चालू घडामोडी : ३० मे

भारत-जर्मनी यांच्यात आठ सामंजस्य करार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या युरोप दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ३० मे रोजी जर्मनीत झालेल्या भारत-जर्मनी शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
  • जर्मनी येथे आयोजित कऱण्यात आलेली ही चौथी परिषद होती. यावेळी त्यांच्यासोबत जर्मनीच्या चॅन्सेलर अॅंजेला मर्केल याही उपस्थित होत्या.
  • उभय देशांमध्ये प्रत्येक दोन वर्षांनी होणाऱ्या या परिषदेत मोदी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांसोबत उपस्थित होते. याआधीची परिषद दिल्लीमध्ये २०१५ साली पार पडली होती.
  • या परिषदेमध्ये भारत-जर्मनी यांच्यात विविध क्षेत्रातील सहकार्यासाठी आठ करार करण्यात आले.
  • त्यात सायबर गुन्हेगारी, शाश्वत शहर विकास, कौशल्य विकास, रेल्वे सुरक्षा यांचा समावेश आहे. शाश्वत विकासासाठी भारत-जर्मन केंद्राची स्थापनाही केली जाणार आहे.
  • जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याशी मोदी यांनी व्यापार, कौशल्य विकास, सायबर सुरक्षा व दहशतवाद अशा अनेक मुद्दय़ांवर चर्चा केली.
  • युरोपीय समुदायात जर्मनी हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. भारतात जर्मनीच्या १६०० कंपन्या असून ६०० संयुक्त प्रकल्प आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने ही परिषद महत्त्वाची आहे.

बांगलादेशमध्ये ‘मोरा’ चक्रीवादळ

  • ‘मोरा’ चक्रीवादळाने ३० मे रोजी बांगलादेशच्या किनाऱ्याला धडक दिली असून, किनारपट्टीवर गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. 
  • या वादळामुळे प्रतितास ११७ किमी वेगाने वारे वाहत आहेत. नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
  • या वादळाचा परिणाम म्हणून ईशान्य भारतातही जोरदार पाऊस पडत आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावर या वादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे.
  • बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे चक्रीवादळ तयार झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
  • या चक्रीवादळामुळे भारतातील मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा