चालू घडामोडी : १५ जुलै

राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर ४ सदस्यांची नियुक्ती

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध क्षेत्रांमधील चार व्यक्तींना संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.
  • राज्यसभेत २५० सभासद असून, त्यातील १२ सदस्यांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून पंतप्रधानांच्या सल्ल्याने करत असतात.
  • पंतप्रधानांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी राकेश सिन्हा, राम शकल, सोनल मानसिंह, रघुनाथ महापात्रा यांची चार जणांची नियुक्ती राज्यसभेत केली आहे.
  • अभिनेत्री रेखा, अनू आगा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि के. पराशरन यांची कारकीर्द संपल्याने नव्या सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त सदस्यांचा कालावधी ६ वर्षे असेल.
  • राज्यसभेच्या १२ नियुक्त सदस्यांपैकी शरद यादव यांची एक जागा वगळता ११ जणांच्या नेमणुका मोदी सरकारने केल्या आहेत.
  • या नेमणुकानंतर राज्यसभेतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे संख्याबळ ११० झाले आहे. उपसभापतीपदाच्या विजयासाठी त्यांना एकूण १२३ मतांची गरज आहे.
 नवनियुक्त सदस्यांबद्दल 
  • राकेश सिन्हा हे मूळचे बिहारचे बेगुसराईचे असून त्यांचे लेख जनसत्ता, हिंदुस्तान, दिनमान, ऑर्गनायझर व अनेक प्रादेशिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
  • इंडिया पॉलिसी फाऊंडेशनचे मानद ते संचालक असून, दिल्ली विद्यापिठात प्राध्यापकही आहेत.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक असलेले सिन्हा टीव्ही वाहिन्यांवर मोदी सरकारचे समर्थन करताना दिसतात.
  • त्यांनी संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचे जीवनचरित्रही लिहिले असून 'राजनीतिक पत्रकारिता' या लोकप्रिय पुस्तकाचे ते लेखक आहेत.
  • सोनल मानसिंह या शास्त्रीय नृत्यअभ्यासक, नृत्यांगना असून भरतनाट्यम व ओडिसी नृत्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
  • मानसिंह यांनी मणिपुरी नृत्यापासून आपल्या शिक्षणाची नागपूरयेथून सुरुवात केली. त्यांनी संस्कृत भाषेतील प्रवीण व कोविद या पदव्या संपादन केल्या आहेत.
  • त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण, संगीत-नाटक अकादमी, कालिदास सन्मान असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
  • त्यांच्या प्रदीर्घ नृत्यसेवेबद्दल दिग्दर्शक प्रकाश झा यांनी त्यांच्यावर सोनल नावाचा माहितीपटही प्रसिद्ध केला आहे.
  • रघुनाथ महापात्रा हे ओडिशातील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आणि पाषाण शिल्पकार आहेत. हस्तकला क्षेत्र तसेच कलाशिक्षणामध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
  • त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
  • दलित समुदायातील शेतकरी नेते राम शकल हे उत्तर प्रदेशातील असून, १९९६, १९९८ आणि १९९९ असे तीनदा ते लोकसभा सदस्य होते.
 राज्यसभा 
  • राज्यसभा हे भारतीय संसदेतील ज्येष्ठ सभागृह आहे. राज्यसभेच्या सदस्यांचाकार्यकाळ ६ वर्षांचा असून एक तुतीयांश सभासदांची निवड दर दोन वर्षांनी होते.
  • राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.
  • राज्यसभा व लोकसभा यांना समान अधिकार आहेत. राज्यसभेचे सत्र कायमस्वरुपी असून ते लोकसभेप्रमाणे विलीन होत नाही.
  • भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात.
  • राज्यसभेचा सभासद होण्यास ती व्यक्ति भारतीय नागरिक असावी. वय तीस पेक्षा जास्त असावे. ही व्यक्ती मानसिक रीत्या निरोगी असून कर्जबाजारीही नसावी.
  • उपराष्ट्रपती / राज्यसभेचे सभापती : व्यंकय्या नायडू (भाजपा)
  • राज्यसभेचे नेते : अरुण जेटली (भाजपा)
  • राज्यसभेचे विरोधी पक्षनेते : गुलाम नबी आझाद (कॉंग्रेस)
  • राज्यसभेचे उपसभापती : सध्या हे पद रिक्त आहे.

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपद

  • थायलंड ओपन वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीमध्ये पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सिंधू पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती.
  • विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जपानच्या नोझोमी ओकुहाराने या सामन्यात सिंधूवर २१-१५, २१-१८ असा विजय मिळवत जेतेपद नावावर केले.
  • २०१२मध्ये सायना नेहवालने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
  • पी. व्ही. सिंधू आणि नोजोमी ओकुहारा यांच्यात आतापर्यंत ११ सामने झाले असून ५ सामन्यात सिंधूने तर ६ सामन्यात ओकुहाराने विजय मिळविला आहे.

त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. वि. ल. धारुरकर

  • उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा गावाचे पुरातत्त्व विद्येचे गाढे अभ्यासक आणि पत्रकार डॉ. वि. ल. धारुरकर यांची त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाली आहे.
  • सुरुवातीला वृत्तपत्रात मजकुराचे भाषांतर करणाऱ्या धारुरकर यांनी इतिहासाच्या पुरातत्त्व शाखेत प्रावीण्य मिळवत वेरुळ लेण्यातील जैन शिल्पांचा अभ्यास केला. याच विषयात त्यांनी पीएचडीदेखील संपादन केली.
  • ‘सिंधू संस्कृतीतील कलेचा उत्कट आविष्कार’ या विषयीही त्यांनी संशोधन केले आहे. त्यांनी पुरातत्त्व विभागातही काही काळ काम केले.
  • पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. पत्रकारितेवरील त्यांची वेगवेगळी ३६ पुस्तके प्रकाशित आहेत. ‘सावरकरांची पत्रकारिता’ हे त्यांचे पुस्तकही बरेच गाजले.
  • अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास या सर्व विषयांचा आवाका असणाऱ्या धारुरकर यांनी वेगवेगळ्या देशांत त्यांची संशोधने सादर केली आहेत.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १९८३ ते २०१६ या काळात शिकवताना त्यांनी पत्रकारितेतील अनेक विद्यार्थी घडवले.
  • याच विद्यापीठात ‘लिबरल आर्ट्स’ या विषयाचा अभ्यासक्रम आखण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
  • विचारांशी बांधिलकी जपत इतिहास आणि वर्तमानाचा दुवा म्हणून त्यांनी केलेले काम लक्षणीय मानले जाते. त्यामुळेच त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी झालेली त्यांची निवड समर्थनीय आहे.

आंध्रप्रदेशमध्ये अण्णा कॅन्टिन योजना सुरु

  • पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तमिळनाडूमधील ‘अम्मा कॅन्टीन’च्या धर्तीवर ‘अण्णा कॅन्टिन’ शहरी भागांमध्ये सुरू केली आहेत.
  • राजधानी अमरावतीमध्ये आधी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ही योजना, ११ जुलैपासून शहरी भागातही सुरू करण्यात आली.
  • चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले असून, पुढील महिन्यापर्यंत २०० अण्णा कॅन्टीन सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
  • तमिळनाडूमध्ये गरिबांना स्वस्तात न्याहारी आणि भोजन उपलब्ध व्हावे म्हणून जयललिता यांनी सर्वप्रथम ‘अम्मा कॅन्टीन’ ही योजना सुरू केली होती.
  • १ रुपयांमध्ये ईडली, ५ रुपयांमध्ये भोजन या योजनेत उपलब्ध होते. गोरगरीबांना खुश करणारी जयललिता यांची ही योजना यशस्वी झाली.
  • तमिळनाडूमध्ये पुन्हा सत्ता मिळण्यात अम्मा कॅन्टीन योजनेचा अण्णा द्रमुकला फायदा झाला होता. त्यामुळे अम्मांचा हा प्रयोग अन्य राज्यांनीही सुरू केला आहे.
  • अम्मा कॅन्टीन’च्या धर्तीवर आतापर्यंत ७ राज्यांमध्ये स्वस्त भोजन योजना सुरु करण्यात आल्या आहेत.
  • यात राजस्थान (अन्नपूर्ण रसोई योजना), दिल्ली (आम आदमी कॅन्टीन), मध्य प्रदेश (दीनदयाळ रसोई), ओडिसा (आहार योजना), कर्नाटक (इंदिरा कॅन्टीन), आंध्र प्रदेश (अण्णा कॅन्टीन) या राज्यांचा समावेश आहे.
  • स्वस्त दरात न्याहरी आणि भोजन उपलब्ध करून देण्याची योजना राबविल्याने राज्यांच्या तिजोरीवर बोजा पडतो.
  • या योजनेसाठी तमिळनाडू सरकार दरवर्षी २०० कोटींपेक्षा जास्त खर्च करते. आंध्र प्रदेशात ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा