चालू घडामोडी : २६ मे

देशातील सर्वात लांब धोला-सादिया सेतूचे लोकार्पण

  • आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणाऱ्या सुमारे ९.१५ किमी लांबीच्या धोला-सादिया पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ मे रोजी झाले.
  • भविष्यात ईशान्य भारताचा र्सवकष विकास सांधणारा हा सेतू पंतप्रधानांनी देशाला अर्पण करताना या पुलाला प्रख्यात आसामी गायक भूपेन हजारिका यांचे नाव देण्याची घोषणा केली.
  • या पुलामुळे ईशान्येकडील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल आसाम व तिथून पुढे देशभर पाठविण्यास मदत होणार आहे.
 भूपेन हजारिका सेतूची वैशिष्ट्ये 
  • २००३मध्ये आसामचे माजी मुख्यमंत्री मुकुट मिथी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे या सेतूच्या निर्मितीची मागणी केली होती.
  • या सेतूच्या बांधकामाला २०११मध्ये सुरु झाली. हा पूल ब्रम्हपुत्रा नदीची मुख्य उपनदी असलेल्या लोहित नदीवर बांधण्यात आला आहे.
  • ९.१५ किलोमीटर लांबीचा हा पूल देशातील सर्वाधिक लांबीचा पूल असून, वांद्रे-वरळी सागरी सेतूपेक्षा (लांबी: ५.६ किमी) तो ३.५५ किमीने जास्त लांब आहे.
  • या पुलाच्या उभारणीसाठी १०,००० कोटींचा खर्च आला असून, पुलाला जोडण्यासाठी २८.५ किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
  • या पुलामुळे ब्रम्हपुत्रा नदीच्या दक्षिण तटावरील धोला आणि उत्तर तटावरील सादिया हे दोन भाग जोडले जाणार आहेत.
  • या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील अंतर १६५ किलोमीटरने कमी झाली आहे. त्यामुळे इंधनाची आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
  • या पुलामुळे धोला ते सदिया हे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ ५ तासांनी कमी होणार असून, त्यासाठी आता केवळ १ तास लागणार आहे.
  • देशातील सर्वाधिक मोठ्या पुलामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे आणि त्यामुळे रोजगारातदेखील वाढ होणार आहे.
 भूपेन हजारिका सेतूचे सामरिक महत्व 
  • चीनचे आक्रमक आणि विस्तारवादी धोरण लक्षात घेता ब्रम्हपुत्रा नदीवरील धोला-सदिया पूल संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
  • या पुलामुळे लष्कराला भारत-चीन सीमेवर पोहोचण्यासाठी केवळ तीन ते चार तास लागणार आहेत.
  • अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमाभागात लष्कराला तातडीने रसद पुरवण्यासाठी हा सेतू उपयुक्त ठरेल.
  • या पुलामुळे लष्कराचे रनगाडेदेखील सीमेपर्यंत व्यवस्थित जाऊ शकतात. त्यामुळे लष्कराला या पुलाचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
  • या पूलामुळे पूर्वोत्तर सीमेवर लष्कराला अधिक प्रभावीपणे काम करता येणार आहे.

सुपरकॉप केपीएस गिल यांचे निधन

  • ‘सुपरकॉप’, ‘पंजाबचा शेर’ अशी ओळख असलेले पंजाबचे माजी पोलीस महासंचालक कंवरपाल सिंह गिल ऊर्फ केपीएस गिल यांचे २६ मे रोजी दिल्लीत निधन झाले.
  • गिल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तसेच त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
  • गिल तेवीसाव्या वर्षी भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. सुरुवातीला त्यांची नियुक्ती ईशान्य भारतात करण्यात आली.
  • आपल्या कार्यपद्धतीने आसाम-मेघालयातही दरारा निर्माण केला. त्यांनी आसामचे पोलीस महानिरीक्षक पदही भूषविले.
  • पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचा निपटारा करण्यात गिल यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे ते ‘सुपरकॉप’ नावाने ओळखले जाऊ लागले.
  • १९८८मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात दडून बसलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी राबविलेल्या ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’चे नेतृत्त्व गिल यांनी केले होते.
  • १९८८ ते १९९० दरम्यान पंजाब पोलीस महासंचालक म्हणून सेवा बजावल्यानंतर १९९१मध्ये त्यांची पुन्हा पंजाबच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
  • निवृत्तीनंतर छत्तीसगडमधील नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गिल भारतीय हॉकी संघाचे माजी अध्यक्षसुद्धा होते.
  • प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल १९८९मध्ये केपीएस गिल यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

यूएनएफसीसीसीच्या उपकार्यकारी सचिवपदी ओवैस सरमद

  • मूळचे भारतीय, पण लंडनमध्ये राहणारे ओवैस सरमद यांची नियुक्ती आता युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी)चे उपकार्यकारी सचिव या पदावर झाली आहे.
  • संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अ‍ॅण्टोनियो गेटरस यांनी विविध देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सरमद यांची नियुक्ती केली.
  • वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकार अशी ओळख असलेल्या सरमद हे मूळचे हैदराबादचे असून, त्यांचा जन्म १९६०साली झाला.
  • स्थानिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी बीकॉम पदवी मिळवली.
  • नंतर ते लंडनला गेले व तेथील चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटंट्स या विख्यात संस्थेतून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली.
  • नंतर सरकारी आणि खासगी क्षेत्रांत वित्तीय व्यवस्थापनातील विविध पदांवर त्यांनी काम केले. १९९०मध्ये स्थलांतरितांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेत ते रुजू झाले.
  • सुरुवातीची काही वर्षे ते या संघटनेच्या अर्थसंकल्प विभागात होते. कालांतराने ते या विभागाचे प्रमुख बनले.
  • संघटनेच्या व्यवस्थापनाबरोबरच संघटनेची धोरणे निश्चित करण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
  • संघटनेचे काम वाढवण्याबरोबरच संघटनेतील सदस्यांसाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्याचे मोठे काम त्यांनी केले.
  • ही संघटना संयुक्त राष्ट्रांच्या कामाशी निगडित राहावी, यासाठी नेमलेल्या समितीचे ते सदस्य होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा