चालू घडामोडी : २६ एप्रिल

इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती

  • सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने संमती दिली आहे.
  • सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला ठरणार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या इंदू मल्होत्रा या सातव्या महिला आहेत.
  • १९८९ मध्ये ३९ वर्षीय एम. फातिमा बिबी यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
  • त्यांच्यानंतर सुजाता मनोहर, रुमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा, रंजना देसाई आणि आर भानुमती ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी विराजमान झाल्या होत्या.
  • सध्या सर्वोच्च न्यायालयातील २४ न्यायाधीशांमध्ये न्या. आर. भानुमती या एकमेव महिला न्यायाधीश आहेत.
  • इंदू मल्होत्रा यांचा जन्म १९५६साली बंगळुरुमध्ये झाला. त्यांनी लेडी श्रीराम कॉलेज आणि दिल्ली विद्यापीठातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मल्होत्रा यांनी राज्यशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले.
  • दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेज आणि विवेकानंद कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. १९८३मध्ये त्यांनी आपल्या वकिली कारकीर्दीची सुरुवात केली.
  • ऑगस्ट २००७मध्ये इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील म्हणून नेमणूक झाली होती. सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.
  • १९७७मध्ये लीला सेठ सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील बनल्या होत्या. तसंच हायकोर्टाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश बनण्याचा मानही त्यांना मिळाला होता.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा व उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांच्या नावाची शिफारस केली होती.
  • परंतु सरकारने न्यायाधीश के एम जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय घेतला आहे. जस्टिस जोसेफ उत्तराखंड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आहेत.
  • २०१६मध्ये उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करणाऱ्या खंडपीठात जोसेफ यांचा सहभाग होता.

पाकिस्तानच्या प्रसिद्ध नाटककार मदिहा गौहर यांचे निधन

  • पाकिस्तानच्या प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संगीतकार व अजोका थिएटरच्या संस्थापिका मदिहा गौहर यांचे २६ एप्रिल रोजी निधन झाले.
  • त्यांचा जन्म १९५६ मध्ये कराचीत झाला. त्यांना सुरुवातीपासून कलेत रस होता. भारत-पाकिस्तान मैत्रीचा पुरस्कार करणाऱ्या कलावंतांपैकी त्या एक होत्या.
  • त्यांनी लाहोर येथे त्यांच्या घराच्या लॉनवर जुलूस नावाचे नाटक १९८४मध्ये सादर केले. तेव्हापासून सुरू झालेला त्यांचा कलाप्रवास आतापर्यंत सुरूच होता.
  • त्यांनी अजोका थिएटरच्या माध्यमातून पाकिस्तानात रंगभूमीची चळवळ सुरू केली. त्यात महिला हक्क, सामाजिक जागरूकता डोकावत होती.
  • त्यामुळेच त्यांनी ऑनर किलिंग, स्त्री साक्षरता, मानवी हक्क अशा अनेक मुद्दय़ांवर नाटय़कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकला.
  • नाटय़ चळवळीत पाकिस्तानसारख्या देशात काम करण्याचे धाडस दाखवल्याने त्यांना नेदरलँड्सच्या राजदूतांनी ‘प्रिन्स क्लॉस’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
  • पाकिस्तान सरकारने त्यांना ‘तमघा ए इम्तियाझ’ हा सन्मान दिला. २००५मध्ये त्यांचे नाव शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी पाठवण्यात आले होते.
  • तोबातेक सिंग, एक थी नानी, बुल्हा, लेटर्स टू अंकल सॅम, मेरा रंग दे बसंती चोला, दारा, कौन है ये गुस्ताख, लो फिर बसंत आयी अशी अनेक नाटके त्यांच्या अजोका थिएटरने आणली.
  • भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, ओमान अशा अनेक देशांत त्यांचा हा नाटय़ प्रवास झाला. लाहोरच्या रंगभूमी वर्तुळातील एक परिचित व प्रभावी कलाकार म्हणून त्यांचा करिश्मा होता.
  • त्यांनी १९८४मध्ये पाकिस्तानसारख्या देशात समांतर रंगभूमीची सुरू केलेली चळवळ हे त्यांचे मोठे योगदान.
  • त्यांच्या निधनाने भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतिदूत असलेल्या हरहुन्नरी कलावंतास जग मुकले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा