चालू घडामोडी : २० ऑक्टोबर

सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांचा राजीनामा

  • केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी २० ऑक्टोबर रोजी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला.
  • सॉलिसीटर जनरल हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वरिष्ठ कायदा अधिकारी पद आहे. (पहिले: अॅटर्नी जनरल किंवा महाधिवक्ता )
  • काही महिन्यांपूर्वीच मुकूल रोहतगी यांनीदेखील अॅटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ रणजीतकुमार यांनी राजीनामा दिला आहे.
  • केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर तत्कालीन सॉलिसिटर जनरल मोहन पराशरन यांनी राजीनामा दिला होता.
  • त्यानंतर जून २०१४मध्ये रणजीत कुमार यांची सॉलिसिटर जनरल पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तसेच जून २०१७मध्ये त्यांना एक वर्षासाठी मुदतवाढ दिली होती. 
  • घटनात्मक कायदे, नागरी सेवा, करसंबंधीच्या कायद्यांविषयीचे जाणकार म्हणून त्यांना ओळखले जाते.
  • यापूर्वी कुमार यांनी गुजरात सरकारसाठी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणात त्यांनी गुजरात सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली होती.

गुगल भारतातील सर्वाधिक विश्वसनीय ब्रॅण्ड

  • न्यूयॉर्कमधील ‘कोन अॅण्ड वोल्फ’ या एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सर्च इंजिन गुगल हे भारतातील सर्वाधिक विश्वसनीय ब्रॅण्ड ठरले आहे.
  • गुगलनंतर भारतीयांना मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, मारुती सुझुकी आणि अॅपल या ब्रॅण्ड्सबद्दल विश्वास वाटतो.
  • जगभरातील विश्वसनीय ब्रॅण्ड्सच्या यादीत अॅमेझॉनने पहिला क्रमांक पटकावला आहे. अॅमेझॉननंतर अॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, पेपाल यांचा क्रमांक लागतो.
  • वस्तूंची खरेदी करताना भारतातील लोक ब्रॅण्ड्सच्या विश्वसनीयतेचा गांभीर्याने विचार करत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
  • भारतातील ६७ टक्के लोक वस्तू खरेदी करताना त्या वस्तूची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या विश्वासार्हतेचा विचार करतात, असे हे सर्वेक्षण सांगते.
  • जगभरातील विश्वसनीय ब्रॅण्डचा विचार केल्यास जगभरातील पहिल्या १० विश्वसनीय ब्रॅण्डपैकी ७ ब्रॅण्ड हे तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहेत.
  • जगभरातील सर्वात मोठ्या बाजारपेठांमधील १५ हजारांहून अधिक ग्राहकांशी संवाद साधून कोन अॅण्ड वोल्फने हा सर्वेक्षण अहवाल तयार केला आहे.

भारतातील प्रदूषणाची स्थिती चिंताजनक

  • लान्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकाने जगभरातील देशांमधील प्रदूषण, त्याचा लोकांवर परिणाम आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचा अभ्यास केला.
  • यामध्ये देशातील हवा (वायू) आणि पाणी किती प्रदूषित आहेत, याचा आढावा घेण्यात आला.
  • हवा आणि पाणी यामधील प्रदूषण कोणत्या देशात, किती जणांच्या जीवावर बेतले, याबद्दलची आकडेवारी नियतकालिकाने प्रसिद्ध केली आहे.
  • लान्सेटकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ४० हून अधिक प्रख्यात लेखकांचा सहभाग होता.
 या अहवालातील ठळक बाबी: 
  • भारतातील प्रदूषणाची स्थिती अतिशय चिंताजनक असून, २०१५मध्ये भारतात प्रदूषणामुळे सुमारे २५ लाख लोकांचा मृत्यू झाला.
  • २०१५मध्ये जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे ९० लाख लोकांनी प्राण गमावला. यातील २८ टक्के लोक भारतीय होते.
  • हृदयाशी संबंधित आजार, फुफ्फुसांचा कर्करोग यासारख्या आजार या मृत्यूंसाठी कारणीभूत ठरले आहेत.
  • वायू आणि जल प्रदूषणामुळे अकाली मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.
  • मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रदूषणाशी संबंधित कारणांमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
  • औद्योगिकरणात झपाट्याने वाढ होणाऱ्या भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, मादागास्कर, केनिया यासारख्या देशांमध्ये प्रदूषणाची समस्या तितक्याच झपाट्याने वाढत आहे.
  • भारतापाठोपाठ चीनमध्ये प्रदूषणामुळे मृत्यू पावलेल्या लोकांचे प्रमाण १८ लाख इतके आहे.
  • २०१५मध्ये जगभरात वायू प्रदूषणामुळे ६५ लाख, जल प्रदूषणामुळे १८ लाख तर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणामुळे ८ लाख लोकांचा मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा