चालू घडामोडी : ८ एप्रिल

दलित स्त्रीवादी आंदोलनाच्या नेत्या रजनी तिलक यांचे निधन

  • दलित अधिकार कार्यकर्त्या आणि लेखिका रजनी तिलक यांचे ३० मार्च रोजी दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले.
  • लेखिका, उत्तम संघटक व दलित स्त्रीवादी आंदोलनाच्या नेत्या अशी बहुविध ओळख असलेल्या रजनी तिलक या महिलांसाठी तारणहार होत्या.
  • धार्मिक व पितृसत्ताक अवडंबरे झुगारून देताना जातिअंताच्या लढाईसाठी त्यांनी निर्णायक आंदोलन छेडले. 
  • रजनी तिलक यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि त्यांच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज उठवला.
  • पितृसत्ताक पद्धतींविरुद्ध त्यांनी लढा दिला, शिवाय जातिवादालाही हादरे दिले. ‘पदचाप’ व ‘हवा सी बेचैन युवतियाँ’ हे त्यांचे दोन कवितासंग्रह बरेच गाजले.
  • त्यांचे ‘अपनी जमीं अपना आसमां’ हे आत्मचरित्र प्रशंसेस पात्र ठरले. उत्तर भारतीय दलित महिलांवरील अत्याचाराचे अनुभव त्यांनी प्रभावीपणे लेखणीतून मांडले.
  • ‘बेस्ट ऑफ करवा चौथ’ हा त्यांचा नवा कथासंग्रह असाच वाचनीय व विचारांना प्रेरणा देणारा आहे.
  • बामसेफ, दलित पँथर, आव्हान थिएटर, नॅशनल फेडरेशन ऑफ दलित विमेन, वर्ल्ड डिगनिटी फोरम, दलित लेखक संघ, राष्ट्रीय दलित महिला आंदोलन या  संस्थांशी त्या निगडित होत्या.
  • सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह दलित मीडिया या संस्थेच्या त्या कार्यकारी संचालकही होत्या. ‘अभिमूकनायक’ या वृत्तपत्राचे संपादन त्या करीत असत.
  • पुणे येथील दलित महिला परिषदेत त्यांना आंबेडकरी महिला चळवळीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता.
  • दलितांच्या अधिकारांसाठी अविरत संघर्ष करणाऱ्या तिलक यांच्या निधनाने दलित अधिकार चळवळ आणि दलित साहित्याची मोठी हानी झाली आहे. 

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला वेटलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्ण

  • ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताने आणखी दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले आहे.
  • वेटलिफ्टर सतीश शिवलिंगम याने पुरुषांच्या ७७ किलो वजनी गटात एकूण ३१७ किलो वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरले.
  • सतीशने वेटलिफ्टिंगच्या स्नॅच प्रकारात १४४ किलो वजन तर, क्लीन अँड जर्क प्रकारात १७३ किलो वजन उचलले.
  • सतीश कुमार शिवलिंगमने २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तसेच २०१७च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिप स्पर्धेतही सुवर्ण पदक पटकावले होते.
  • २०१६साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकसाठीही तो पात्र ठरला होता. मात्र, पदक मिळविण्यात तो अपयशी ठरला होता.
  • यानंतर शेवटच्या मेडल इव्हेंटमध्ये ८५ किलो वजनी गटात भारताच्या वेंकट राहुल रगालाने भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा केले.
  • नानजिंग युवा ऑलिम्पिकमधील रौप्यविजेत्या राहुलने दुखापतीवर मात करत एकूण ३३८ किलो वजन उचलून सुवर्णविजेती कामगिरी केली.
  • यासह भारताच्या सुवर्णपदकांची संख्या चार झाली आहे. यापूर्वी मिराबाई चानू (४८ किलो), संजिता चानू (५३ किलो) यांनी सुवर्णपदके मिळविली होती.
  • आतापर्यंत भारताच्या खात्यात ६ पदके (४ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य) जमा झालेली आहेत. सध्या पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा