चालू घडामोडी : २९ मार्च

जीसॅट-६ए या दळणवळण उपग्रहाचे इस्त्रोद्वारे यशस्वी प्रक्षेपण

  • भारताच्या आजवरच्या सर्वात मोठया स्वदेशी बनावटीच्या जीसॅट-६ए या दळणवळण उपग्रहाचे इस्त्रोने २९ मार्च रोजी यशस्वी प्रक्षेपण केले.
  • आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन जीएसएलव्ही रॉकेटमधून जीसॅट-६ए उपग्रह अवकाशात झेपावला.
  • इस्रोच्या या अभूतपूर्व यशामुळे लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार असून, संपर्काचं जाळ विस्तारण्यासाठी याची मदत होणार आहे.
  • २०६६ किलो वजनाच्या या उपग्रहाच्या बांधणीसाठी २७० कोटी रुपये खर्च आला आहे. या उपग्रहाचे आयुर्मान १० वर्षे आहे.
  • जीसॅट-६ए या दळणवळण उपग्रहाकडे सर्वात मोठी अँटिना असून इस्त्रोने या अँटिनाची निर्मिती केली आहे. उपग्रह अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर ६ मीटर व्यासाचा हा अँटिना छत्रीसारखा उघडेल.
  • जीसॅट-६ए हा उपग्रह तीन वर्षांपूर्वी अवकाशात पाठवण्यात आलेल्या जीसॅट-६ या उपग्रहाला मदत करणार आहे.
  • जीसॅट-६ए मुळे सॅटलाइट आधारित मोबाइल कॉलिंग आणि कम्युनिकेशन सेवा अधिक प्रभावी होईल.
  • जीसॅट-६ए मुळे दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होईल.
  • जीसॅट-६एच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात आलेल्या जीएसएलव्हीत शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. या इंजिनाचा चांद्रयान-२ मोहिमेतही वापर केला जाण्याची शक्यता आहे.
  • इस्रोचे नवे अध्यक्ष के. सिवन यांनी जानेवारी २०१८मध्ये सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचे हे पहिलेच यशस्वी मिशन आहे.

अण्णा हजारे यांचे उपोषण मागे

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सात दिवसांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
  • अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्यांना तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी सरकारला ६ महिन्यांची मुदत दिली आहे.
  • लोकपालची मागणी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडूणक प्रक्रियेतील महत्त्वाच्या बदलांना संमती या मागण्यांसाठी अण्णा हजारे मागील सात दिवसांपासून दिल्लीतील रामलीला मैदानावरील उपोषणाला बसले होते.
  • त्यानंतर सातव्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.
  • कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णा हजारेंनी केलेल्या मागण्यांपैकी मान्य झालेल्या मागण्यांचे पत्र वाचून दाखवले.
  • या पत्रात कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. मात्र या मागण्यांना तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
 अण्णांच्या मागण्या 
  • शेतीमालाला उत्पादन खर्चाहून ५० टक्के अधिक भाव.
  • शेतीवर अवलंबून असलेल्या ६० वर्षांवरील शेतकरी व मजुरांना दरमहा ५ हजार रुपये निवृत्तिवेतन.
  • निवडणूक आयोगाप्रमाणेच कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता.
  • लोकपालची त्वरित नियुक्ती व्हावी. लोकपालप्रमाणे राज्यांत सक्षम लोकायुक्त कायदा, त्यातील कमकुवत करणारे कलम ६३ व ४४मध्ये बदल.
  • मतपत्रिकेवर उमेदवाराचे रंगीत छायाचित्र असावे.
  • मतमोजणीसाठी टोटलायझर मशिनचा उपयोग.
  • लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा