चालू घडामोडी : १० जानेवारी

सिंगल ब्रँड रिटेल ट्रेडिंग क्षेत्रात १०० टक्के एफडीआयला मंजुरी

  • परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सिंगल ब्रँड रिटेल ट्रेडिंग तसेच बांधकाम क्षेत्रात १०० टक्के एफडीआयला मंजुरी दिली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
  • याशिवाय परदेशी गुंतवणूकदार आणि परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांच्या प्राथमिक बाजारांतर्गत पॉवर एक्सचेंजमध्ये देखील गुंतवणूकीसाठी मंजूरी दिली आहे.
  • काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने संरक्षण, बांधकाम विकास, वीमा, पेंशन आणि इतर वित्तीय सेवांसहित प्रसारण, नागरी हवाई वाहतुक आणि फार्मा क्षेत्रातील एफडीआय धोरणांमध्ये सुधारणा केल्या होत्या.
  • एफडीआयला मंजुरी दिल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणूक, उत्पन्न आणि रोजगारांत मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
 एअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआयला मंजुरी 
  • याचबरोबरच डबघाईला आलेल्या एअर इंडियाला नवसंजीवनी देण्यासाठी एअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआयला मंजुरी दिली आहे.
  • त्यामुळे आता परदेशी विमान कंपन्या एअर इंडियामध्ये भागीदारी करता येणार आहे. परंतु कंपनीची मालकी आणि नियंत्रण भारताकडेच राहणार आहे.
  • एअर इंडिया देशातील एकमेव सार्वजनिक हवाई प्रवासी वाहतूक कंपनी असून तिच्यावर ५२,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे.
  • आत्तापर्यंत परदेशी विमान कंपन्यांना भारतातील विमान कंपन्यांमध्ये ४९ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी होती. मात्र एअर इंडियाचा यात समावेश नव्हता.
  • एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीकरणाच्या प्रक्रियेला केंद्रीय मंत्रिमंडळाने जूनमध्ये मान्यता दिली होती.

आधारकार्डसाठी नवी टू-लेयर सेफ्टी सिस्टीम

  • आधार कार्डधारकांची गोपनीयता अधिक सुरक्षित करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने नवी टू-लेयर सेफ्टी सिस्टीम जारी केली आहे.
  • ही टू-लेयर प्रक्रिया म्हणजे व्हर्चुअल आयडी आणि लिमिटेड केवायसी. व्हर्चुअल आयडीमुळे आधार ऑथेंटिकेशन आधीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहे.
  • या प्रक्रियेमुळे यापुढे आपल्याला प्रत्येक ठिकाणी सत्यता पडताळणीसाठी (ऑथेंटिकेशन) आधार क्रमांक देण्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी १६ डिजीटचा व्हर्चुअल आयडी ग्राह्य धरण्यात येईल.
  • हा क्रमांक आवश्यक असेल तेव्हा संगणकीय पद्धतीने तत्काळ जनरेट करता येईल. सर्व संस्था १ जून २०१८ पासून ही नवी पद्धत अंमलात आणणार आहेत.
  • लिमिटेड केवायसी सुविधा आधारकार्डधारकांसाठी नव्हे तर संस्थांसाठी आहे. लिमिटेड केवायसी सुविधेंतर्गत कोणतीही संस्था तुमचा आधार क्रमांक साठवून ठेवू शकणार नाहीत.
  • या सुविधेमुळे संस्थांना आधार क्रमांकावर अवलंबून न राहता स्वत:चे केवायसी करण्याची परवानगी देण्यात येईल. परिणामी संस्था टोकन क्रमांकाद्वारे ग्राहकांची ओळख पटवतील.
  • रिझर्व्ह बँकेने अलिकडेच एका अहवालाद्वारे आधारच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर सरकारने हे पाउल उचलले आहे.

भारताचा विकासदर ७.३ टक्के : जागतिक बँकेचा अंदाज

  • २०१८मध्ये भारताचा विकासदर ७.३ टक्क्यांवर असेल, असा अंदाज जागतिक बँकेने ‘२०१८ ग्लोबल इकोनॉमिक प्रॉस्पेक्ट’ या अहवालात वर्तवला आहे.
  • याशिवाय पुढील दोन वर्षांमध्ये भारताचा विकासदर ७.५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यताही जागतिक बँकेने वर्तवली आहे.
  • नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्यासारखे निर्णय घेऊनही २०१७मध्ये भारताचा विकास दर ६.७ टक्के राहिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • २०१७मध्ये चीनचा विकासदर ६.८ टक्के म्हणजे भारताच्या तुलनेत केवळ ०.१ टक्क्याने अधिक आहे. २०१८मध्ये चीनचा विकासदर ६.४ टक्के असेल असा अंदाज आहे.
  • याउलट २०१७-१८चा जीडीपी ६.५ टक्क्यांवर येण्याचा अंदाज केंद्र सरकारच्या सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिसद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.
  • खरिपात चांगली पिके आली असली तरी कृषी, उत्पादन क्षेत्रात घट होईल आणि बांधकाम व खनिज कर्म क्षेत्र सकारात्मक राहण्याचा अंदाज सीएसओने व्यक्त केला आहे.

आप सरकारची मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना

  • दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार दरवर्षी ७७ हजार ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांहून अधिक वय) मोफत तीर्थयात्रेची सुविधा देणार आहे.
  • दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी यांनी या योजनेची घोषणा केली असून, या योजनेला ‘मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना’ असे नाव असेल.
  • ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे ३ लाख रूपयांपेक्षा कमी आहे आणि जे सरकारी किंवा स्वायत्त संस्थेचे कर्मचारी नाहीत, त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
  • मथुरा-वृंदावन-आग्रा-फत्तेपूर सिक्री, हरिद्वार-ऋषिकेश-नीलकंठ, पुष्कर-अजमेर, अमृतसर-आनंदपूर साहिब आणि जम्मू-वैष्णो देवी मंदिराचा या योजनेत समावेश आहे.
  • यातील स्थान निवडण्याचे ज्येष्ठांना स्वातंत्र्य आहे. यात प्रवास खर्च, निवासस्थान आणि जेवण्याची सोय केली जाईल.
  • प्रत्येक यात्रेकरूसाठी ७ हजार रूपये खर्च करण्यात येतील. ही यात्रा तीन दिवस आणि दोन रात्रीसाठी असेल.
  • ज्येष्ठ नागरिक आपल्याबरोबर १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचा एक परिचारक ठेऊ शकतात. त्याचा खर्चही सरकार करेल.
  • प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून प्रत्येकवर्षी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या यात्रेकरूंमधून ११०० ज्येष्ठ नागरिक ड्रॉ काढून निवडले जातील.

नगराध्यक्षावरील अविश्वास ठरावाच्या नियमांमध्ये बदल

  • थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षावर अडीच वर्षांपर्यंत अविश्वास ठराव आणता येणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
  • अडीच वर्षांनंतर अविश्वास ठराव आणल्यास तर नगराध्यक्षाला पदावरून हटवायचे की नाही, याचा निर्णयही सरकारकडे असणार आहे.
  • अडीच वर्षांनंतर अविश्वास ठराव आणण्यासाठी ५० टक्के नगरसेवकांची गरज असेल. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा लागेल.
  • हटविण्यामागची/त्यांच्या गैरवर्तणुकीची कारणे नमूद करावी लागतील. त्यांची चौकशी जिल्हाधिकारी करतील आणि त्यात दोषी आढळल्यास ते सरकारला अहवाल देतील. सरकार त्याआधारे नगराध्यक्षांचा फैसला करेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा