चालू घडामोडी : २६ नोव्हेंबर

परिणाम आधारित पूर्वानुमान दृष्टिकोन तंत्रज्ञान

  • भारतीय हवामानशास्त्र विभागाने ‘परिणाम आधारित पूर्वानुमान दृष्टिकोन’ (Impact Based Forecasting Approach) नावाचे एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.
  • ‘परिणाम आधारित पूर्वानुमान दृष्टिकोन’ हे तंत्रज्ञान ‘प्री-इवेंट परिदृश्य’ (Pre-event Scenario) दर्शविते.
  • या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अतिवृष्टीच्या वेळी नद्या आणि जलाशयांमधील वाढत्या जलस्तराचा अंदाज लावण्यात मदत मिळेल.
  • याच्या मदतीने सरकारी एजन्सींना पावसाच्या परिणामांना अचूकतेने मोजण्यात मदत होईल आणि ते योग्यवेळी निर्णय घेऊ शकतील.
  • या तंत्रज्ञानाच्या मदतीने जलाशयांमधील पाणी योग्यवेळी सोडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे केरळसारख्या भयंकर आपत्ती टाळता येतील.
  • केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ऑगस्ट २०१८मध्ये सुमारे ५०० लोकांचा मृत्यू झाला होता आणि ४० हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते.
  • भारतीय हवामानशास्त्र विभागाने ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान केरळमध्ये ९८.५ मिमी पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु या काळामध्ये ३५२.२ मिमी पावसाची नोंद झाली. ज्यामुळे केरळमध्ये भयंकर महापूर आला होता.
भारतीय हवामानशास्त्र विभाग
  • इंग्रजी: इंडिया मेट्रोलॉजिकल डीपार्टमेंट (आयएमडी) 
  • ही भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत भारत सरकारच्या हवामानात्मक अंदाज आणि भूकंप विज्ञानाचा कार्यभार सांभाळणारी हवामानशास्त्र विभागाची एक सरकारी संस्था आहे.
  • आयएमडीची स्थापना १८७५ साली झाली. त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आयएमडीचे मुख्यालय १९०५मध्ये शिमला, १९२८मध्ये पुणे आणि शेवटी नवी दिल्ली येथे स्थानांतरीत करण्यात आले.
  • आयएमडी जागतिक हवामान संघटनेच्या ६ विशिष्ट हवामानशास्त्र केंद्रांपैकी एक आहे. स्वातंत्र्यानंतर २७ एप्रिल १९४९ रोजी भारतीय हवामानशास्त्र विभाग जागतिक हवामान संघटनेचा सदस्य झाला.
  • उत्तर हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र यामधील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांसंबंधी चेतावणी देणे, त्यांचे नामकरण करणे हे आयएमडीचे प्रमुख कार्य आहे.
  • भारतापासून अंटार्क्टिकापर्यंतची लक्षावधी हवामान प्रक्षेपण केंद्रे सध्या भारतीय हवामानशास्त्र विभागाद्वारे चालविली जातात.

इंडिया स्किल्स रिपोर्ट २०१९

  • अलीकडेच इंडिया स्किल्स रिपोर्ट २०१९ची सहावी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. या अहवालात रोजगार प्रदान करण्याच्या बाबतीत आंध्रप्रदेश राज्य प्रथम स्थानावर आहे.
  • आंध्रप्रदेशनंतर राजस्थान आणि हरियाणा ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
  • हे सर्वेक्षण व्हीबॉक्स, पीपलस्ट्राँग आणि भारतीय उद्योग महासंघाद्वारे (सीआयआय) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि भारतीय विद्यापीठ संघ यांनी मिळून केले आहे.
अहवालातील ठळक मुद्दे
  • रोजगार प्रदान करण्याच्या बाबतीत आंध्रप्रदेश, राजस्थान आणि हरियाणा ही राज्ये अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी.
  • व्यावसायिक मार्गदर्शनाच्या कमतरतेमुळे ७० टक्के तरुणांना आपल्या कौशल्याप्रमाणे नोकरी मिळत नाही.
  • सर्व राज्यातील खूप कमी विद्यार्थ्यांनी मागील १२ महिन्यांत किमान एका इंटर्नशिपमध्ये भाग घेतला आहे.
  • बीटेक/बीई मधील रोजगारांची पातळी मागील वर्षात ४२.०८ टक्क्यांवरून वाढून ६३.११ टक्के झाली आहे.
  • पण एमबीए आणि पॉलिटेक्निकमध्ये रोजगाराची पातळी फार कमी अनुक्रमे ४७.१८ टक्के आणि ४५.९० टक्के आहे.

हैदराबादमध्ये फुप्फुसांच्या स्वास्थ्यावर ५०वी जागतिक परिषद

  • २०१९मध्ये फुप्फुसांच्या स्वास्थ्यावर ५०व्या जागतिक परिषदेचे आयोजन हैदराबादमध्ये ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे.
  • Ending the Emergency: Science, Leadership, Action ही या परिषदेची थीम असणार आहे.
  • ही परिषद फुफ्फुसांवर परिणाम करणाऱ्या सर्व रोगांबद्दल (उदा. क्षयरोग, वायू प्रदूषण, तंबाखू सेवन) जागरुकता पसरवेल.
  • या परिषदेत ६ हजारहून अधिक संशोधक, धोरण निर्माते, नेते, संयुक्त राष्ट्र आणि इतर समुदायांचे प्रतिनिधी सहभागी होतील.
  • या परिषदेत फुफ्फुसाच्या रोगांना प्रतिबंध, त्यावरील उपचार आणि लस सादर केली जाईल.
  • जगात सर्वाधिक क्षयरोगाचे रुग्ण भारतात आहेत. जगभरातील क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या प्रत्येक ४ व्यक्तींपैकी १ भारतीय आहे.

काठमांडूमध्ये पर्वतीय औषधींवर जागतिक कॉंग्रेसचे आयोजन

  • पर्वतीय औषधींवर १२व्या जागतिक कॉंग्रेसचे आयोजन नेपाळमधील काठमांडू येथे २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले.
  • ‘हिमालयाच्या हृदयात पर्वतीय औषधी’ अशी या संमेलनाची थीम होती.
  • हे द्विवार्षिक संमेलनामध्ये उंचावरील डोंगराळ क्षेत्रात आढळणाऱ्या औषधींच्या संशोधन कार्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
  • या परिषदेत ४० देशांतील ४००हून अधिक लोकांनी भाग घेतला. यामध्ये भारत, अमेरिका, चीन, जपान, इंग्लंड आणि इटली यासारखी देशांचा समावेश होता.
  • या कार्यक्रमाचे आयोजन इंटरनॅशनल सोसायटी फॉर माउंटेन मेडिसिनद्वारे केले जाते. नेपाळमध्ये प्रथमच हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

डॅन वोलमॅन यांना इफ्फी २०१८मध्ये जीवनगौरव पुरस्काराने

  • इस्रायलचे फिल्ममेकर डॅन वोलमॅन यांना भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१८मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • यावर्षी इफ्फी २०१८मध्ये इस्रायल ‘कंट्री ऑफ फोकस’ आहे. तर झारखंड यावर्षी ‘स्टेट ऑफ फोकस’ निवडले गेले आहे. यावर्षी प्रथमच इफ्फिमध्ये स्टेट ऑफ फोकसची निवड करण्यात आली आहे.
  • इफ्फीने यावेळी दृष्टिहीन मुलांसाठी विशेष पॅकेज तयार केले असून, या विभागात शोले आणि हिचकी हे चित्रपट दाखविले जाणार आहेत.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
  • इंग्रजी: इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (इफ्फी)
  • या चित्रपट महोत्सवाचे आयोजन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा सरकारद्वारे केले जाते.
  • भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची स्थापना १९५२मध्ये झाली. तेव्हापासून प्रतिवर्षी गोव्यामध्ये हा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे.
  • या चित्रपट महोत्सवाद्वारे चित्रपट क्षेत्राला जगभरात आपली चित्रपट कला प्रदर्शित करण्याची संधी प्राप्त होते.

समीर वर्माला सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद

  • लखनऊ येथे सुरु असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या समीर वर्माने पुरुष एकेरीचे आपले विजेतेपद राखले.
  • पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित समीरने सहाव्या मानांकित चीनच्या लू गाँगझूचे आव्हान १६-२१, २१-१९, २१-१४ असे परतवून लावले.
  • या विजयासह जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावर असणाऱ्या समीरचे या स्पर्धेचे हे सलग दुसरे विजेतेपद ठरले. मागील वर्षी त्याने भारताच्याच साईप्रणितला पराभूत करत ही स्पर्धा जिंकली होती.
  • परुपल्ली कश्यपनंतर सय्यद मोदी स्पर्धेचे दोनवेळा विजेतेपद पटकावणारा समीर दुसरा खेळाडू ठरला आहे.
  • याच स्पर्धेच्या महिला एकेरीत सायना नेहवालला चौथ्यांदा विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. अंतिम फेरीत तिचा पराभव झाल्यमुळे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
  • दुहेरीत सात्त्विकसाईराज-चिराग शेट्टी आणि अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी यांनाही उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.
सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा
  • राष्ट्रकुल स्पर्धेचे चॅम्पियन सय्यद मोदी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा १९९१मध्ये उत्तर प्रदेश बॅडमिंटन असोसिएशनद्वारे सुरू करण्यात आली.
  • २००३पर्यंत ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर खेळवली जात होती. परंतु २००४ नंतर तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणून मान्यता देण्यात आली व त्यात परदेशी खेळाडूंनी देखील भाग घेण्यास सुरुवात केली.

आयसीसी टी-२० संघाची हरमनप्रीत कौर कर्णधार

  • अलीकडेच पार पडलेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या आयसीसीच्या विश्व महिला टी-२० संघाच्या कर्णधारपदी भारताच्या हरमनप्रीत कौरची वर्णी लागली आहे.
  • विश्व महिला टी-२० संघात तीन भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मंधना पूनम यादव यांचा समावेश आहे.
  • सलामीवीर म्हणून स्मृती मंधनाची निवड झाली आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून पूनम यादवचा समावेश करण्यात आला आहे.
  • महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाला होता. तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इग्लंडला पराभूत करत विश्वचषक जिंकला होता.
  • वर्ल्डकपमधील कामगिरीच्या आधारावर आयसीसीच्या संघात अंतिम १२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
  • आयसीसीच्या या संघात इंग्लंड आणि भारतीय संघाच्या प्रत्येकी ३ खेळाडूंचा तर ऑस्ट्रेलियाच्या २ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
  • पाकिस्तान, न्यूझीलंड, विडींज आणि बांगलादेशच्या प्रत्येकी १ खेळाडूचा समावेश आहे. बांगलादेशच्या खेळाडूला १२वा खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.
  • आयसीसीचा विश्व महिला टी-२० संघ: हरमनप्रीत कौर (भारत, कर्णधार), एलिसा हेली (आस्ट्रेलिया), स्मृती मंदाना (भारत), एमी जोन्स (इंग्लंड, यष्टीरक्षक), डियांड्रा डोटिन (विंडीज), जोविरया खान (पाकिस्तान), एलिसा पेरी (आस्ट्रेलिया), लेग कास्पेरेक (न्यूजीलंड), आन्या श्रबसोले (इंग्लंड), क्रिस्टी गोर्डन (इंग्लंड), पूनम यादव (भारत), जहनारा आलम (बांग्लादेश).

चर्चित नॉर्थ सेंटीनल बेटाबद्दल माहिती 

  • अलीकडेच अंदमान-निकोबार बेटांच्या समूहातील नॉर्थ सेंटीनल नावाचे बेट चर्चेत आले आहे. ते बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान द्वीपसमूहातील एक बेट आहे.
  • या बेटावर प्राचीन आदिवासी निवास करतात. या आदिवासी जमातीचा बाह्य जगाशी संपर्क नाही आणि त्यांना बाह्य जगाशी संपर्क साधण्यास स्वारस्य नाही.
  • यामुळे या आदिवासींकडून या बेटावर प्रवेश करणाऱ्या लोकांबरोबर अनेकदा हिंसक व्यवहार केला जातो.
  • अलीकडेच या बेटावर अवैधरित्या प्रवेश करणाऱ्या अमेरिकन नागरिकास या आदिवासींनी ठार मारले होते. 
  • नॉर्थ सेंटीनेल बेटावर प्रवेश करण्यास कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. या बेटाची चित्रे किंवा व्हिडिओ घेणे देखील कायद्याने गुन्हा आहे.
  • अंदमान-निकोबार बेटे (मूळ जमातींचे संरक्षण) नियमन १९५६च्या अधिनियमानुसार नॉर्थ सेंटीनेल बेटांवर प्रवेश करण्यास बंदी घातली गेली आहे.
  • नॉर्थ सेंटीनेल बेटात एकूण ५ बेटे आहेत. त्यांचे एकूण क्षेत्रफळ ५९.६० चौकिमी आहे. २०१८च्या अंदाजानुसार, नॉर्थ सेंटीनेलची लोकसंख्या ४० ते ४०० दरम्यान असण्याची शक्यता आहे.
  • भारतीय मानववंशीय सर्वेक्षणाने कार्बन डेटींगच्या आधारे ही पुष्टी केली आहे की, या बेटांवर सेंटिनेल जमातीची उपस्थिती २ हजार वर्षांपूर्वीपासून आहे.
  • सेंटिनेल जमात अंदमानच्या ५ सर्वाधिक असार्वजनिक जमातींपैकी एक आहे. (अन्य चार: ग्रेट अंडमानीज, ओंज, शोम्पेन आणि जारवा)
  • अनुवांशिकरित्या या जमातीद्वारे बोलली जाणारी भाषा सेंटिनलीज आहे. ही भाषा समजण्यास अत्यंत अवघड आहे.

निधन: कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सी. के. जाफर शरीफ

  • कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सी. के. जाफर शरीफ यांचे २५ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
  • जाफर हे काँग्रेसचे कर्नाटकातील दिग्गज नेते होते. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात १९९१मध्ये त्यांच्याकडे रेल्वेमंत्रिपद सोपविण्यात आले होते. जाफर यांनी १९९१ ते १९९५ या कालावधीत रेल्वेमंत्रिपद भूषवले होते. 
  • कर्नाटकातील ते काँग्रेसचे एक प्रभावी नेते होते. त्यांनी काँग्रेसमधून निजलिंगप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
  • शरीफ हे एक असे नेते होते ज्यांनी देवेगौडा पंतप्रधान असताना केंद्र सरकारच्या MPLADS या योजनेंतर्गत विकास कामांसाठी सर्वाधिक खासदार निधी खर्च केला होता.

२६ नोव्हेंबर: संविधान दिन

  • भारतात प्रतिवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन) म्हणून साजरा केला जातो.
  • २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.
  • अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता. या घटनेच्या स्मरणार्थ २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
  • यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान लागू करण्यात आले आणि २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.
  • भारतीय संविधान इतर देशांच्या संविधानाचे बारकाईने परीक्षण केल्यानंतर तयार करणायत आले आहे. जगातील सार्वभौम देशांमध्ये भारतीय संविधान सर्वात मोठे संविधान आहे.
  • यात ४४८ कलमे, १२ परिशिष्टे समाविष्ट आहेत. हे एक हस्तलिखित संविधान असून त्यात ४८ लेख आहेत. हे तयार होण्यासाठी २ वर्षे ११ महिने १७ दिवस लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा