चालू घडामोडी : ०७ ऑक्टोबर

नोएडामध्ये रि-इन्व्हेस्ट २०१८चे आयोजन

  • रि-इन्व्हेस्ट (RE-Invest) २०१८ या दुसऱ्या जागतिक नूतनीकरणक्षम ऊर्जा गुंतवणूक सभा आणि प्रदर्शनाचे आयोजन नोएडामध्ये करण्यात आले होते.
  • केंद्रीय नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाद्वारे ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रि-इन्व्हेस्ट २०१८चे उद्घाटन केले.
  • याचदरम्यान आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची पहिली बैठक आणि हिंदी महासागर रिम असोसिएशनच्या ऊर्जा मंत्र्यांची बैठकही आयोजित करण्यात आली होती.
  • रि-इन्व्हेस्ट २०१८ या ३ दिवसीय परिषदेत नूतनीकरणक्षम ऊर्जा, क्लीनटेक आणि भविष्यातील उर्जेची गरज यावर चर्चा झाली.
  • या परिषदेत नूतनीकरणक्षम ऊर्जा उपकरण निर्माते, गुंतवणूकदार आणि संशोधकांनी भाग घेतला.
  • विविध संस्थांसाठी व्यवसाय कौशल्य, कर्तुत्व आणि महत्वाकांक्षा प्रदर्शित करण्याचा ही एक उत्कृष्ट संधी होती.
  • या परिषदेत इंडियन ओशन रिम असोसिएशन आणि आंतराष्ट्रीय सौर आघाडीच्या सदस्य देशांसह ६०० जागतिक उद्योगपती आणि १० हजारहून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला.
  • इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या (आयओआरए) २१ सदस्य देशांनी नूतनीकरणक्षम ऊर्जेवरील दिल्ली घोषणापत्र या परिषदेत स्वीकारले.
रि-इन्व्हेस्ट
  • नूतनीकरणक्षम उर्जा विकास आणि अंमलबजावणी यासाठी हा एक जागतिक मंच आहे.
  • रि-इन्व्हेस्ट २०१५ यशस्वी झाल्यानंतर ही दुसरी जागतिक रि-इन्व्हेस्ट परिषद आयोजित करण्यात आली होती.
  • या मंचावर गुंतवणूकदार आणि उद्योजक नवकल्पना आणि त्यासंबंधित गोष्टींवर चर्चा करू शकतात.
  • या परिषदेत भारतातील हरित उर्जा मार्केटचे प्रदर्शन करण्यात आले आणि उर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आला.
  • जगात नूतनीकरणक्षम उर्जेच्या बाबतीत भारत पाचव्या स्थानी, पवन उर्जेच्या बाबतीत चौथ्या स्थानी आणि सौर उर्जेच्या बाबतीत पाचव्या स्थानी आहे.
  • भारत जगातील सर्वात मोठ्या हरित उर्जा बाजारांपैकी एक आहे, भविष्यात याची मागणी आणि पुरवठा यात लक्षणीय वाढ होणार आहे.
नूतनीकरणक्षम ऊर्जेवरील दिल्ली घोषणापत्र
  • आयओआरएच्या सदस्य देशांची ऊर्जा मागणी पूर्ण करण्यासाठी नूतनीकरणक्षम उर्जेच्या प्रचारासाठी दिल्ली घोषणा करण्यात आली आहे.
  • याद्वारे तंत्रज्ञान विकास आणि हस्तांतरण, नूतनीकरणक्षम सार्वजनिक खाजगी भागीदारीचे सशक्तीकरण याला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.
  • याशिवाय आयओआरए आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या सदस्य देशांमध्ये सहकार्याला चालना देणे हाही यामागील उद्देश आहे.
  • याव्यतिरिक्त आयओआरएच्या सदस्य देशांनी आंतरराष्ट्रीय नूतनीकरणक्षम ऊर्जा एजन्सीसह (IRENA) सहकार्य करण्यासही सहमती दर्शविली आहे.

