चालू घडामोडी : २१ मे

केरळमध्ये दुर्मीळ निपाह विषाणूचा संसर्ग

  • केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा ‘निपाह’ विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सुमारे ५ ते ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.
  • सध्या या विषाणूची केरळमध्ये लागण झाली असली तरीही संपूर्ण भारतात त्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने हाय अलर्ट जाहीर केला आहे.
  • तसेच रूग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेत पाठवण्यात आले आहेत.
  • केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी याप्रश्नी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी)चे उच्चस्तरीय डॉक्टरांचे पथक केरळमध्ये पाठविले आहे.
 निपाह विषाणूबाबत… 
  • जनावरे आणि माणूस यांच्यावर वेगाने हल्ला करणारा तसेच गंभीर आजार निर्माण करणारा हा विषाणू आहे
  • यास NiPah Virus Encephalitis (Encephalitis म्हणजे मेंदूला आलेली सूज) असेही म्हटले जाते.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, निपाह विषाणू हा ‘फ्रुट बॅट’ जातीच्या वटवाघुळामुळे फळ व फुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरतो.
  • १९९८मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगई येथील निपाह नावाच्या गावात हा विषाणू सापडला होता. यामुळे या विषाणूला ‘निपाह’ असे नाव देण्यात आले.
  • सुरुवातीला या रोगाची लागण डुकरांमध्ये झाली आणि नंतर तो तेथील शेतकऱ्यांमध्ये पसरला आणि त्यामुळे २६५ जणांचा मृत्यू झाला.
  • २००१ आणि २००७मध्ये निपाह व्हायरसने भारतात धुमाकूळ घातला होता. भारतात सर्वात आधी पश्चिम बंगालमध्ये हा व्हायरस आढळून आला होता.
  • पश्चिम बंगालमध्ये दोन्ही वेळेस या व्हायरसची एकूण ७१ लोकांना लागण झाली होती. त्यात ५० लोकांचा मृत्यू झाला होता.
  • २००४मध्ये बांगलादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. केरळमध्ये प्रथमच निपाह विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे.
  • या आजारावर संशोधन सुरु असले तरीही त्यावर अद्याप कोणतेही उपयुक्त औषध सापडलेले नाही. त्यामुळे हा आजार होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
  • ताप, डोकेदुखी, विस्मरण, आळस येणे ही या विषाणूची लागण झाल्याची प्राथमिक लक्षणे आहेत. तर कोमात जाणे आणि मृत्यू ही त्याची गंभीर लक्षणे आहेत.
  • या आजारापासून वाचण्यासाठी झाडावरुन पडलेली फळे तसेच खजूर खाऊ नका असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
  • एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीलाही याचा संसर्ग होतो. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • भारताने २१ मे रोजी ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्राचा कार्यअवधी १० ते १५ वर्षे वाढवणे हा या चाचणीमागचा मुख्य उद्धेश होता.
  • ओडिशाच्या किनारपट्टीवर चांदीपूर येथील एकीकृत चाचणी केंद्रातून मोबाइल लाँचरवरून या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
  • भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमातून हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे. सुमारे १० ते १५ वर्षांपर्यंत कालावधी वाढवलेले ब्राह्मोस हे पहिले भारतीय क्षेपणास्त्र आहे.
  • ब्राह्मोसच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय सशस्त्र दलात सामील होणाऱ्या क्षेपणास्त्राच्या निर्मिती खर्चात मोठी बचत होणार आहे.
  • भारतीय लष्कराने आपल्या शस्त्रागरात ब्राह्मोसचा तीन रेजिमेंटमध्ये यापूर्वी समावेश केला आहे. सर्व क्षेपणास्त्रे ही ब्लॉक-III यंत्रणेने सज्ज आहेत.
  • भारतीय लष्कराकडून ब्राह्मोसचा जमिनीवरून हल्ला करणाऱ्या श्रेणीचा २००७पासून वापर केला जातो.
  • या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर स्वत: वर आणि खाली उड्डाण करून जमिनीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता यात आहे. त्याचबरोबर शत्रूच्या हवाई रक्षा प्रणालीपासूनही हे सुरक्षित राहू शकेल.

नौदलाच्या सहा महिला विश्व सागरपरिक्रमा करून भारतात परत

  • ४ खंड, ३ महासागर आणि सुमारे २१,६०० नॉटिकल मैल अंतर पार करत पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याची कर्तबगारी बजावणाऱ्या नौदलाच्या सहा महिला अधिकाऱ्यांचे पथक २१ मे रोजी भारतात परतले.
  • या सागरी परिक्रमेबरोबरच त्या समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करणाऱ्या पहिल्याच आशियाई महिला ठरल्या आहेत.
  • हे पथक आठ महिन्यांपूर्वी १० सप्टेंबर २०१७ रोजी आयएनएस तारिणी नौकेवरून पृथ्वी प्रदक्षिणेवर निघाले होते.
  • या मोहिमेला ‘नाविका सागर परिक्रमा’ असे नाव देण्यात आले होते. देशातील महिला सशक्तीकरणाला मजबूती देणे आणि भारतीय नौसेनेतर्फे सागरी नौकानयनाचा प्रसार करणे हा या अभियानाचा उद्देश होता.
  • लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखालील या पथकामध्ये लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, स्वाती पी., लेफ्टनंट ऐश्वर्या बोड्डापती, एस. विजया देवी आणि पायल गुप्ता यांचा समावेश होता.
  • पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून परतलेल्या या रणरागिणींचे स्वागत नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
  • एकूण २५४ दिवसांच्या या प्रवासात १९४ दिवस या महिला अधिकाऱ्यांनी समुद्रात घालवले.
  • या प्रवासादरम्यान या महिलांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फॉकलंड आणि दक्षिण आफ्रिकेत चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले.
  • जगभ्रमंती करताना अनेकवेळा त्यांच्या शिडाला ७ मीटर उंची पर्यंतच्या लाटा आणि ताशी ६० किलोमीटर वाऱ्याच्या प्रचंड वेगाचा सामना करावा लागला.
  • सागरी परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करुन परतलेले नौदल महिला अधिकाऱ्यांचे हे पथक २३ मे रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.
  • यापूर्वी कमांडर दिलीप दोंदे यांनी भारताची पहिली विश्व सागरपरिक्रमा आयएनएसव्ही म्हादेई या शिडाच्या नौकेच्या साह्याने केली.
  • नंतर त्याच नौकेवर स्वार होत लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी याने विनाथांबा सागरपरिक्रमा केली.
  • आता तिसरी विश्व सागरपरिक्रमा ही महिला चमूची पार पडली असून त्यासाठी आयएनएसव्ही तारिणी ही नवी शिडाची नौका बांधण्यात आली होती.
 आयएसएनव्ही तारिणी 
  • आयएसएनव्ही तारिणी या ५५ फुट उंचीच्या नौकेची बांधणी गोव्यातील मेसर्स एक्वारीअस शिपयार्ड प्रा. लि. या कंपनीने केली आहे.
  • ही आयएनएसव्ही तारिणी ही आयएनएसव्ही म्हादईची पुढील आवृत्ती आहे. १८ फेब्रुवारी २०१७ रोजी भारतीय नौदलात या नौकेचा समावेश करण्यात आला.
  • वुडन फायबर-ग्लासने बनलेल्या या नौकेची बांधणी समुद्रातील वादळांचा सामना करण्यासाठी सक्षम अशी करण्यात आली आहे.

लिओनेल मेस्सीने पाचव्यांदा युरोपियन गोल्डन बूट पुरस्कार

  • बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पाचव्यांदा युरोपियन ‘गोल्डन बूट’ पटकावण्याचा मान मिळवला आहे.
  • ला लिगा स्पर्धा यावेळी बार्सिलोनाने जिंकली होती. या स्पर्धेत मेस्सीने सर्वाधिक ३४ गोल केल्यामुळे त्याची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
  • या पुरस्काराच्या शर्यतीत मोहम्मद सलाह आणि हॅरी केन हे दोन नामवंत फुटबॉलपटूही होते.
  • गेल्यावर्षीही मेस्सीने या पुरस्काराला गवसणी घातली होती. त्यापूर्वी २०१०, २०१२ आणि २०१३ या वर्षांमध्येही मेस्सी या पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
  • यावर्षी पाचव्यांदा हा पुरस्कार पटकावत मेस्सीने ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकले आहे. रोनाल्डोने आतापर्यंत चारवेळा हा पुरस्कार पटकावला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा