चालू घडामोडी : ८ ऑक्टोबर

रेल्वेतील व्हीआयपी संस्कृती संपविण्याचे प्रयत्न

  • रेल्वेतील व्हीआयपी संस्कृती संपवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उच्च पदस्थांना दिली जाणारी विशेष वागणूक रद्द करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे.
  • रेल्वे अधिकाऱ्यांनी ‘विशेष वागणूक’ सोडून घरी व कामाच्या ठिकाणी साधेपणा अंगिकारण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.
  • रेल्वे बोर्ड अध्यक्ष किंवा सदस्यांच्या विभागीय भेटीदरम्यान महाव्यवस्थापकांनी त्यांच्या स्वागताला आणि परतीच्या वेळी हजर राहणे आत्तापर्यंत बंधनकारक होते.
  • याशिवाय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या आगमनावेळी हाताखालच्या अधिकाऱ्यांना फुलांचा गुच्छ आणि भेटवस्तू घेऊन त्यांच्या स्वागतासाठी जाणे बंधनकारक होते.
  • मात्र रेल्वे मंत्रालयाने ऐतिहासिक पाऊल उचलत ३६ वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा मोडीत काढली आहे.
  • व्हीआयपी संस्कृतीला वाव देणारे १९८१चे हे परिपत्रक रेल्वेने मागे घेतले आहे. या परिपत्रकात व्हीआयपी संस्कृती आणि शिष्टाचारासंबंधीचे अनेक कडक नियम होते.
  • अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीचा हा आदेश २८ सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकातून मागे घेण्यात आला आहे.
  • याशिवाय वर्षानुवर्ष रेल्वे अधिकाऱ्यांच्या घरी वेठबिगारासारखे काम करणाऱ्या कामगारांचीही अधिकाऱ्यांच्या जाचातून मुक्तता करण्यात आली आहे.
  • सुमारे ३० हजार ट्रॅकमन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी काम करतात. त्यांना पुन्हा कामावर रूजू होण्याचे आदेश रेल्वेने दिले होते.
  • तसेच घर कामाला जुंपलेल्या सर्व कामगारांना कामावर रूजू होण्यासाठी घरकामातून मुक्त करण्याचे आदेशही रेल्वे मंत्रालयाने सर्व अधिकाऱ्यांना दिले होते.
  • याशिवाय रेल्वे अधिकाऱ्यांना घरी देण्यात येत असलेल्या सुविधांमध्येही कपात करण्यात येत असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
  • रेल्वे प्रवासादरम्यान अत्यंत आलिशान सोयीसुविधा उपभोगणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक्झिक्युटिव्ह क्लासने प्रवास करण्याऐवजी स्लीपर किंवा थ्री टायरने प्रवास करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
  • केंद्रीय रेल्वेमंत्री: पियूष गोयल
  • रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष: अश्विनी लोहानी

वीज पडून मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई

  • वीज पडून मृत्यू झाल्यास त्याचा राज्य आपत्तीच्या यादीत समावेश करण्याचा आदेश महसूल खात्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने काढला आहे.
  • अशा घटनांत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
  • यापूर्वी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार, वीज पडून होणाऱ्या मृत्युचा समावेश नैसर्गिक आपत्तींच्या यादीत नव्हता. त्यामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसदारांना मदत देता येत नव्हती.
  • या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वीज पडून झालेले मृत्यू ही राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली आहे.
  • वीज पडून मृत्यू झाल्यास योग्य त्या प्राधिकाऱ्याने मृत्यूचे कारण प्रमाणित करण्याच्या अधीन राहून मरण पावलेल्यांच्या वारसांना ४ लाख रुपये मदत दिली जाणार आहे.
  • याशिवाय जखमी झालेल्यांनाही द्यावयाच्या मदतीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि पुनर्वसन विभागामार्फत केली जाणार आहे.
 मदतीची रक्कम (रुपयांत) 
  • मरण पावल्यास : ४ लाख
  • ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास : ५९ हजार १००
  • ६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास : २ लाख
  • आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी इस्पितळात : ४ हजार ३००
  • आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी इस्पितळात : १२ हजार ७००

टपाल कार्यालयांमध्येही आधार क्रमांक बंधनकारक

  • सरकारने बॅंक खात्यांपाठोपाठ आता टपाल कार्यालयांमधील बचत योजनांसाठीही ‘आधार’ क्रमांक बंधनकारक केला आहे.
  • यासोबतच, भविष्य निर्वाहनिधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) आणि किसान विकास पत्र (केव्हीसी) घेणाऱ्यांना ‘आधार’ क्रमांक देणे आवश्यक राहील.
  • या निर्णयामुळे सर्व खातेधारकांना ३१ डिसेंबरपर्यंत ‘आधार' क्रमांक टपाल कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे.
  • ज्या खातेधारकाकडे ‘आधार’ क्रमांक नसेल, त्याला ‘आधार’ क्रमांकासाठी अर्ज केल्याचा पुरावा द्यावा लागेल.
  • सरकारने आधीच बॅंक खाती, मोबाईल फोन यासारख्या सेवांसाठी ‘आधार’ क्रमांकाची सक्ती केली आहे.
  • यात बॅंक खाती आधारशी जोडण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१७ करण्यात आली आहे, तर मोबाईल क्रमांक ६ फेब्रुवारीपर्यंत आधारला जोडता येईल.
  • सरकारी योजनांचा आणि अंशदानाचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक असण्याची कालमर्यादा ३० सप्टेंबरवरून वाढवून ३१ डिसेंबर केली आहे. यामध्ये ३५ मंत्रालयांच्या १३५ योजनांचा समावेश केला जाणार आहे.

त्रावणकोर मंदिरात ब्राह्मणेतर पुरोहित

  • केरळच्या प्रख्यात त्रावणकोर देवस्थान समितीने पुजाऱ्यांच्या यादीत ६ अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांचा समावेश केला आहे.
  • मंदिरासाठी तयार करण्यात आलेल्या पुरोहितांच्या यादीत एकूण ३६ ब्राह्मणेतर असणार आहेत. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. 
  • त्रावणकोर मंदिर प्रशासनाने या आधीच ब्राम्हणांव्यतिरिक्त इतर जातींच्या व्यक्तींची पुजारी म्हणून नेमणूक केली होती.
  • पण यंदा पहिल्यांदाच अनुसूचित जाती व जमातींच्या लोकांची पुजारी म्हणून नेमणूक झाली आहे.
  • लेखी परीक्षा व मुलाखती घेऊन, राज्य लोकसेवा आयोगामार्फत ६२ पुजाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. या यादीत २६ ब्राह्मणांचा सहभाग आहे.
  • त्रावणकोर देवस्वाम बोर्ड १९४९मध्ये अस्तिस्वात आला. गेल्या अनेक दशकांपासून पुजाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा