चालू घडामोडी : ३१ मे

युपीएससी २०१६चा निकाल जाहीर

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०१६मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत नंदिनी केआर हिने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
  • तर विश्वांजली गायकवाड महाराष्ट्रातून प्रथम आली असून, देशात तिने अकरावा क्रमांक पटकावला आहे.
  • या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकावर अनमोल शेर सिंह बेदी आणि तिसऱ्या क्रमांकावर गोपालकृष्ण रोनंकी आला आहे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विविध पदासांठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत १०९९ उमेदवारांना यश मिळाले आहे.

बालचित्रवाणीच्या ऐवजी आता ई-बालभारती

  • लहान मुलांचे दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रम बनवण्यासाठी कार्यरत असलेली राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी) बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे.
  • बालचित्रवाणीच्या ऐवजी आता ई-बालभारती या नवीन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • शैक्षणिक कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी सरकारने २७ जानेवारी १९८४ रोजी बालचित्रवाणीची स्थापना केली.
  • बालचित्रवाणीकडून आतापर्यंत ६ हजार दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे.
  • दूरदर्शनवर दररोज बालचित्रवाणीचे कार्यक्रम दाखविण्यात येत होते. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. 
  • पुण्यामध्ये राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाजवळ बालचित्रवाणीचे प्रशस्त कार्यालय आहे.
  • बालचित्रवाणीची सर्व स्थावर, जंगम मालमत्ता संस्थेच्या रेकॉर्डसह बालभारती या संस्थेकडे वर्ग करण्यात येणार आहे.
  • याठिकाणी लवकरच ई-बालभारती या नवीन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
  • बालचित्रवाणी संस्थेमार्फत दूरदर्शनवरून १९८६ ते २०१२ या कालावधीमध्ये नि:शुल्क कार्यक्रम प्रक्षेपित केले जात होते.
  • मात्र दूरदर्शनने हे कार्यक्रम दाखविण्यासाठी प्रक्षेपण शुल्क आकारल्यामुळे फेब्रुवारी २०१४पासून प्रक्षेपण बंद करण्यात आले.
  • संस्थेला केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदानही एप्रिल २००३नंतर बंद झाले. त्यामुळे ही संस्था आर्थिक अडचणीत सापडली होती.
  • औद्योगिक कलह कायद्यानुसार ५० पेक्षा कमी कामगार असणारी संस्था आर्थिक विवंचनेत सापडल्यास बंद करता येते. त्यानुसार ही संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रात ‘दरवाजा बंद’ अभियान

  • संपूर्ण महाराष्ट्र मार्च २०१८ सालापर्यंत हागणदारीमुक्त करण्यासाठी ‘दरवाजा बंद’ अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० मे रोजी केला.
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • पेयजल व स्वच्छता मंत्रालय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी २०१८पर्यंत सर्व शहरे हागणदारीमुक्त होतील, असे प्रतिपादन केले.
  • आजपर्यंत राज्यातील २५० पैकी २०० शहरे हागणदारीमुक्त झालेली आहेत. मार्च २०१८पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त केले जाईल.
  • तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, ठाणे, भंडारा, पुणे, नागपूर, वर्धा आणि गोंदिया हे ११ जिल्हे संपूर्णत: हागणदारीमुक्त झालेले आहेत.

प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक दसरी नारायण राव यांचे निधन

  • प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक आणि यूपीएच्या सरकारमधील माजी कोळसा राज्यमंत्री दसरी नारायण राव यांचे ३० मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
  • राष्ट्रीय पुरस्कार विजेते दसरी यांनी साधारणपणे १२५ सिनेमांचे दिग्दर्शन केले. यासाठी त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही समाविष्ट करण्यात आले होते.
  • त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांपैकी प्रेमाभिषेकम, मेघा संदेशाम, ओसे रामुलामा आणि टाटा मनावदु हे चित्रपट पडद्यावर खूप गाजले होते.
  • तसेच, चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
  • काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आत्मचरित्र बनवण्याची घोषणा त्यांनी केली होती.
  • यूपीए सरकारच्या कार्यकाळात ते केंद्रीय मंत्री होते. ते कोळसा मंत्रालयात राज्यमंत्री होते. कोळसा घोटाळा प्रकरणात त्यांच्या नावाचाही समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा