्ट केले होते.
  • हे कलम १५८ वर्षे जुने आहे. १९५४, १९८५ व १९८८ या तीन निकालात आयपीसी कलम ४९७ वैध ठरवण्यात आले होते.

३ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात स्टार्ट अप इंडिया यात्रा

  • ३ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात स्टार्ट अप इंडिया यात्रा सुरु होणार असून केंद्रीय वाणिज्य, उद्योग व हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत राजभवनात याचा प्रारंभ होणार आहे.
  • महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कामगार आणि कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
  • गुजरात, उत्तर प्रदेश, ओदिशा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आंध्र प्रदेश आणि तेलंगण इथे यशस्वी ठरलेली स्टार्ट अप इंडिया यात्रा आता महाराष्ट्रात दाखल होत आहे.
  • नवकल्पना घेऊन येणाऱ्या व्यक्तींसाठी आणि स्टार्ट अपसाठी आवश्यक त्या सुविधांनीयुक्त अशी स्टार्ट अप इंडिया यात्रा व्हॅन राज्यभरात फिरणार आहे.
  • ही व्हॅन १६ जिल्ह्यातून २३ थांबे आणि १४ बूट कॅम्प घेत३ नोव्हेंबर रोजी नागपूरला पोहचेल, जेथे या यात्रेचा समारोप होणार आहे.
  • बूट कॅम्पमध्ये स्टार्ट अप इंडिया आणि महाराष्ट्र स्टार्ट अप धोरण यावर सादरीकरण होणार आहे.
  • या यात्रेत सहभागी होण्यासाठी www.startupindia.gov.inवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • उद्योजकता कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि नव उद्योजकांच्या कल्पनांना मूर्त स्वरुप देत, त्यांचा स्टार्ट अप विकसित करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने स्टार्ट अप इंडिया उपक्रमाअंतर्गत स्टार्ट अप इंडिया यात्रा सुरु करण्यात आली आहे.

साखर उद्योगाला ५५०० हजार कोटींची आर्थिक मदत

  • देशातील साखर उद्योगाला आधार देण्यासाठी केंद्र सरकारने ५५०० हजार कोटींची आर्थिक मदत देऊ केली आहे.
  • ही आर्थिक मदत मुख्यत्वे साखरेच्या निर्यातीसाठी दिली जाणार असून ती वाहतूक अनुदानाच्या स्वरूपात मिळेल.
  • बंदरापासून १०० किमी अंतरासाठी प्रतिटन १००० रुपये, १०० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी प्रतिटन २५०० रुपये आणि सागरी किनारा नसलेल्या राज्यांतील साखर कारखान्यांना प्रतिटन ३००० रुपये वाहतूक अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी १३७५ कोटींची तरतूद केंद्र सरकार करणार आहे.
  • आगामी हंगामात किमान ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट राहणर आहे.
  • गेल्या तीन महिन्यांतील केंद्राने साखर उद्योगाला दिलेली ही दुसरी आर्थिक मदत असून जून महिन्यात ८५०० हजार कोटींचे सहाय्य दिले होते.
  • गेल्यावर्षी तसेच यंदाही साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. २ महिन्यांत सुरू होणाऱ्या आगामी हंगामातही साखरेचे अधिक उत्पादन होणार असल्याने कारखान्यांमध्ये साखर पडून राहील.
  • सध्या १०० टन साखरेचा साठा असून आगामी हंगामात सुमारे ४५० टन साखरेचे उत्पादन होईल. त्यामुळे पुन्हा साखरेचे भाव घसरण्याची शक्यता आहे.
  • केंद्र सरकारने साखरेची किमान किंमत प्रतिकिलो ३२ रुपये केली असली तरी साखरेच्या जादा साठ्यामुळे निर्यातीशिवाय पर्याय नाही.
  • याशिवाय, शेतकऱ्यांचे देणे फेडण्यासाठी सरकार साखर कारखान्यांना उत्पादनसाह्य देणार आहे.
  • साखर कारखानदारांकडे असलेल्या १३ हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमध्ये सर्वाधिक थकबाकी ही उत्तर प्रदेशमधील कारखानदारांची आहे.

निधन: लेखिका आणि कवयित्री कविता महाजन

  • ब्र, भिन्न आणि कुहू या गाजलेल्या कादंबरींच्या मराठीतील संवेदनशील लेखिका आणि कवयित्री कविता महाजन यांचे २७ सप्टेंबर रोजी वयाच्या ५१व्या वर्षी आजाराने निधन झाले.
  • कविता महाजन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६७ रोजी नांदेडमध्ये झाला. मराठी विश्वकोषाचे माजी सचिव एस. डी. महाजन हे त्यांचे वडील.
  • नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मराठी साहित्य या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली होती.
  • ‘ब्र’ कादंबरीसाठी त्यांना मानाच्या साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
  • त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार २००८मध्ये मिळाला होता.
  • याचबरोबर ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कार व कवयित्री बहिणाबाई पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
  • रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या त्यांनी केलेल्या अनुवादाला साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
  • महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात काम केले होते. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता.
  • आदिवासी समाज व महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले. आपल्या लेखनातून या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले.

दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाला आळा घालणाऱ्या उपकरणाचे उद्घाटन

  • केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘वायू’ या प्रदूषण नियंत्रण उपकरणाचे उद्घाटन केले.
  • हे उपकरण नवी दिल्लीतल्या आयटीओ आणि मुबारका चौकात बसविण्यात आले आहे. हे उपकरण हवेतील हानिकारक घटकांना शोषून घेते.
WAYU (Wind Augmentation PurifYing Unit)
  • वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था (CSIR) तसेच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) यांनी संयुक्तरित्या हे उपकरण विकसित केले आहे.
  • या उपकरणामुळे ५०० मीटर चौरस क्षेत्रफळातील हवा शुद्ध होईल.
  • हे उपकरण वीजेवर चालणारे असून त्याच्या देखभालीसाठी महिना १५०० रुपये खर्च येतो.
  • हे उपकरण प्रदुषकांच्या कणांना फिल्टर करते आणि हानिकारक वायूंना सक्रिय चारकोल आणि युव्ही दिव्यांच्या सहाय्याने शुद्ध करते.
  • अशाच प्रकारची आणखी उपकरणे दिल्लीमध्ये लावून १०,००० चौरस मीटर क्षेत्रफळातील हवा शुद्ध करण्याचा सरकारचा मानस आहे.

आंध्रप्रदेशमधील २ सागरकिनारा पर्यटन परीक्रमांचे उद्घाटन

  • उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी स्वदेश दर्शन योजनेंतर्गत आंध्रप्रदेशमधील दोन सागरकिनारा पर्यटन परीक्रमांचे (सर्किट) उद्घाटन केले.
  • आंध्रप्रदेशच्या सागर किनाऱ्यालगतच्या भागातील पर्यटनाला प्रोत्साहन देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
  • प्रथम सागरकिनारा परीक्रमा: यामध्ये नेल्लोर टँक, पुलिकत सरोवर, नेलापट्टू पक्षी अभ्यारण्य, उब्बाला, मेपडू, राम तीर्थम तसेच इसुकापल्ली इत्यादी प्रेक्षणीय स्थळांचे सुशोभिकरण आणि विकास करण्यात येणार आहे.
  • द्वितीय सागरकिनारा परीक्रमा: यामध्ये काकीनाडा बंदर, कोरिंगा वन्यजीव अभ्यारण्य, होप बेट इत्यादींचा विकास करण्यात येईल. याशिवाय अदूरू, पस्सारलापुडी आणि यनम याठिकाणी लाकडाच्या झोपड्या बांधण्यात येणार आहेत.
स्वदेश दर्शन योजना
  • देशात विषय (थीम) आधारित पर्यटन परिक्रमा (सर्किट) प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन योजना’ ९ मार्च २०१५ रोजी सुरू करण्यात आली.
  • या पर्यटन प्रकल्पांना एका एकात्मिक पद्धतीने उच्च पर्यटन मूल्य, स्पर्धात्मकता आणि स्थायित्व अश्या सिद्धांतांवर विकसित केले जाणार आहे.
  • देशाच्या पर्यटनासाठी पायाभूत घटकांचा विकास करणे आणि देशातील पर्यटनाला चालना देणे, हे या योजनेचे मुख्य हेतू आहे.
  • या योजनेंतर्गत विकासासाठी सुरुवातीला पुढील १३ पर्यटन परिक्रमा प्रकल्प निवडण्यात आले आहेत: बुद्धिस्ट परिक्रमा, ईशान्य भारत परिक्रमा, सागरकिनारा परिक्रमा, हिमालय परिक्रमा, कृष्ण परिक्रमा, वाळवंट परिक्रमा, पर्यावरणीय परिक्रमा, वन्यजीव परिक्रमा, आदिवासी परिक्रमा, ग्रामीण परिक्रमा, धार्मिक परिक्रमा, रामायण परिक्रमा आणि वारसा परिक्रमा.
  • ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. या प्रकल्पांसाठी राज्यांना त्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाच्या अहवालानुसार निधी देण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींचा चॅम्पियन्स ऑफ अर्थ पुरस्काराने गौरव

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त राष्ट्र संघाने पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या ‘चॅम्पियन्स ऑफ अर्थ’ या पुरस्काराने गौरव केला आहे.
  • ‘पॉलिटिकल लीडरशीप’ या विभागात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असून, त्यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सौरऊर्जा (इंटरनॅशनल सोलर अलायंस) व पर्यावरणाबाबत जागृती केल्याबद्दल या दोन्ही नेत्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
  • मोदींना २०२२पर्यंत देशात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्धाराबद्दल तर इमॅन्युअल मॅक्रोन यांना पर्यावरणसंबंधी वैश्विक करार करण्यासाठी हा पुरस्कार दिला आहे.
  • पर्यावरणसंदर्भात जागतिक स्तरावर प्रभावी नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदींनी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०२२पर्यंत प्लास्टिकमुक्त भारत करण्याचा दृढनिश्चय केला आहे.
  • याशिवाय केरळमधील कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शाश्वत ऊर्जा क्षेत्रातील गतीमानतेसाठी दूरदृष्टि दाखविल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्णपणे सौरउर्जेवर चालणारे विमानतळ आहे.
  • चीनच्या जिनझियांग ग्रीन रुरल प्रोग्रामचीही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्तुती करण्यात आली असून त्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  • संयुक्त राष्ट्राने (यूएन) पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगातील ६ व्यक्ती वा संस्थांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
चॅम्पियन ऑफ द अर्थ
  • संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने (यूएनईपी) २००५मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली.
  • पर्यावरणसंदर्भात कार्याचे नेतृत्व करणाऱ्या खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील अथवा नागरी समाजातील व्यक्तींचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात करणात आली.
  • २०१७मध्ये या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला आणि यात ‘यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या पुरस्काराचा समावेश करण्यात आला.
  • १८ ते ३० वयोगटातील सकारात्मक पर्यावरणीय वातावरण निर्मितीसाठी प्रतिभावान नवप्रवर्तनकांणा हा पुरस्कार दिला जातो.

अस्त्र या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

  • भारतीय वायुसेनेने २६ सप्टेंबर २०१८ रोजी हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे सुखोई-३० या लढाऊ विमानातून यशस्वी परीक्षण केले.
  • हे क्षेपणास्त्र दृष्टीपलीकडच्या लक्ष्याचा भेद घेण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र भारतातच निर्मित आणि विकसित करण्यात आले आहे.
  • भारताच्या संरक्षण ताफ्यात क्षेपणास्त्राचा समावेश करण्यापूर्वीची ही अंतिम चाचणी असल्यामुळे, हे परीक्षण विशेष महत्वाचे होते.
अस्त्र क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये:
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले हे क्षेपणास्त्र दृष्टीपलीकडच्या लक्ष्याचा भेद घेण्यास सक्षम आहे.
  • हे भारताने विकसित केलेले हवेत्रून हवेत मारा करणारे पहिलेच क्षेपणास्त्र आहे.
  • हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र विमान चालकाला ८० किमी अंतरावरुन शत्रूच्या विमानाचा वेध घेण्याची व त्याला नष्ट करण्याची क्षमता देते.
  • डीआरडीओने हे क्षेपणास्त्र मिराज २००० एच, मिग २९, सी हॉरियर, मिग २१, एचएएल तेजस आणि सुखोई एसयु ३० एमकेआय या सर्व विमानांमध्ये वापरण्यासाठी अनुकूल बनविले आहे.
  • हे क्षेपणास्त्र घन इंधनाचा वापर करते. डीआरडीओ या क्षेपणास्त्रासाठी आकाश या क्षेपणास्त्राप्रमाणे प्रक्षेपण प्रक्रिया विकसित करू इच्छित आहे.

सरकारकडून वित्तीय समावेशन निर्देशांक लाँच

  • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीमध्ये वित्तीय समावेशन निर्देशांक (Financial Inclusion Index) लाँच केला.
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सीईओसोबतच्या वार्षिक कामगिरी समीक्षा बैठकीनंतर हा निर्देशांक लाँच करण्यात आला.
  • हा निर्देशांक वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्त सेवा विभागाद्वारे दरवर्षी जारी केला जाईल.
  • या निर्देशांकामध्ये बचत, प्रेषण, पत, विमा आणि निवृत्तीवेतन इत्यादीसारख्या वित्तीय सेवांचा समावेश आहे.
  • यामध्ये वित्तीय सेवांचा आवाका, वित्तीय सेवांचा उपयोग तसेच वित्तीय सेवांची गुणवत्ता या तीन पैलूंचा प्रामुख्याने अभ्यास केला जाईल:.
  • यामुळे सरकारला राष्ट्रीय पातळीवर वित्तीय समावेशनाच्या स्तराची माहिती मिळू शकेल. या निर्देशांकाचे विभिन्न अंतर्गत धोरणाची निर्मिती करण्यासाठी उपयोगी ठरतील.

सातारा: देशात सर्वांत स्वच्छ जिल्हा

  • स्वच्छ सर्वेक्षण २०१८ (ग्रामीण)मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात सर्वांत स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळवला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑक्‍टोबरला राष्ट्रपती भवनात सातारा जिल्हा परिषदेला हे पारितोषिक दिले जाणार आहे.
  • सातारा जिल्हा परिषदेने यापूर्वी शौचालय बांधून हागणदारीमुक्‍त जिल्हा करण्यात देशात तृतीय क्रमांक मिळवला होता.
  • देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्रालयाने सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये संख्यात्मक व गुणात्मक १०० गुणांचे सर्वेक्षण केले होते.
  • सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेच्या निरीक्षणास ३० गुण; नागरिक, मुख्य प्रभावी व्यक्‍तींची स्वच्छतेबाबतची माहिती, मते व अभिप्रायास ३५ गुण व स्वच्छताविषयक सद्यःस्थितीला ३५ असे १०० गुणांकामध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
  • या सर्वेक्षणात देशातील ६९८ जिल्ह्यातील ६९८० खेडी सहभागी झाली होती. त्यात सातारा जिल्ह्याने देशात सर्वाधिक गुण मिळविले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ९३ वर्षे पूर्ण

  • आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होऊन ९३ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने संघाशी निगडित गोष्टींचा घेतलेला आढावा…
  • उजव्या विचारसरणीचे म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ रोजी करण्यात आली.
  • डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरमध्ये संघाची स्थापना केली. देशसेवेसाठी तयार करण्यात आलेली संघटना म्हणून संघाची ओळख सांगितली जाते.
  • हिंदू राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूना एकत्र करण्याचे काम करणे हे संघटनेचे स्थापनेच्या वेळचे मुख्य उद्दीष्ट होते.
  • संघाच्या देशातच नाही तर जगभरात शाखा भरतात. याठिकाणी लहान मुलांचे विविध खेळ घेतले जातात. तसेच त्यांना मूल्यशिक्षण दिले जाते.
  • भारतीय जनता पार्टी हा देशात आणि राज्यातही सत्तेत असणारा देशातील एक प्रमुख पक्ष संघाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते.
  • संघावर स्थापना झाल्यापासून तीन वेळा बंदी घालण्यात आली होती. १९४८मध्ये गांधींची हत्या झाल्यानंतर, १९७५-७७ या आणीबाणीच्या काळात आणि बाबरी मशीद प्रकरणानंतर १९९२मध्ये ही बंदी घातली गेली.
  • संघात येणाऱ्या स्वयंसेवकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यासाठी कालांतराने संघाच्या प्रशिक्षण वर्गाची योजना करण्यात आली. हे वर्ग विविध स्तरावर आजही घेतले जातात.
  • या शिबिराला ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प म्हटले जात. मात्र संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांनी या शिबिराचे नामकरण संघ शिक्षा वर्ग असे केले.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास, भूमिका, कामाची पद्धती यांबाबत संघाच्या वर्गात माहिती दिली जाते.
  • त्याचबरोबर विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवर वैचारिक बैठक पक्की होण्यासाठी बौद्धिक वर्गांचेही आयोजन केले जाते.
  • माधव गोळवलकर गुरुजी हे संघाचे दुसरे प्रभावी सरसंघचालक होते. त्यांनी सर्वाधिक म्हणजे ३५ वर्षे सरसंघचालक म्हणून काम पाहिले.

चालू घडामोडी : २६ सप्टेंबर

आधार वैध परंतु बंधनकारक नाही : सर्वोच्च न्यायालय

  • केंद्र सरकारच्या बहुचर्चित आधार विधेयकाच्या वैधतेबाबतचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने आधार विधेयक वैध असल्याचा निकाल देताना, ते धन विधेयक असल्याचा निर्णयही न्यायालयाने दिला आहे.
  • आधारला वैध ठरवतानाच सर्वोच्च न्यायालयाने आधार अॅक्टमधील ३३(२) हे कलम मात्र रद्द केले आहे.
  • या कलमानुसार नागरिकांच्या प्रमाणीकरणाची माहिती (ऑथेंटिकेशन डेटा) पाच वर्षांपर्यंत साठवून ठेवण्याची तरतूद होती.
  • जी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून केवळ ६ महिनेच ही माहिती साठवता येईल, असा आदेश दिला.
  • सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. ए. के. सिकरी, न्या. धनंजय चेद्रचूड, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. अशोक भूषण या घटनापीठाने हा निकाल दिला.
  • चार विरुद्ध एक अशा मताने हा निर्णय देण्यात आला. या पाच न्यायाधीशांमध्ये केवळ न्या. चेद्रचूड यांनी आधारच्या वैधतेला विरोध केला.
या निकालातील ठळक मुद्दे:
  • आधार कार्ड सुरक्षित असून यामुळे गरीबांना बळ मिळाले आहे. आधार कार्ड सर्वसामान्यांची ओळख आहे.
  • आधारशी संबंधित नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राखण्यासाठी पुरेशी उपाययोजना आहे. आधारच्या माध्यमातून नागरिकांवरती टेहळणी करणे अत्यंत कठीण.
  • आधारच्या माध्यमातून नागरिकांच्या खासगीपणाच्या अधिकारावर गदा येईल तसेच त्यांच्यावर नजर ठेवता येईल या आक्षेपांना नाकारले.
  • आधार कार्डचे प्रमाणीकरण अयशस्वी झाल्याचे कारण देऊन सामान्य व्यक्तींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ नाकारता येणार नाही.
  • सीबीएसई विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी आधारची सक्ती करु शकत नाही. तसेच शाळेतील प्रवेशासाठीही आधारसक्ती करता येणार नाही.
  • बँक खाते, मोबाईल क्रमांक आधारशी जोडणे बंधनकारक नसेल.
  • १४ वर्षांखालील मुलांकडे आधार नसल्यास त्यांना केंद्र आणि सरकारच्या योजनांचा लाभ मिळेल. त्यांना योजनांच्या लाभापासून वंचित ठेवता येणार नाही.
  • सीबीएसई, नीट आणि यूजीसी परीक्षांसाठी आधारसक्ती नाही.
  • घुसखोरांना आधारकार्ड मिळणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी.
  • आधार कायद्यातील कलम ५७ अवैध. कोणत्याही खासगी कंपनीला आधारकार्ड मागता येणार नाही.
पार्श्वभूमी
  • कॉंग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात २००९-१०मध्ये देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार क्रमांक देण्याची योजना अंमलात आणण्यात आली होती.
  • सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेटपणे पोहोचविण्यासाठी आणि देशातील नागरिकांची माहिती सरकारकडे संकलित करण्यासाठी ही योजना आणण्यात आली होती.
  • त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्यारालोआने याला विरोध केला होता. परंतु, सत्तेवर येताच त्यांनी आपली भूमिका बदलली.
  • एनडीएसरकारने आधार एक महत्वकांक्षी योजना असल्याचे सांगत यात ९० टक्के बदल करुन २०१६मध्ये सभागृहात आधार विधेयक सादर केले.
  • सुरुवातीपासून त्याला वेगवेगळ्या स्तरावर आक्षेप घेण्यात आले. आधार कार्डच्या सक्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
  • आधार योजना गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी असल्याचा मुद्दा अनेक याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला होता.
  • भाजपने मार्च २०१६मध्ये आधार विधेयक धन विधेयकाच्या स्वरुपात पास करुन घेतले. त्यामुळे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारच्या या कृत्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
धन विधेयकाबद्दल
  • राज्यघटनेच्या कलम ११०मध्ये धन विधेयकाविषयी तरतूद करण्यात आली आहे. धन विधेयक प्रथम लोकसभेतच मांडता येते. त्याला राज्यसभेच्या मंजुरीची गरज नसते.
  • एखादे विधेयक धन विधेयक आहे कि नाही, हे ठरविण्याचा अंतिम अधिकार लोकसभा अध्यक्षांना असतो.
  • लोकसभेने मंजूर केल्यानंतर ते राज्यसभेकडे पाठवण्यात येते. राज्यसभेला ते परत करण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार नसतो. राज्यसभेला ते १४ दिवसांमध्ये पुन्हा लोकसभेत पाठवणे बंधनकारक असते.
  • राज्यसभेच्या सूचना स्वीकारणे, नाकारणे आदी सगळे अधिकार लोकसभेला असतात, व लोकसभा जो निर्णय घेईल तो अंतिम असतो.
  • त्यामुळे धन विधेयक राज्यसभेच्या कुठल्याही मंजुरीशिवाय लोकसभेने संमत केले असल्यास राष्ट्रपतींनाही ते स्वीकारावे लागते.
  • यामुळेच आधारला होणारा काँग्रेस व अन्य विरोधकांचा विरोध बघून भाजपाप्रणीत रालोआ सरकारने आधार विधेयक हे धन विधेयक म्हणून सादर केले होते.
  • याप्रकरणी आधार विधेयक हे धन विधेयक नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाला निवाडा करण्याची याचिका केली होती.
  • याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आधार हे धन विधेयक असल्याचा निर्वाळा दिला आणि संसदेमध्ये ते मंजूर होण्याचा मार्गही मोकळा केला आहे.

राष्ट्रीय डिजिटल दूरसंवाद धोरण २०१८

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय डिजिटल दूरसंवाद धोरण (नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी: एनडीसीपी) २०१८ला मंजुरी दिली.
  • याशिवाय दूरसंचार आयोगाच्या ‘डिजिटल दूरसंवाद आयोग’ म्हणून पुनर्रचनेलाही मंजुरी देण्यात आली आहे.
  • ‘ग्राहक केंद्री’ आणि ‘वापर प्रणित’ एनडीसीपी २०१८मुळे नवकल्पना निर्माण होतील. त्यामुळे अधिक वेगवान तेत्रज्ञान आणि रोजगार निर्मिती होणार आहे.
  • भारतात झालेल्या मोबाईल क्रांतीमुळे नागरिकांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या नव्या टेलिकॉम धोरणाला मंजूरी दिली आहे.
या धोरणाची प्रमुख उद्दिष्टये
  • प्रत्येक नागरिकाला ५० एमबीपीएस प्रमाणे सार्वत्रिक ब्रॉडबँड उपलब्ध करुन देणे.
  • ५जी तंत्रज्ञान आणि ऑप्टिकल फायबर यांसारख्या आधुनिक तेत्रज्ञानाच्या मदतीने देशभरात हायस्पीड ब्रॉडबॅण्ड सेवा रास्त दरात उपलब्ध करुन देणे.
  • कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या टेलिकॉम सेक्टरचे पुनरुज्जीवन करण्यासाठी स्पेक्ट्रम शुल्काची तर्कशुद्ध आकारणी करण्यात येणार आहे.
  • डिजिटल संचार क्षेत्रात ४० लाख अतिरिक्त रोजगार निर्माण करणे.
  • देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात डिजिटल संचार क्षेत्राचे योगदान ६वरून ८ टक्क्यांपर्यंत वाढवणे.
  • डिजिटल सार्वभौमत्व सुनिश्चित करणे.
  • सर्व ग्रामपंचायतींना २०२०पर्यंत १ जीबीपीएस आणि २०२२पर्यंत १० जीबीपीएस जोडणी पुरवणे. सर्व दुर्गम भागात जोडणी सुनिश्चित करणे.
  • डिजिटल संचार क्षेत्रात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करणे.
  • नवीन युगातील कौशल्य निर्माण करण्यासाठी १ लाख मनुष्यबळ प्रशिक्षित करणे.
  • खासगीपणा, स्वायत्तता आणि पर्यायाने संरक्षण करण्यासाठी डिजिटल संचारासाठी व्यापक माहिती संरक्षण व्यवस्था निर्माण करणे.
  • राष्ट्रीय फायबर प्राधिकरणाची निर्मिती करून राष्ट्रीय डिजिटल ग्रीड स्थापन करणे.
  • मंजुरीतील अडथळे दूर करणे.
  • ओपन ऍक्सेस नेक्स्ट जनरेशन नेटवर्क विकसित करणे.

हूरूनकडून भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर

  • ब्रिटनमधील वित्तीय क्षेत्रातील कंपनी असणाऱ्या बार्कलेज हूरूनने २०१८मधील भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.
  • या यादीनुसार सलग सातव्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.
  • त्यांच्या खालोखाल हिंदुजा परिवार दुसऱ्या स्थानी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर जगातली सर्वात मोठ्या स्टील कंपनीच्या प्रमोटर लक्ष्मी निवास मित्तल यांचा परिवार आहे.
या अहवालातील ठळक मुद्दे:
  • भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांनी मागील वर्षभराच्या कालावधीमध्ये दिवसाला ३०० कोटी कमावले आहेत.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असणाऱ्या मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ३ लाख ७१ हजार कोटी इतकी आहे.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत गेल्या वर्षभरात ४५ टक्क्यांनी वाढल्याने मुकेश अंबांनीच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.
  • भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या या यादीमधील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील व्यक्तींची एकत्रित संपत्ती मुकेश अंबानींच्या संपत्तीपेक्षा कमी आहे.
  • या यादीत दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या स्थानी अनुक्रमे एस. पी. हिंदूजा आणि परिवार (१ लाख ५९ हजार कोटी), एल. एन. मित्तल आणि परिवार (१ लाख १४ हजार ५०० कोटी) आणि अझीम प्रेमजी (९६ हजार १०० कोटी) या ३ उद्योजकांचा क्रमांक लागतो.
  • मागील वर्षी दुसऱ्या स्थानावर असणारे दिलीप सांघवी ८९ हजार ७०० कोटींच्या एकूण संपत्तीसह यावर्षी पाचव्या स्थानी आहेत.
  • या यादीत सहाव्या स्थानी कोटक महिंद्रा बँकचे उदय कोटक आहेत. त्यांची एकूण संपत्ती ७८ हजार ६०० कोटी इतकी आहे.
  • त्याखालोखाल सातव्या स्थानी सायरस पुनावाला (७३ हजार कोटी), आठव्या स्थानी गौतम अदानी आणि परिवार (७१ हजार २०० कोटी) आणि सायरस मिस्त्री आणि शापूर मिस्त्री हे (६९ हजार ४०० कोटी) संयुक्तरित्या नवव्या स्थानी आहेत.
  • या अहवालामध्ये भारतामधील १० श्रीमंत कुटुंबांची यादीही जाहीर केली. यामध्ये अंबानी कुटुंब पहिल्या स्थानावर असून, त्याखालोखाल गोदरेज, हिंदूजा, मिस्त्री, सांघवी, नाडार, अदानी, दमानी, लोहिया आणि बर्मन कुटुंबाचा क्रमांक लागतो.
  • पुढील १० वर्षांत या व्यवसायिक कुटुंबांचा कारभार युवा पिढीच्या हातात असेल, असेही यात म्हटले आहे.
  • २०१८सालच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीमध्ये एकूण ६६ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे.
  • यापैकी ६५ टक्के अनिवासी भारतीयांनी स्वबळावर उद्योग व्यवसायामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
  • या ६६ अनिवासी भारतीयांपैकी ४५ जणांचे कुटुंबच उद्योगांमध्ये आहे तर २१ हे वैयक्तिकरित्या उद्योग व्यवसाय संभाळतात.
  • श्रीमंत भारतीयांपैकी सर्वाधिक अनिवासी भारतीय संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) (२१) आहेत. त्याखालोखाल अमेरिका आणि ब्रिटनचा क्रमांक लागतो.
  • १ लाख ५९ हजार कोटींच्या एकूण संपत्तीसहीत एस. पी. हिंदूजा आणि परिवार हे सर्वात श्रीमंत अनिवासी भारतीय ठरले आहेत.
  • तर ३९ हजार २०० कोटींची संपत्ती असणारे युसूफ अली हे युएईमधील सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत.
  • या अहवालामध्ये सध्या भारत आगळ्यावेगळ्या आर्थिक परिस्थीतीमधून जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
  • एकीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत पडत असतानाच दुसरीकडे कच्च्या तेलाची किंमत वाढत असल्यामुळे भारतामधील संपत्ती निर्मीतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
  • गेल्या दोन वर्षांत देशातील १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती असलेल्या श्रीमंतांची संख्या दुप्पट झाली असून, त्यांची संख्या ३३९हून वाढून ८३१पर्यंत पोहोचली आहे.
  • या सर्व ८३१ श्रीमतांकडील एकूण संपत्ती ७१ हजार ९०० कोटी डॉलर्स आहे. हा आकडा २ लाख ८४ हजार ८०० कोटी डॉलर्सच्या भारताच्या जीडीपीच्या ३३ टक्के आहे.
  • या यादीत ओयो रुम्सचे २४ वर्षीय रितेश अग्रवाल सर्वात तरुण तर एमडीएच मसाल्याचे व्यापारी असलेले ९५ वर्षीय धरमपाल गुलाटी सर्वात वयस्क व्यक्ती आहेत.
  • या यादीत सर्वाधिक २३३ श्रीमंत आर्थिक राजधानी मुंबईतील आहेत. त्यापाठोपाठ १६३ राजधानी दिल्ली व ७० श्रीमंत हे आयटीची राजधानी बेंगळुरूतील आहेत.
  • १००० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेल्या या यादीत ३०६ नवीन श्रीमंतांचा समावेश झाला आहे, तर ७५ श्रीमंत या यादीतून बाहेर गेले आहेत.
  • २०१७मध्ये या यादीत ६१७ लोकांचा समावेश होता. यावर्षी श्रीमंतांची ही संख्या २०१७मधील श्रीमंतांच्या तुलनेत २१४ने अधिक आहे.
  • या यादीत महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

न्यायालयातील कामकाजाच्या थेट प्रक्षेपणास मंजुरी

  • न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.
  • घटनात्मक आणि सार्वजनिक महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान थेट प्रसारण झाले पाहिजे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.
  • या याचिकेवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चेद्रचूड यांनी न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय दिला.
  • यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारात पारदर्शकता येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय लागू करण्याचा विचार सुरू आहे.
  • सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने न्यायालयातील सर्व खटल्यांचे थेट प्रक्षेपण करण्यास विरोध दर्शवला होता.
  • सर्वोच्च न्यायालयातील सर्वच सुनावणीचे थेट प्रसारण करण्याऐवजी राज्यघटनेशी संबंधित खटल्यांचेच थेट प्रक्षेपण करावे, अशी केंद्र सरकारची मागणी होती.

निधन : प्रसिद्ध क्रीडा समालोचक जसदेव सिंग

  • दूरदर्शन वाहिनीवरील प्रसिद्ध क्रीडा समालोचक जसदेव सिंग यांचे २५ सप्टेंबर रोजी वयाच्या ८७व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
  • १९७० ते ८०च्या दरम्यान सिंग यांनी रवी चतुवेर्दी आणि सुशील दोषी यांच्यासह अनेक क्रीडा सामन्यांचे समालोचन केले.
  • १९६८ ते २०००पर्यंतच्या ९ ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सिंग यांनी समालोचकाची भूमिका पार पाडली आहे.
  • जसदेव यांना ऑलिंपिक परिषदेकडून १९८८साली सोल ऑलिंपिकमध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिंपिक ऑडर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • याशिवाय भारत सरकारकडून त्यांना १९८५मध्ये पद्मश्री आणि २००८मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • त्यांनी १९६३पासून ४८ वर्षात अनेकदा प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याचे समालोचनही केले होते.
  • जसदेव यांनी ६ हॉकी विश्वचषक स्पर्धांमध्येही समालोचन केले होते. आकाशवाणी आणि दूरदर्शन चॅनेलवरील ते सर्वोत्तम समालोचकांपैकी एक होते.

‘जन धन रक्षक’ मोबाईल ॲप

  • केंद्रीय वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग आणि राष्ट्रीय माहिती केंद्र यांनी संयुक्तरित्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘जन धन रक्षक’ नावाचे मोबाईल ॲप विकसित केले आहे.
  • सरकारच्या वित्तीय समावेशनाचा भाग म्हणून, जनतेला आर्थिक सुविधांची माहिती देण्यासाठी, हे ॲप सुरु करण्यात आले आहे.
  • या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर सर्व बँका आणि वित्तीय सेवांची माहिती जनतेला त्यांच्या मोबाईलवर हव्या त्या ठिकाणी मिळू शकेल.
  • ग्राहक-केंद्री अशा या ॲपवर बँका, पोस्ट ऑफिस, सीएससी अशा सर्व संस्थांची माहिती मिळू शकेल. जनतेच्या गरजा आणि सोयींनुसार या ॲपचा वापर करता येईल.
  • ग्राहकाच्या स्थानापासून जवळ असणाऱ्या वित्तीय सेवा जसे एटीएम, पोस्ट ऑफिस, बँक शाखा यावर कळू शकतील.
  • बँकांच्या विविध शाखांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध असतील, शिवाय त्यावरुन बँकांशी थेट संपर्कही साधता येईल.
  • ग्राहकांनी यावर दिलेला प्रतिसाद, तक्रारी थेट संबंधित वित्तीय संस्थांकडे जातील, जेणेकरुन त्यांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करता येतील.

२५ सप्टेंबर : अंत्योदय दिन

  • पंडित दीनदयाल उपाध्यायच्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशात अंत्योदय दिन म्हणून साजरा करण्यात आला.
  • अंत्योदय म्हणजे समाजातील कमकुवत वर्गाला वर आणणे होय. यादिवशी देशभरात रक्तदान शिबिरे, सेमिनार आणि परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या.
पंडित दीनदयाळ उपाध्याय (१९१६-१९६८)
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक प्रसिद्ध इतिहासकार, राजकीय व्यक्तिमत्व आणि विचारवंत होते.
  • भारतीय जनसंघाचे समन्वयक व राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.
  • १९३७साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता.
  • शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांचे चिंतनातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.
  • ते साम्यवाद आणि भांडवलशाही या दोन्हींचे समीक्षक होते. तर स्वदेशी तसेच लघुउद्योगांचे ते समर्थक होते.
  • ते राष्ट्रवादी विचारांचे होते, डोळे झाकून पाश्चात्य संस्कृतीचे भारतात अनुकरण योग्य नाही, असे त्यांचे मत होते.
  • त्यांनी राष्ट्र धर्म प्रकाशन आणि मासिक पत्रिका राष्ट्र धर्म स्थापन केले. नंतर त्यांनी पाञ्चजन्य साप्ताहिक आणि स्वदेश या दैनिकाची सुरूवात केले.
  • हिंदीमध्ये त्यांनी चंद्रगुप्त मौर्य नाटकाची रचना केली. याव्यतिरिक्त त्यांनी शंकरचार्य यांचे जीवनचरित्राचे लेखनही केले.
  • ११ फेब्रुवारी १९६८ रोजी त्यांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. बेगुसराय स्टेशनच्या रुळांजवळ त्यांचे शव आढळले होते.