डीजी यात्रा उपक्रम

  • केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने विमानतळावर प्रवाशांसाठी बायोमेट्रिक आधारित डिजिटल प्रोसेसिंगसाठी डीजी यात्रा नावाच्या उपक्रमाची घोषणा केली आहे.
  • कोणत्याही अडचणीशिवाय पेपररहीत हवाई प्रवासाला प्रोत्साहन देणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • फेब्रुवारी २०१९मध्ये बंगळूर आणि हैदराबाद विमानतळापासून या उपक्रमास सुरूवात करण्यात येईल.
  • नंतर एप्रिल २०१९पासून भारतीय विमानतळ प्राधिकरण कोलकाता, वाराणसी, पुणे आणि विजयवाडा येथे या उपक्रमाची अंमलबजावणी सुरु करेल.
  • डीजी यात्रा
  • या उपक्रमांतर्गत प्रवाशाचे विमानतळावर केवळ एकदाच पडताळणी केली जाईल. पडताळणी केल्यानंतर प्रवाशाच्या चेहऱ्याची ओळख आणि बायोमेट्रिक माहिती डीजी ट्रॅव्हल आयडीवर संग्रहित केली जाईल.
  • यासाठी प्रवाशांची केंद्रीकृत सिस्टममध्ये नोंदणी केली जाईल आणि त्यांना डीजी ट्रॅव्हल आयडी देण्यात येईल.
  • यामुळे तिकीट बुकिंग, बोर्डिंग पास सुरक्षा तपासणी हे सर्व डिजिटल होण्यास मदत होईल.
  • या आयडीमध्ये प्रवाश्याचे नाव, ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक आणि ओळखपत्र साठवलेले असेल.
  • या आयडीचा वापर प्रवाशी तिकिट बुक करण्यासाठी करू शकतात. याचा फायदा प्रवाशांसह विमानतळ ऑपरेटर्सलाही मिळणार आहे.

युवा भारतीय संघाने जिंकला आशिया चषक

  • भारताच्या वरिष्ठ संघापाठोपाठ भारताच्या युवा क्रिकेट संघाने पी. सिमरन सिंहच्या नेतृत्वाखाली आशिया (१९ वर्षांखालील) चषक जिंकला आहे.
  • बांगलादेश येथे खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला १४४ धावांनी पराभूत केले.
  • भारताच्या ३०४ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला १६० धावांपर्यंतच मजल मारता आली.
  • भारताचे हे सहावे युवा आशिया चषक जेतेपद आहे. यापूर्वी भारताने १९८९, २००३, २०१२, २०१३-१४ आणि २०१६मध्ये आशिया चषक जिंकला आहे.

थांगवेलु मारियप्पन आशियाई पॅरा स्पर्धेसाठी ध्वजवाहक

  • रिओ पॅराऑलिम्पिक खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा थांगवेलु मारियप्पन याची तिसऱ्या आशियाई पॅरा स्पर्धा २०१८साठी भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • या स्पर्धेसाठी ३०२ सदस्यांचा संघ भारत पाठवित आहे. त्यात ॲथलीट, प्रशिक्षक, अधिकारी व इतर कर्मचारी सामील आहेत.
  • थांगवेलु मारियप्पनचा जन्म २८ जून १९९५ रोजी तामिळनाडूच्या सलेम जिल्ह्यात झाला.
  • २०१६च्या रिओ ग्रीष्मकालीन पॅराऑलिम्पिक खेळांमध्ये त्याने उंच उडीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
  • त्याच्या योगदानासाठी २०१७मध्ये भारत सरकारने त्याला पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.
आशियाई पॅरा स्पर्धा २०१८
  • आशियाई पॅरा स्पर्धेची ही तिसरी आवृत्ती आहे.
  • आशियाई पॅरा स्पर्धा ६ ते १३ ऑक्टोबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
  • या स्पर्धेत १८ खेळांमध्ये ५४६ इव्हेंट्स आयोजित केले जातील. ४२ देश या स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत.

भारत कौशल्य स्पर्धा २०१८

  • भारत कौशल्य स्पर्धा २०१८चा समारोप ६ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे झाला. ही भारतातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा आहे.
  • ३ दिवसासाठी चाललेल्या या स्पर्धेत ४६ वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
  • भारतीय कौशल्य स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती होती. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालयाद्वारे याचे आयोजन करण्यात आले होते.
  • या स्पर्धेत २३ राज्यांनी भाग घेतला. तर समारोप समारंभादरम्यान विजेत्यांना ४६ वेगवेगळ्या विभागात सन्मानित करण्यात आले.
  • या विजेत्यांमधून २०१९मध्ये रशियात होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी स्पर्धकांची निवड करण्यात येईल.

भारत आणि व्हिएतनामच्या तटरक्षक दलाचा संयुक्त युद्धाभ्यास

  • भारत आणि व्हिएतनामच्या तटरक्षक दलाच्या सहयोग HOP TAC २०१८ या संयुक्त युद्धाभ्यासाचे आयोजन बंगालच्या उपसागरात करण्यात आले.
  • दोन्ही देशांच्या नौदलाच्या तटरक्षक दलांमध्ये कारवाई दरम्यान समन्वय दृढ करणे हा या युद्धाभ्यासाचा मुख्य उद्देश आहे.
सहयोग HOP TAC २०१८
  • या अभ्यासाचा उद्देश दोन्ही देशांच्या तटरक्षक दलादरम्यान सागरी क्षेत्रातील बचाव कार्यामध्ये वर्किंग लेव्हल संबंधाना मजबूत करणे हा होता.
  • या अभ्यासात अपहरण आणि समुद्री चाच्यांच्या विरूद्ध कारवाई करण्याचा सराव करण्यात आला.
  • याव्यतिरिक्त या अभ्यासात आग विझविण्याचा सरावही करण्यात आला.
  • या सरावात भारताकडून तटरक्षक दलातील शौर्य, अर्न्वेश ही जहाजे, इंटरसेप्टर बोट सी-४३१, डोर्नियर विमान आणि चेतक हेलीकॉप्टरने सहभाग घेतला.
  • याव्यतिरिक्त राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या सागर मंजुषा जहाजानेदेखील सहभाग घेतला.

गुरूग्राममध्ये नॅसकॉमचे आयओटीसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स 

  • भारताच्या आयटी उद्योगाची शिखर संस्था नॅसकॉमने गुरुग्राम (हरियाणा) येथे इंटरनेट ऑफ थिंग्ससाठी (IoT) सेंटर ऑफ एक्सलन्स सुरु केले.
  • हे केंद्र हरियाणा सरकारच्या सहकार्याने सुरु करण्यात आले असून, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रव्यापी सहकार्याचा ते भाग आहे. 
  • हे केंद्र आयओटीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच नवकल्पनांवरील सहकार्यासाठी उपयुक्त मंच प्रदान करेल.
  • आयओटीशी संबंधित नवकल्पनांना चालना देण्याचे कार्य हे केंद्र करेल.
  • उद्योग, शिक्षण, स्टार्टअप आणि भारताच्या आर्थिक विकासासाठी नवीन उपाय शोधण्यासाठी हा एक उपयुक्त मंच असेल.
  • आयओटी क्षमता विकसित करण्यासाठी बुद्धिमत्तेच्या आदान-प्रदानासाठी आणि तंत्रज्ञान सहकार्यासाठी देखील हे केंद्र एक उपयुक्त मंच ठरेल.
इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी)
  • ही एक युनिक आयडेंटीफायरद्वारे आपापसांमध्ये जोडलेल्या संगणकीय साधने, स्मार्टफोन, वेअरएबल डिव्हाइसेस, होम अॅप्लिकेशन्स, वाहने यांची एक प्रणाली आहे.
  • ब्रिटीश उद्योजक केविन ॲस्टोन यांनी १९९९मध्ये सर्वप्रथम ही संकल्पना मांडली होती.
  • या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ही एक अतिशय सुरक्षित प्रणाली आहे. यामध्ये माहितीशी छेडछाड करता येत नाही.
नॅसकॉम (NASSCOM)
  • पूर्ण रूप: नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज
  • स्थापना: १ मार्च १९८८
  • मुख्यालय: नोएडा, उत्तर प्रदेश
  • सदस्य: २०००पेक्षा जास्त कंपन्या
  • चेअरमन: रिशाद प्रेमजी
  • नॅसकॉम भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि बिजनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (बीपीओ) उद्योगांची ना-नफा तत्वावर कार्य करणारी गैरसरकारी जागतिक संघटना आहे.
  • ही संस्था सॉफ्टवेअर व सेवांमध्ये व्यावसायिक सुविधा प्रदान करते आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानात संशोधनाला प्रोत्साहन देते.
  • बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकत्ता, मुंबई, पुणे आणि तिरुवनंतपुरम येथे या संस्थेची प्रादेशिक कार्यालये आहेत.
  • या विश्वस्तरीय आयटी व्यापार संस्थेच्या २०००पेक्षा जास्त कंपन्या सदस्य आहेत. यातील २५०हुन अधिक कंपन्या चीन, युरोप, जपान, अमेरिका आणि ब्रिटन या देशांमधील आहेत.
  • नॅसकॉमच्या सदस्य कंपन्या सॉफ्टवेअर विकास, सॉफ्टवेअर सेवा, सॉफ्टवेअर उत्पादने, आयटी, बीपीओ सेवा आणि ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.

३६व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन गोव्यामध्ये

  • ३६व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन ३० मार्च ते १४ एप्रिल २०१९ दरम्यान गोव्यामध्ये करण्यात येणार आहे.
  • सायकलिंग आणि नेमबाजी इव्हेंट्ससाठी गोव्यामध्ये सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या दोन स्पर्धा मात्र वी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय खेळ
  • भारतात राष्ट्रीय खेळांचे आयोजन सर्वप्रथम १९२४मध्ये दिल्लीमध्ये करण्यात आले होते. १९२४च्या पॅरिस ऑलिंपिकसाठी खेळाडूंची निवड करणे हे त्यामागील उद्दीष्ट होते.
  • सुरुवातीला राष्ट्रीय खेळांना भारतीय ऑलिंपिक खेळ संबोधले जात. १९४०मध्ये भारतीय ऑलिंपिक खेळांचे नामांतर राष्ट्रीय खेळ असे करण्यात आले.
  • या खेळांचे आयोजन भारतीय ऑलिंपिक संघटनेद्वारे केले जाते. ‘गेट सेट प्ले’ हे राष्ट्रीय खेळांचे घोषवाक्य आहे.
  • राष्ट्रीय खेळांमध्ये भारतातील विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून खेळाडू सहभागी होतात.
भारतीय ऑलिंपिक संघटना
  • स्थापना: १९२७
  • मुख्यालय: नवी दिल्ली
  • अध्यक्ष: नरिंदर बत्रा
  • ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडू निवडणे हे या संघटनेचे मुख्य कार्य आहे.

ग्रीष्मकालीन युवा ऑलिम्पिक स्पर्धा २०१८

  • ग्रीष्मकालीन युवा ऑलिम्पिक स्पर्धा २०१८चे उद्घाटन आणि आयोजन अर्जेंटिनाची राजधानी बूएनोस एरेस येथे करण्यात आले आहे. युवा ऑलिंपिकची ही तिसरी आवृत्ती आहे.
  • या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारतीय युवा नेमबाज मनु भाकर भारतीय संघाची ध्वजवाहक होती.
  • या स्पर्धांमध्ये २०६ देश सहभागी होत आहेत. कोसोवा आणि दक्षिण सुदान हे देश पहिल्यांदाच युवा ऑलिंपिकमध्ये भाग घेत आहेत.
  • या स्पर्धांचे आयोजन ६ ते १३ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. यावेळी भारतातर्फे सर्वात मोठा संघ युवा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पाठविला जात आहे.
  • या ग्रीष्मकालीन युवा ऑलिंपिकमध्ये ३२ खेळांमध्ये २४१ इव्हेंट्सचे आयोजन केले जाणार आहे.
  • आशियाच्या बाहेर आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच युवा ग्रीष्मकालीन ऑलिंपिक स्पर्धा आहे.
  • २०१०मध्ये युवा ग्रीष्मकालीन ऑलिंपिकचे आयोजन सिंगापूरमध्ये तर २०१४मध्ये नानजिंग (चीन) येथे करण्यात आले होते.
  • पुढील ग्रीष्मकालीन युवा ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन २०२२मध्ये डकार (सेनेगल) येथे होणार आहे.

आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान महोत्सव २०१८

  • आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान महोत्सव २०१८ला ५ ऑक्टोबर रोजी लखनौ (उत्तर प्रदेश) येथे सुरूवात झाली.
  • या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ही परिषद ४ दिवस चालेल. यामध्ये १० हजारपेक्षा जास्त शास्त्रज्ञ व विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
  • यंदाच्या आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान महोत्सवाचा मुख्य विषय ‘Science for Transformation’ हा आहे.
  • या महोत्सवाचे आयोजन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांनी इंदिरा गांधी प्रतिष्ठानच्या (लखनौ) सहयोगाने केले आहे. 
  • पहिल्या आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन २०१५मध्ये आयआयटी नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.
  • त्यानंतर २०१६मध्ये राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा नवी दिल्ली आणि २०१७मध्ये चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा