चालू घडामोडी : २५ फेब्रुवारी

‘रायरंद’चा नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरव

  • दिग्दर्शक रमेश पोपट ननावरे व लेखक आशिष अशोक निनगुरकर यांच्या ‘रायरंद’ या चित्रपटाला नोएडा येथे संप्पन झालेल्या चौथ्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक्सलन्स पुरस्कार मिळाला.
  • या चित्रपटाचे खास स्क्रीनिंगही नोएडा येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. चित्रपटाला नोएडा रसिकांची प्रचंड दाद मिळाली.
  • न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज यांची निर्मिती असलेल्या ‘रायरंद’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण नगर जिल्ह्यात झाले असून जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी या चित्रपटात अभिनय केला आहे.
  • ‘रायरंद’ या चित्रपटात बहुरूपी बालमजुरांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात एका लोककलावंत बहुरूपी माणसाची गोष्ट मांडण्यात आलेली आहे.
  • श्रीरामपूरचे कलावंत श्यामकुमार श्रीवास्तव यांनी मुख्य ‘रायरंद’ची भूमिका साकारली आहे. अभिनेता आनंद वाघ यांनी या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे.
  • आशिष निनगुरकर यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. गीतलेखन भावेश लोंढे व आशिष निनगुरकर यांचे आहे. लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

शंकराच्या ११२ फुटांच्या मूर्तीचे अनावरण

  • महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोईम्बतूरमध्ये ११२ फुटांच्या शंकराच्या मूर्तीचे अनावरण केले आहे. ‘आदियोगी’ असे या शिवप्रतिमेचे नाव आहे.
  • ईशा फाउंडेशनतर्फे भगवान शंकराच्या ११२ फूट उंच मूर्तीची उभारणी करण्यात आली आहे. ही मूर्ती स्टीलचे तुकडे जोडून तयार करण्यात आली आहे.
  • तसेच, येथील नंदीची मूर्ती तिळाचे बी, हळद, भस्म आणि रेती तसेच मातीपासून बनविण्यात आली आहे.
  • भगवान शंकराच्या भव्यदिव्य मूर्तीचे अनावरण करताना पंतप्रधान मोदींनी योग करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
  • ईशा फाऊंडेशनकडून लवकरच देशाच्या विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या मूर्ती उभारण्यात येणार आहेत.
  • कोईम्बतूरमधील शंकराची मूर्तीचे डिझाईन तयार करण्यात अडीच वर्षांचा कालावधी लागला आहे. आठ महिन्यांमध्ये या मूर्तीची उभारणी करण्यात आली.
  • या मूर्तीचा भगवान शंकराचा चेहरा स्टिलच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. या मूर्तीचे वजन ५०० टन इतके आहे.
  • ईशा फाउंडेशनचे संस्थापक: योगगुरु जग्गी वासुदेव

नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ केनेथ अ‍ॅरो यांचे निधन

  • आपल्या सिद्धांतांनी विमा, वैद्यकीय सुविधा, शेअर बाजार या संकल्पनांतील अर्थकारण बदलून टाकणारे नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ केनेथ जोसेफ अ‍ॅरो यांचे २१ फेब्रुवारी २०१७ रोजी निधन झाले.
  • त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९२१ रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून गणितात एम.ए. पदवी घेतली.
  • १९५१मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी घेतली, त्यात त्यांनी समाजाने निवडलेले पर्याय व व्यक्ती निवडत असलेले पर्याय यांचा संबंध दाखवला आहे.
  • अर्थशास्त्रात संशोधन करताना त्यांनी सामाजिक न्याय व त्याबाबतचे पर्यायी मार्ग यावर भर दिला.
  • पदवी अभ्यास करीत असताना त्यांनी युद्धकाळात हवामान संशोधक म्हणून व एअर कोअर कॅप्टन म्हणून काम केले.
  • नंतर त्यांनी रॅण्ड कॉर्पोरेशनमध्ये व हार्वर्ड विद्यापीठात अध्यापक म्हणूनही काम केले. स्टॅनफर्ड विद्यापीठात त्यांनी ११ वर्षे अध्यापनाचे काम केले. 
  • दैनंदिन व्यवहारातील आर्थिक समस्यांवर त्यांनी मोठे योगदान दिले. त्यात विमा, आरोग्यसेवा व हवामान बदल यांचा समावेश होता.
  • त्यांनी इकॉनॉमिस्टस स्टेटमेंट ऑन क्लायमेंट चेंज पुस्तकाचे सहलेखन केले होते, त्यात त्यांनी हवामान बदलांच्या धोक्याबाबत इशारा दिला होता.
  • सोशल चॉइस अ‍ॅण्ड इंडिव्हिज्युअल व्हॅल्युज या पुस्तकात त्यांनी बहुमताच्या मतदान नियमांतील फोलपणा दाखवून दिला होता, त्यात शेवटी अनपेक्षित निकाल कसा लागतो याचे विवेचन केले.
  • अ‍ॅरो यांना १९७२मध्ये ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन हिक्स यांच्यासमवेत नोबेल मिळाले होते. बाजारपेठ अर्थशास्त्रातील सर्वसाधारण समतोलाचे विवेचन त्यांनी ग्राहक व उत्पादक यांच्यातील अन्योन्यसंबंधातून दाखवले होते.
  • अर्थशास्त्रातील अमेरिकेचे पहिले नोबेल विजेते पॉल सॅम्युअलसन यांनी अ‍ॅरो हे विसाव्या शतकातील महान अर्थशास्त्रज्ञ असल्याचे म्हटले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा