चालू घडामोडी : ३० सप्टेंबर

पाच राज्यांत नव्या राज्यपालांच्या नियुक्त्या

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ३० सप्टेंबर रोजी पाच राज्यांत नव्या राज्यपालांची तर एका केंद्रशासित प्रदेशामध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली आहे.
  • बिहार, तामिळनाडू, मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांसाठी तर अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 तामिळनाडू 
  • सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे भाजपचे ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे बराच काळपासून तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.
  • पुरोहित यांच्या नियुक्तीमुळे तामिळनाडूला पूर्णवेळ राज्यपाल मिळाले आहेत. बनवारीलाल पुरोहित हे विदर्भातील नेते आहेत.
  • १९७७ मध्ये ते राजकारणात सक्रीय झाले. १९७८ मध्ये ते नागपूर पूर्वमधून प्रथम आमदार म्हणून निवडून आले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे.
 बिहार 
  • भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सत्यपाल मलिक हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून, ते काही काळ लोकसभा व राज्यसभा सदस्य होते.
  • ते जनता दलाचे नेते होते. नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेशातील जाटांचे नेते अशीही त्यांची ओळख होती.
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून नाव निश्चित झाल्यानंतर त्यांनी बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून बिहारच्या राज्यपालांचे पद रिक्त होते.
 आसाम 
  • आसामच्या राज्यपालपदी प्राध्यापक जगदीश मुखी यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. जगदीश मुखी दिल्ली भाजपाचे नेते म्हणून ओळखले जातात.
  • दिल्ली सरकारमध्ये त्यांनी अर्थ, नियोजन, अबकारी कर, कररचना व उच्च शिक्षण मंत्री म्हणून काम केले आहे.
 मेघालय 
  • बिहार विधान परिषदेचे माजी सदस्य गंगाप्रसाद यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे
 अरुणाचल प्रदेश 
  • सेवानिवृत्त ब्रिगेडियर बी डी मिश्रा हे अरुणाचल प्रदेशचे नवे राज्यपाल असतील. 
  • सध्या नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार पहात होते.
 अंदमान आणि निकोबार 
  • निवृत्त अॅडमिरल देवेंद्र कुमार जोशी यांची अंदमान आणि निकोबारच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन

  • बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते टॉम अल्टर यांचे २९ सप्टेंबर रोजी मुंबईत कर्करोगामुळे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
  • अल्टर यांचा जन्म १९५० साली मसुरीमध्ये झाला. त्यांचे उच्च शिक्षण येल विद्यापीठात झाले. १९७० नंतर ते पुन्हा भारतात आले.
  • पुण्यातील ‘एफटीआयआय’मध्ये त्यांना १९७२मध्ये प्रवेश मिळाला. पुढे त्यांनी अभिनयामध्ये डिप्लोमा केला, ज्यात त्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात आले.
  • टॉम अल्टर यांनी १९७६मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या चरस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
  • शतरंज के खिलाडी, गांधी, क्रांती, बोस : द अनफरगॉटन हिरो आणि वीर झारा यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली. ‘दप्तर’ या मराठी चित्रपटातही ते दिसले.
  • मात्र ९०च्या दशकात दूरदर्शनवरील ‘जबान संभालके’ या शोनंतर अल्टर बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले.
  • नव्वदच्या दशकात जुनून या मालिकेत त्यांनी साकारलेली गॅंगस्टर केशव कलसीची भूमिकादेखील विशेष गाजली होती.
  • याचबरोबर, जुगलबंदी, भारत एक खोज, घुटन, शक्तीमान, मेरे घर आना जिंदगी, यहॉं के हम सिकंदर यासारख्या मालिकामधूनही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली.
  • त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि ३००हून अधिक चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. अल्टर यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.
  • नाटकविश्वातहि अल्टर हे मोठे नाव होते. पृथ्वी थिएटर्ससाठी अनेक नाटकांत त्यांनी काम केले आहे.
  • १९७७साली नसिरुद्दीन शहा आणि बेंजामिन गिलानी यांसोबत मिळून अल्टर यांनी मॉटले प्रोडक्शनची स्थापना केली.
  • भारतीय संस्कृतीची उत्तम जाण असलेल्या अल्टर यांना इंग्रजीसह अस्खलित उर्दू आणि हिंदीत लिहिता, वाचता आणि बोलता यायचे.
  • विशेषतः त्यांना उर्दू शायरीची आवड होती. ‘गालिब इन दिल्ली’ नाटकात त्यांनी उर्दू कवी मिरझा गालिब यांची लक्षवेधी भूमिका साकारली होती.
  • १९८० ते ९० दरम्यान त्यांनी क्रीडा पत्रकार म्हणूनही काम केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्हीसाठी मुलाखत घेणारे टॉम अल्टर पहिले पत्रकार होते.
  • चित्रपट आणि कलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल २००८मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

‘व्हीव्हीपॅट’चा वापर करणारे गुजरात पहिले राज्य

  • गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रांवर ‘व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल’ (व्हीव्हीपॅट) यंत्राचा वापर केला जाणार आहे.
  • केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील प्रत्येक मतदाराला प्रथमच मतदान केल्याची पावती मिळणार आहे. 
  • ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रामुळे मतदारांना त्यांचे मत योग्य प्रकारे नोंद झाले आहे अथवा नाही, याची खात्री करता येणार आहे. तसेच शंका आल्यास तक्रारही करता येणार आहे.
  • मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यावर असणार आहे.
  • मतदाराने केलेली तक्रार बनावट असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी त्या मतदाराविरोधात तक्रारही करू शकतो. नियमानुसार, अशा प्रकारात संबंधित मतदाराला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 
  • देशातील सर्व निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबरोबरच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
  • त्यानुसार संपूर्ण राज्यात ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापर करणारे गुजरात हे पहिले मोठे राज्य ठरणार आहे.
  • २०१४च्या लोकसभा निवडणुकीत गांधीनगर मतदारसंघात या यंत्राचा प्रायोगिक तत्त्वावर वापर झाला होता. आता गुजरातमधील १८२ मतदारसंघांमधील ५०,१२८ मतदान केंद्रांवर या यंत्राचा वापर होणार आहे.

संपूर्ण राज्यात महिला सभेचे आयोजन

  • महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १ ऑक्टोबरला महिला सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सहभागी महिला ‘गावात गर्भलिंग निदान होऊ देणार नाही’ अशी शपथ घेणार आहेत.
  • तसेच ग्रामपंचायत विकास आराखड्यातील १० टक्के निधी महिलासाठी राखीव ठेवणे आणि महिलांना उघड्यावर शौचास जावे लागू नये, यासाठी प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचा एकमताने ठराव देखील करण्यात येणार आहे.
  • महिलांनी आपल्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्यादृष्टीने ठराव करावे, अशी सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
  • त्याला मंजुरी देत आयोगाने सुचवलेले सर्व ठराव राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी करावे, असे आदेश राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाकडून सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.
  • ग्रामपंचायतींना ताकद देणाऱ्या ७३व्या आणि ७४व्या घटना दुरुस्तीला यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून, महिलांना गावाच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी महिला सभा हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
  • स्त्रीभ्रूण हत्या, मुलींचा घटता जन्मदर यातून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याची होणारी पिछेहाट रोखणे गरजेचे आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे निधन

  • काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे २८ सप्टेंबर रोजी गुरुग्राम येथे निधन झाले. फोतेदार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तियांपैकी एक होते.
  • त्यांना ‘काँग्रेसचे चाणक्य’ म्हणूनही ओळखले जात होते. १९८०-८४ या काळात इंदिरा गांधींचे ते राजकीय सचिवही होते. त्याचप्रमाणे राजीव गांधी यांचेही ते काही काळासाठी राजकीय सचिव होते.
  • माखनलाल फोतेदार मुळचे जम्मू-काश्मीरचे होते. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
  • फोतेदार काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीचे दीर्घकाळ सदस्य होते. तसेच, आताही त्यांना कार्यकारिणी समितीत 'आजीव आमंत्रित' दर्जा देण्यात आलेला होता.
  • फोतेदार यांचा जन्म ५ मार्च १९३२ रोजी झाला. पहलगाम मतदारसंघातून ते जम्मू-काश्मीर विधानसभेत निवडून गेले होते. ते जम्मू-काश्मीर सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते.
  • त्यानंतर ते राज्यसभेचे सदस्य झाले आणि केंद्रात मंत्री झाले. राज्यसभेत दोन टर्म निवडून जाण्याची संधी त्यांना मिळाली होती.
  • फोतेदार यांच्या 'द चिनार लिव्हज' या पुस्तकाचे २००५साली प्रकाशन झाले. या पुस्तकातील काही उल्लेखांमुळे वाद ही निर्माण झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा