चालू घडामोडी : २७ जुलै

डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे उद्घाटन

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारताचे लोकप्रिय माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
  • २७ जुलै रोजी अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पैकरांबु या त्यांच्या जन्मस्थानी या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
  • संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) हे स्मारक उभारले आहे. या स्मारकात कलाम यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.
  • तमिळनाडू सरकारने दिलेल्या जमिनीवर हे स्मारक १५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेवर हे स्मारक उभारले आहे.
  • अब्दुल कलाम यांनी शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ या स्मारकात ‘अग्नी’ क्षेपणास्त्र आणि अंतराळ यानाच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत.
  • यावेळी मोदींच्या हस्ते ‘कलाम संदेश वाहिनी’ बसचेही उद्घाटन करण्यात आले. या बसमध्ये कलम यांच्याशी संबंधित गोष्टींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
  • ही बस देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून प्रवास करत, १५ ऑक्टोबर म्हणजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी राष्ट्रपती भवनात पोहोचले.
  • १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. लोकांचे राष्ट्रपती अशी त्यांची ओळख होती.
  • कलाम २००२ ते २००७ या काळात भारताचे राष्ट्रपती होते. त्यांना देशाचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते.
  • २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले. त्यांचा जीवनप्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमार

  • २६ जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप घडविणारे नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
  • लालूप्रसाद यादव, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि कुटुंबियांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेत, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
  • त्यानंतर लगेच भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा-जदयू समीकरण जुळले असून, बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपाप्रणित एनडीएचे सरकार स्थापन झाले.
  • राजीनामा देऊन चोवीस तासही उलटले नाहीत, तोवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम नितीश कुमार यांनी केला आहे. नितीश कुमार यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
  • नितीश कुमार यांच्यासोबत भाजपचे बिहारमधील वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 
  • नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर रात्री उशीरा नितीशकुमार आणि सुशील मोदी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती.
  • त्यांनी भाजपा-जदयूच्या १३२ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींना दिले व त्यानंतर शपथविधी सकाळी पार पडणार असल्याचे जाहीर केले.
  • बिहारमध्ये जदयूचे ७१ आणि भाजपा व मित्रपक्षांचे ५८ आमदार असून, जदयू आणि भाजपा आघाडीचे मिळून १२९ आमदार होतात. 
  • बहुमतासाठी १२२ आमदारांची गरज असून, लालू आणि काँग्रेस यांचे मिळून केवळ १०७ आमदार होतात.
  • त्यामुळे लालूप्रसाद यांचा ८० आमदार असलेला राष्ट्रीय जनता दल बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांना सत्तास्थापनेसाठी बोलावले जाण्याची शक्यता कमी आहे.
बिहारमधील पक्षीय बलाबल
बहुमतासाठी आवश्यक जागा: १२२
पक्ष जागा
राष्ट्रीय जनता दल (राजद) ८०
जनता दल यूनायटेड (जदयू) ७१
काँग्रेस २७
भाजप (विरोधी पक्ष) ५३
सीपीआय
लोक जनशक्ती पार्टी
राष्ट्रीय लोक समता पार्टी
हिंदुस्तानी अवाम मोर्चा
अपक्ष
एकूण २४३

बैलगाडी शर्यतींना कायदेशीर मान्यता

  • महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून, यामुळे आता बैलगाडी शर्यतींना कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
  • महाराष्ट्राचे पशुसंवर्धन खाते यासंबंधी अधिसूचना काढणार असून, यापुढे अटी पाळून बैलगाडी शर्यती आयोजित करता येणार आहे.
  • यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार असून अटी लागू करुन जिल्हाधिकारी परवानगी देतील.
  • शर्यतीदरम्यान प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि प्राण्यांना यातना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल.
  • बैलागाड्यांची शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. 
 बैलगाडी शर्यतीबद्दल 
  • बैलगाडी शर्यत हा खेळ ग्रामीण भागात रुजला आहे. हा खेळ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे होतो.
  • सांगली साताऱ्यात चाकोरीतून गाड्या पळवल्या जातात. एका वेळी चार किंवा पाच गाड्या एकाच वेळी पळतात. या शर्यतीत गट, सेमी फायनल आणि फायनल अशा गाड्या पळतात.
  • खेड भागात बैलगाडी शर्यतीसाठी घाट बांधले आहेत. घाटातून एकच गाडी पळते. इथे सेकंदावर नंबर दिले जातात. खेडच्या शर्यतीत, सगळ्यात पुढे घोडे, त्यामागे एक गाडी आणि शेवटी शर्यतीची गाडी असते.
  • विदर्भात बैलगाडी शर्यतीला शंकरपट म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील काही गावात गाडीला घोडा आणि बैल जुंपून शर्यती होतात. रायगड जिल्ह्यात तर वाळूच्या रेतीत गाड्या पळवण्याची प्रथा आहे.
 पार्श्वभूमी 
  • पशुप्रेमी संघटनांच्या मागणीनंतर, तामिळनाडूमध्ये बैलांचा जलिकट्टु हा खेळ आणि महाराष्ट्रातील बैलगाड्यांच्या शर्यती यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती.
  • पशुंना या खेळांमध्ये क्रूर वागणूक दिली जाते, असा त्या संघटनांचा आक्षेप होता.
  • मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर जलिकट्टू खेळाला परवानगी देण्यासाठी तामिळनाडू विधानसभेने विधेयक मंजूर केले होते.
  • त्याच पद्धतीने महाराष्ट्र विधानसभेत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करता याव्यात, यासाठी विधानसभेत पशु क्रुरता प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मांडले होते.
  • या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यामुळे आता त्याचे कायद्यात रुपांतर झाले. त्यामुळे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमेरिकेकडून रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध

  • अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांचे हित धोक्यात आणल्याचा आणि भांडखोर कृत्ये केल्याचा आरोप करीत अमेरिकेने रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत.
  • हाऊस ऑफ रिप्रेंझेंटेटिव्हजने या निर्बंधांचे विधेयक ४१९-३ अशा मताने संमत केले असले, तरी या निर्बंधांचे स्वरूप स्पष्ट झालेले नाही. 
  • रशियावर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणे आणि युक्रेन व सीरियावर केलेले लष्करी आक्रमण याबद्दल हे निर्बंध लादले आहेत. तर इराणवर दहशतवादाला सतत पाठिंबा दिल्याबद्दल निर्बंध घातले आहेत.

जेफ बिजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

  • ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनचे फाउंडर जेफ बिजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
  • जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत २०१३ पासून प्रथम स्थानी असलेले मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांना बिजोस यांनी मागे टाकले.
  • अॅमेझॉन कंपनीच्या स्टॉक्समध्ये आलेल्या तेजीमुळे बिजोस यांनी बिल गेट्स यांना मागे टाकल्याचे ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
  • गेल्या वर्षभरात सर्वात जलदगतीने संपत्तीत वाढ होणाऱ्या अब्जाधीशांपैकी एक अशी बिजोस यांची ओळख आहे. वर्षभरात बिजोस यांची संपत्ती २४.५ अब्ज डॉलरनी (१.२५ लाख कोटी रुपये) वाढली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा