चालू घडामोडी : २४ व २५ डिसेंबर

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना अटक

  • देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी जाहीर केले.
  • लालूप्रसाद व अन्य १५ जणांना अटक झाली असून, सबळ पुराव्याअभावी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह अन्य ६ जणांना मात्र आरोपमुक्त केले आहे.
  • १९९०नंतर लालू प्रसाद यांनी संपादित केलेल्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला असून, शिक्षेचा निकाल ३ जानेवारी रोजी दिला जाणार आहे.
  • पाटणा उच्च न्यायालयाने १९९६मध्ये या घोटाळ्याच्या तपासाचे आदेश दिले होते. सुमारे २१ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे.
  • चारा वितरणाच्या नावाखाली महसूल विभागाच्या देवघर कोषागारातून १९९१ ते १९९४ या वर्षांत ८९ लाख २७ हजार रुपयांचा हा गैरव्यवहार झाला होता.
  • माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना मात्र न्यायालयाने आरोपमुक्त केले आहे. आधी काँग्रेसमध्ये असलेले मिश्रा हे राष्ट्रवादी काँग्रेसमार्गे सध्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात दाखल आहेत.
  • याआधी २०१३मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने चाराघोटाळ्यात त्यांना दोषी जाहीर केले होते आणि ४ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता. 
  • लालूप्रसाद यांच्यावर चारा घोटाळ्याप्रकरणी आणखी ३ प्रकरणे दाखल आहेत. त्यात दुमका कोषागारातून ३.९७ कोटी रुपयांचा, छैबासा कोषागारातून ३६ कोटी रुपयांचा आणि दोरांदा कोषागारातून १८४ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.
 पार्श्वभूमी 
  • शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चारा पुरवला जावा या उद्देशाने सरकारतर्फे मदत योजना राबवली जाते. बिहारच्या स्थापनेपासून या योजनेची अंमलबजावणी होत आहे.
  • सरकारी अधिकारी जनावरांची संख्या निश्चित करुन त्याप्रमाणे चारा खरेदीसाठी अनुदान द्यायचे. या अनुदानाचा हिशेब नंतरच्या महिन्यात देणे अपेक्षित असते. परंतू या प्रकरणात कोणताही हिशोब दिला गेला नाही.
  • देशाचे तत्कालीन महालेखापाल टी एन चतुर्वेदी यांना १९८५साली पहिल्यांदा या प्रकरणात काही काळेबेरे असल्याचा संशय आला. बिहार सरकार या खर्चाचे हिशेबच देत नसल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारला खडसावले होते.
  • १९९२ साली बिहार सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील बिंदुभूषण त्रिवेदी या पोलीस अधिकाऱ्याने या घोटाळ्याची चौकशी देखील केली.
  • बिहारच्या पोलीस महासंचालकांना त्यांनी अहवाल देखील दिला. मात्र, त्रिवेदी यांची तडकाफडकी बदली आणि हे प्रकरण थंड पडले.
  • १९९६मध्ये पश्चिम सिंगभूम जिह्याचे उपायुक्त अमित खरे यांनी या प्रकरणी धाडी घालण्यास सुरुवात केली आणि चारा घोटाळ्याचे घबाडच त्यांच्या हाती लागले.
  • चारा घोटाळ्यात अनेक संस्थांना अनुदान देण्यात आले. या संस्था प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हत्या, अशी माहिती समोर आली.
  • चारा घोटाळा उघड करण्यात अमित खरे यांची महत्त्वाची भूमिका होती. मूळचे बिहारचे असेलेले खरे हे १९८५ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत.
  • या घोटाळ्याच्या ३३ पैकी ६ खटल्यांमध्ये लालू आरोपी होते. त्यापैकी २ खटल्यांमध्ये ते दोषी ठरले आहेत. अन्य ४ खटल्यांचे कामकाज सुरू आहे.
  • चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना ५ वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती.
  • २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला, पण शिक्षेला स्थगिती न दिल्याने त्यांना ११ वर्षे निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली.

जयराम ठाकूर हिमाचलचे १३वे मुख्यमंत्री

  • सलग पाच वेळा विधानसभेत निवडून येणारे आमदार जयराम ठाकूर यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते हिमाचलचे १३ वे मुख्यमंत्री असतील.
  • हिमाचलमधील भाजप आमदारांच्या बैठकीत एकमताने ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने अपेक्षेप्रमाणे बाजी मारत ६८ पैकी ४४ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला २१ जागांवरच समाधान मानावे लागले.
  • भाजपचा विजय झाला असला तरी भाजपचे हिमाचलमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा अनपेक्षित पराभव झाला.
  • यामुळे आता मुख्यमंत्रीपदावर कोणाला संधी द्यायची, असा पेच भाजपसमोर निर्माण झाला होता.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले ठाकूर हे सेरज विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. २००७ ते २००९ या कालावधीत ते भाजपचे हिमाचलमधील प्रदेशाध्यक्ष होते.
  • त्यांनी १९९८साली विधानसभेत प्रथमच प्रवेश केला, त्यानंतर ते सतत विजयी होत गेले. धुमल यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांची जबाबदारीही सांभाळली होती.

अभिजीत कटके महाराष्ट्र केसरी

  • पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली.
  • अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशी मात करत, महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा पटकावली.

टेमबिन वादळाचा दक्षिण फिलिपीन्सला तडाखा

  • टेमबिन या उष्णकटिबंधीय वादळाचा दक्षिण फिलिपीन्सला तडाखा बसला असून, या वादळामुळे आतापर्यंत १३३ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत.
  • मिंदानो या फिलिपीन्समधील दुसऱ्या मोठय़ा बेटाला या वादळाने तडाखा दिला, त्यामुळे तेथे पूर आले व अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. त्यात अनेक खेडी नष्ट झाली.
  • फिलिपीन्सला दरवर्षी किमान वीस मोठय़ा वादळांचा तडाखा बसत असतो. त्यातील बहुतांश प्राणघातक असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा