चालू घडामोडी : १८ नोव्हेंबर

लेफ्टनंट जनरल एस के सिन्हा कालवश

  • लेफ्टनंट जनरल श्रीनिवास कुमार अर्थात एस के सिन्हा यांची १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
  • १९८३मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हरमिंदर साहिबवर (सुवर्ण मंदिर) हल्ला करून दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी योजना तयार करण्याची सूचना सिन्हा यांना केली होती.
  • सुवर्ण मंदिरात धडक कारवाई केल्यास शीख समाजात असंतोष उफाळेलच, पण लष्करातील ऐक्यही धोक्यात येईल. म्हणून ही कारवाई वेगळ्या पद्धतीने करावी असे त्यांचे मत होते.
  • परंतु लष्करप्रमुखपदासाठी पात्र असतानाही डावलल्याच्या भावनेने दुखावलेल्या सिन्हा यांनी १९८३मध्ये लष्करी सेवेला रामराम केला.
  • पुढे १९८४मध्ये सुवर्ण मंदिरात सैन्याने कारवाई (ऑपरेशन ब्ल्यू स्टार) करून दहशतवाद्यांचा अंत केला.
  • तरी त्यानंतर इंदिराजी आणि जनरल वैद्य यांनाही अतिरेक्यांच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले, तेव्हा सिन्हा यांची भूमिका किती योग्य होती याची प्रचीती आली.
  • सैन्यात १९४३ ते १९८३ अशी चाळीस वर्षे त्यांनी विविध पदे भूषविली. १९९७मध्ये सिन्हा यांची आसामच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली.
  • लष्करातील ऐक्याची भावना वृद्धिंगत करणे, आर्थिक विकास आणि राज्यातील भरकटत जाणाऱ्या तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या समुपदेशनावर त्यांनी भर दिला.
  • नंतर २००३मध्ये ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल बनले. तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती महमद सईद यांच्याशी त्यांचे संबंध कायमच तणावाचे राहिले.
  • काश्मीरसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी विविध वृत्तपत्रांत अनेक वर्षे स्तंभलेखन केले.
  • काश्मीर आणि आसाम प्रश्नावर मूलगामी विचार मांडणारी दोन व अन्य विषयांवरील सात पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
  • ९२ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य जगल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा सैन्यदलात प्रशंसनीय सेवा बजावलेला एक योद्धा देशाने गमावला.

ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा

  • सणांनिमित्त होणाऱ्या आतषबाजीमुळे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी राज्य सरकारने ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद केली आहे.
  • ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्यास नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी व पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असा आदेश सरकारने दिला आहे.
  • ध्वनिप्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, श्रवणशक्तीवर दुष्परिणाम, वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडण्याच्या अनेक शक्यतांना सामोरे जावे लागते.
  • अशा परिस्थितीत चांगल्या आरोग्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे.

धावपटू धरमवीरसिंगवर आठ वर्षांची बंदी

  • डोप चाचणीत अपयशी ठरल्यामुळे रिओ ऑलिम्पिकला अनुपस्थित राहिलेला हरियाणाचा वेगवान धावपटू धरमवीरसिंग याच्यावर राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) आठ वर्षांची बंदी घातली आहे.
  • २०० मीटर शर्यतीचा धावपटू असलेला धरमवीर याला ११ जुलै रोजी बंगळुरू येथे झालेल्या इंडियन ग्रॅन्डप्रिक्सदरम्यान झालेल्या डोप चाचणीत दोषी धरण्यात आले होते.
  • धरमवीर दुसऱ्यांदा डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने नाडाच्या शिस्तपालन समितीने त्याच्यावर आठ वर्षे बंदीचा निर्णय घेतला आहे.
  • याआधी २०१२मध्ये डोप टेस्ट देण्यास टाळाटाळ करणाऱ्या धरमवीरकडून आंतरक्षेत्रीय चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेले १०० मीटरचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले होते.
  • धरमवीरने इंडियन ग्रॅन्डप्रिक्समध्ये २०० मीटर शर्यत राष्ट्रीय विक्रमासह २०.४५ सेकंदांत जिंकली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा