विख्यात मल्याळी कवी के सच्चिदानंदन यांची केरळ सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या एळ्ळुथाचन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ५ लाख रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मल्याळी साहित्यविश्वात अत्यंत मानाचे स्थान असलेल्या सच्चिदानंदन यांचा जन्म १९४६साली त्रिचूर जिल्ह्यातील पल्लूत येथे झाला.
जीवशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर, त्यांनी इंग्रजी साहित्यात एमए व कालिकत विद्यापीठातून पीएचडीही मिळवली.
सुमारे २५ वर्षे इंग्रजीचे अध्यापन केल्यानंतर ते साहित्य अकादमीच्या इंग्रजी नियतकालिकाचे संपादन करण्यासाठी दिल्लीला गेले. नंतर ते या अकादमीचे सचिव, मुख्याधिकारी बनले.
सच्चिदानंदन हे मल्याळी साहित्यातील महत्त्वाचे आणि संवेदनशील कवी मानले जातात. सुरुवातीला केरळ पत्रिकेतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या.
सच्चिदानंदन यांचा ‘अंचुसूर्यन’ हा पहिला काव्यसंग्रह १९७१ मध्ये आला. त्या आधी ‘कुरुक्षेत्रम’ हा आधुनिक काव्याचा परामर्श घेणारा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला होता.
आत्मगीता, पीडनाकालम (काव्य), शक्तन तंपुरान, गांधी (नाटक), पाब्लो नेरुदा, अन्वेषनंगल (गद्य) यांसारखी ५०हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
सुमारे २० भाषांमधून त्यांच्या कविता अनुवादित झाल्या असून चंद्रकांत पाटील यांनी त्या मराठीतही आणल्या आहेत.
सामाजिक भान असलेले सच्चिदानंदन देशात विचारवंतांचा आवाज दाबला जात असल्याने व्यथितही झाले होते.
प्रा. एम एम कलबुर्गी यांच्या हत्येनंतर साहित्य अकादमीने मिळमिळीत भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला.
अत्यंत प्रभावी वक्ते, अनुवादक, संपादक, नाटककार असे बहुआयामी त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.
२०११च्या साहित्याच्या नोबेल पुरस्काराच्या यादीत सच्चिदानंदन यांना दहावे मानांकन मिळाले होते. केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना आतापर्यंत ७ वेळा मिळाला आहे.
इण्डो-पोलिश फ्रेंड्स मेडल, साहित्य अकादमी (दिल्ली), तसेच कुसुमाग्रज पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले आहे.
भारतीय महिला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत
भारतीय महिला हॉकी संघाने आशिया चषक स्पर्धेत गतविजेत्या जपानला ४-२ असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारताकडून उपांत्य फेरीत कझाकिस्तानविरुद्ध गोलची हॅटट्रिक करणाऱ्या ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरने २ गोल, तर लालरेमसियम व नवजोत कौरने प्रत्येकी १ गोल नोंदवला.
आशिया चषक विजेतेपदासाठी अंतिम सामन्यात भारतीय संघासमोर चीनचे आव्हान असणार आहे. भारताने याआधी साखळी लढतीत चीनला ४-१ गोलने नमवले होते.
त्यानंतर, सामन्यातील उर्वरित वेळेत भारतीय संघाने बचावावर भर दिला. भारताचा हा बचाव भेदण्यात जपान संघाला अखेरपर्यंत यश आले नाही.
जपानसाठी शिहो सुजीने १७व्या मिनिटाला आणि युई इशिबाशीने २८व्या मिनिटाला प्रत्येकी एक-एक गोल केला.
राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत भारत वरचढ
ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत चौथ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली आहे.
प्रकाश नांजप्पा, अमनप्रीतसिंग आणि जितू राय यांनी ५० मीटर पिस्तूल प्रकारात अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकत क्लीन स्वीप केले.
याआधी भारतीय पिस्तूल नेमबाजांनी १० मी. एअर पिस्तूल प्रकारातही शाहजार रिझवीने सुवर्ण, ओकांरसिंग याने रौप्य आणि जितू रायने कांस्यपदक जिंकत क्लीन स्वीप केले होते.
अनुभवी नेमबाज ४१वर्षीय प्रकाशने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.
याआधी त्याला २०१४साली झालेल्या आशियाई क्रीडा व २०१३साली झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेच्या १० मी. प्रकारात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
याशिवाय भारताच्या अंकुर मित्तलने डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले. भारताची आता या स्पर्धेत एकूण १५ पदके झाली आहेत.
मोहम्मद अली जीना यांच्या कन्येचे निधन
कायदा-ए-आझम आणि पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांच्या कन्या दिना वाडिया यांचे वयाच्या ९८व्या वर्षी न्युयॉर्क येथे निधन झाले.
मोहम्मद अली जीना आणि रतनबाई पेटिट या दाम्पत्याच्या दिना या कन्या तर, नुस्ली वाडिया यांच्या आई होत्या.
दिना यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१९ रोजी मध्यरात्री झाला होता. त्यानंतर दिना यांनी वयाच्या १७व्या वर्षी पारशी उद्योगपती नेविला वाडिया यांच्याशी लग्न केले.
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल मुशर्रफ यांच्या कार्यकाळात २००४मध्ये त्यांनी पाकिस्तानला शेवटची भेट दिली होती.
लुइस हॅमिल्टनला फॉम्युला वन जगज्जेतेपद
मर्सिडिझ संघाचा ब्रिटीश ड्रायव्हर लुइस हॅमिल्टनने चौथ्यांदा फॉम्युला वन मालिकेचे जगज्जेतेपद पटकावले आहे.
रेड बुल संघाचा मॅक्स व्हर्स्टाप्पेनने १ तास ३६ मिनिटे २६.५५० सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण करून मॅक्सिकन ग्रांप्रीचे विजेतेपद पटकावले.
परंतु मॅक्सिकन ग्रांप्रीपूर्वीच हॅमिल्टनने गुणतक्त्यातील अग्रस्थान टिकवून ठेवले होते, तर फेरारीचा सॅबेस्टियन व्हिटेल हा दुसऱ्या स्थानी होता.
व्हिटेलने मॅक्सिकन ग्रांप्री जिंकली तरी हॅमिल्टनने पहिल्या पाचमध्ये क्रमांक पटकावल्यास त्याचे जगज्जेतेपद निश्चित होणार होते.
मात्र, पहिल्याच फेरीत व्हिटेल व हॅमिल्टनची धडक झाल्यामुळे दोघांनाही शर्यतीदरम्यान पिट-स्टॉप घ्यावा लागला.
परिणामी व्हिटेलला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि नवव्या स्थानावर राहूनही हॅमिल्टनचे जगज्जेतेपद निश्चित झाले.
हॅमिल्टनने यापूर्वी २००८, २०१४ आणि २०१५साली फॉम्युला वन जगज्जेतेपदावर नाव कोरले आहे.
सर्वाधिक वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता व्हिटेलसह संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी आहे. व्हिटेलच्या नावावरही ४ जगज्जेतीपदे जमा आहेत.
सर्वाधिक वेळा फॉर्म्युला वन मालिकेचे जगज्जजेतेपद पटकावणारे रेसर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा