चालू घडामोडी : १५ डिसेंबर

प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

  • साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ५४वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना जाहीर झाला. ज्ञानपीठ मिळविणारे ते पहिलेच इंग्रजी साहित्यिक ठरले आहेत.
  • अमिताव घोष यांचा ११ जुलै १९५६ रोजी कोलकाता येथे जन्म झाला. दिल्लीच्या सेंट स्टीफन आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांमधून घोष यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
  • यानंतर त्यांनी काही काळ इंग्रजी वर्तमानपत्रात पत्रकारिताही केली. अमिताव घोष यांची इंग्रजी साहित्यातील नामवंत लेखकांमध्ये गणना होते.
  • ‘द सर्कल ऑफ रीजन’ ही त्यांची पहिली कांदबरी होती. या कादंबरीने अमिताभ घोष यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली.
  • याआधी घोष यांच्या ‘शॅडो लाइन्स’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
  • त्यानंतर साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.
  • दी कलकत्ता क्रोमोसोम, दी ग्लास पॅलेस, दी हंगरी टाइड, रिव्हर ऑफ स्मोक, फ्लड ऑफ फायर या घोष यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत.
  • २००९साली रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरचे फेलो म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २०१५मध्ये त्यांना फोर्ड फाउंडेशन आर्ट ऑफ चेंज फेलो म्हणून नियुक्त करण्यात आले.
अमितव घोष यांच्या रचना
  • द सर्कल ऑफ रीजन (१९८६), शॅडो लाइन्स (१९८८), द कलकत्ता क्रोमोसम (१९९५), द ग्लास पॅलेस (२०००), द हंगरी टाइड (२००४), सी ऑफ पॉपीज (२००८), रिव्हर ऑफ स्मोक (२०११), फ्लड ऑफ फायर (२०१५). अँटीक लँड (१९९२), डान्सिंग इन कंबोडिया अँड अॅट लार्ज इन बर्मा (१९९८), काउंटडाउन (१९९९), द इमाम अँड द इंडियन (२००२), द ग्रेट डेरेंजमेंट: क्लाइमेट चेंज अँड द अन्थिंकेबल (२०१६).
ज्ञानपीठ पुरस्कार
  • ज्ञानपीठ पुरस्कार भारत सरकारतर्फे साहित्याच्या क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार १९६१ साली स्थापन करण्यात आला.
  • या पुरस्काराद्वारे, भारतीय संविधानात समाविष्ट २२ भारतीय भाषांमधील लेखकांचा सन्मान केला जातो.
  • या पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि सरस्वती देवीची कांस्य प्रतिमा प्रदान करण्यात येते.
  • पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम लेखक जी. एस. कुरूप यांना प्रदान करण्यात आला होता.
  • आतापर्यंत हिंदी आणि कन्नड भाषेतील साहित्यिकांना सर्वाधिक वेळा म्हणजेच ६ वेळा हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सर्वात मोठ्या शस्त्र निर्मात्या कंपन्यामध्ये ४ भारतीय कंपन्या

  • स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (SIPRI) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगातील १०० सर्वात मोठ्या शस्त्र निर्मात्या कंपन्यामध्ये ४ भारतीय सरकारी कंपन्यांचा समावेश आहे.
  • यामध्ये इंडियन आर्डिनंस फॅक्ट्रीज (३७व्या स्थानी), हिंदुस्तान ॲरोनॉटिक्स (३८व्या स्थानी), भारत इलेक्ट्रॉनिक्स (६४वे स्थान), भारत डायनामिक्स (९४व्या स्थानी) या भारतीय कंपन्यांचा समावेश आहे.
  • जगातील १०० सर्वात मोठ्या शस्त्र निर्मात्या कंपन्यामध्ये ४ भारतीय कंपन्याचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ४ कंपन्यांनी २०१७मध्ये ७.५२ अब्ज डॉलर्सची शस्त्रे विकली आहेत.
शस्त्र विक्रीत भारताचा वाटा
  • जागतिक शस्त्र विक्रीत भारताचा वाटा सध्या २ टक्क्यांपेक्षा कमी आहे. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारत अद्यापही एक मोठा भागधारक नाही.
  • सरकारने भारताला संरक्षण निर्मितीचे केंद्र बनविण्यासाठी अनेक प्रयत्न केले, यासाठी अनेक धोरणेदेखील तयार केली गेली. तसेच खाजगी क्षेत्रालाही प्रोत्साहित केले गेले. परंतु अजूनही या धोरणांची पूर्णपणे अंमलबजावणी होणे बाकी आहे.
शस्त्र निर्मितीत जगाचा वाटा
  • जगातील शस्त्र निर्मिती बाजारपेठेत सध्या अमेरिकेचे प्रभुत्व आहे. अमेरिकेचा यात सुमारे ५७ टक्के वाटा आहे.
  • अमेरिकेनंतर रशियाचा वाटा ९.५ टक्के, युनायटेड किंगडमचा वाटा ९ टक्के आणि फ्रान्सचा ५.३ टक्के आहे.
  • लॉकहीड मार्टिन ही जगातील सर्वात मोठी शस्त्र निर्माता कंपनी आहे. ती ४४.९ अब्ज डॉलर्सची शस्त्रविक्री करते. यानंतर बोईंग ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI)
  • ही स्वीडनमध्ये स्थित एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. तिची स्थापना ६ मे १९६६ रोजी करण्यात आली होती.
  • ही संस्था संघर्ष, शस्त्रे, शस्त्र नियंत्रण आणि निरस्त्रीकरण या विषयावर संशोधन करण्यासाठी समर्पित आहे.
  • SIPRI धोरण निर्माते, संशोधक, समाजमाध्यमे आणि सामान्य जनतेला माहिती, माहितीचे विश्लेषण उपलब्ध करून करते.

भारत सरकारचा एडीबीसोबत आसामसाठी ऋण करार

  • भारत सरकारने आशियाई विकास बँके (एडीबी)सोबत आसामसाठी ६० दशलक्ष डॉलरच्या ऋण करारावर स्वाक्षरी केली आहे. या कर्जाचा कालावधी २० वर्षे आणि सवलत अवधी (ग्रेस पिरीयड) ५ वर्षे आहे.
  • आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीसह, तिच्या पुरापासून निर्माण होणाऱ्या धोक्याच्या व्यवस्थापन आणि पुनर्निर्माण इत्यादीसाठी या रकमेचा वापर केला जाईल.
  • आसाममधील पूर व नदी किनाऱ्याच्या क्षरणाच्या जोखीम व्यवस्थापन प्रणालीला प्रभावशाली आणि विश्वासार्ह बनविणे, हा त्यामागील उद्देश आहे.
  • एडीबीने २०१०मध्ये आसाम एकीकृत पूर आणि नदीक्षरण जोखीम गुंतवणूक कार्यक्रमासाठी २ हप्त्यांमध्ये १२० दशलक्ष डॉलर्सच्या कर्जाला मंजुरी दिली होती.
  • या कार्यक्रमाच्या प्रकल्प-२मध्ये ३ उप-प्रकल्प पलास्बरी गुमी, काझीरंगा आणि दिब्रुगढ येथे पुरापासून संरक्षणासाठी बांध घातले जातील.
  • या प्रकल्पाची अंमलबजावणी आसाम पूर व नदी क्षरण व्यवस्थापन संस्था आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यामार्फत केली जात आहे.
  • या प्रकल्पाअंतर्गत, आपत्तीच्या पूर्वानुमानासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रणाली बळकट करण्यावर भर दिला जात आहे.
ब्रम्हपुत्रा नदी
  • लांबी: २,९०० किमी (१,८०० मैल)
  • सरासरी प्रवाह: १९,३०० घन मी/से (६,८०,००० घन फूट/से)
  • ब्रह्मपुत्रा ही आशियामधील एक प्रमुख नदी आहे. ब्रह्मपुत्रा हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये मानसरोवर येथे त्सांगपो किंवा यार्लुंग त्सांग्पो या नावाने उगम पावते.
  • ही नदी चीन, भारत आणि बांगलादेश या देशातून वाहते. चीनमध्ये या नदीला यार्लुंग त्सांग्पो, भारतामध्ये ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखले जाते.
  • बांगलादेशात ब्रह्मपुत्रेला प्रथम पद्मा ही गंगेपासून फुटलेली नदी व नंतर मेघना या दोन प्रमुख नद्या मिळतात.
  • बांगलादेशमध्ये पद्मा नदी येऊन मिळाल्यानंतर ब्रम्हपुत्रा नदीला जमुना या नावाने ओळखले जाते. तर बंगालच्या उपसागराला मिळताना या नदीला मेघना म्हणून ओळखले जाते.

विमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार

  • नीती आयोग १६ डिसेंबर रोजी ‘विमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कारां’च्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे.
  • या कार्यक्रमात नीती आयोग महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मच्या सुधारित पोर्टलचे अनावरण देखील करणार आहे.
  • या कार्यक्रमादरम्यान, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू १५ महिलांना पुरस्कार वितरीत करतील. या कार्यक्रमाची या वर्षाची थीम ‘महिला आणि उद्योजकता’ आहे.
  • विमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार २०१६मध्ये सुरू करण्यात आले होते. इतरांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेल्या स्त्रियांचा सन्मान करणे, हा या पुरस्कारांचा उद्देश आहे.
नीती आयोग
  • NITI: National Institution for Transforming India
  • ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत.
  • माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला योजना आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नेमण्यात आला. ०१ जानेवारी २०१५ रोजी भारत सरकारने नीती आयोगाची घोषणा केली.
नीती आयोगाचे सध्याचे सदस्य
  • अध्यक्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • उपाध्यक्ष: डॉ. राजीव कुमार
  • मुख्य कार्यकारी अधिकारी: श्री अमिताभ कांत
  • पदसिद्ध सदस्य: राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुरेश प्रभू, राधा मोहन सिंग
  • विशेष आमंत्रित सदस्य: नितीन गडकरी,थावरचंद गेहलोत, स्मृती इराणी
  • पूर्णवेळ सदस्य: विवेक देबरॉय (अर्थतज्ञ), व्ही. के. सारस्वत, रमेश चंद (कृषीतज्ञ)
  • नियामक परिषद: सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे गव्हर्नर.

कैगा अणुउर्जा केंद्राचा निरंतर कार्य करण्याचा जागतिक विक्रम

  • १० डिसेंबर २०१८ रोजी कैगा अणुउर्जा केंद्राने निरंतर ९४१ दिवस कार्य करण्याचा जागतिक विक्रम केला.
  • यापूर्वी निरंतर ९४० दिवस कार्यरत राहण्याचा जागतिक विक्रम युनायटेड किंग्डममधील हेशेम अणुउर्जा केंद्राच्या युनिट-२च्या नावे होता.
  • कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील काली नदीजवळील कैगा अणुउर्जा केंद्राचे युनिट-१ १३ मे २०१६पासून निरंतर वीजनिर्मिती करत आहे.
  • हे प्रेशरराइज्ड हेवी-वॉटर रिॲक्टर (पीएचडब्ल्यूआर) स्वदेशी असून, ते युरेनियमचा वापर करते. या अणुऊर्जा केंद्राने आतापर्यंत ५०० दशलक्ष युनिट्स वीजनिर्मिती केली आहे.
  • या अणुऊर्जा केंद्रावरून भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे डिझाइन, बांधकाम, सुरक्षा आणि गुणवत्ता यांची प्रचीती येते.
कैगा अणुऊर्जा केंद्र
  • हा कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील काली नदीजवळ कैगा येथील अणुऊर्जा प्रकल्प मार्च २०००मध्ये कार्यन्वित करण्यात आले.
  • या प्रकल्पात २२० मेगावॉट क्षमतेच्या ४ अणुभट्ट्या आहेत. भारतीय अणुऊर्जा महामंडळाद्वारे याचे बांधकाम, डिझाइन, संचालन आणि देखभालीचे कार्य केले जाते.

अकेडमिक लोमोनोसोव्ह: जगातील पहिला तरंगता अणुऊर्जा प्रकल्प

  • ११ डिसेंबर २०१८ रोजी कार्यान्वित झालेला रशियाचा अकेडमिक लोमोनोसोव्ह अणुउर्जा प्रकल्प, हा जगातील पहिला तरंगता (फ्लोटिंग) अणुऊर्जा प्रकल्प ठरला आहे.
  • रशियन अणुउर्जा एजन्सी रोसातोमच्या घोषणेनुसार, या अणुभट्टीने आपल्या १० टक्के क्षमतेचा वापर सुरू केला आहे.
  • रशियन सरकारची अणुऊर्जा एजन्सी रोसातोमने अकेडमिक लोमोनोसोव्हची निर्मिती केली आहे. त्याची लांबी १४४ मीटर आणि रुंदी ३० मीटर आहे.
  • त्याची विस्थापन क्षमता २१,५०० टन आहे आणि यामध्ये ६९ लोक कार्य करू शकतात.
  • ऊर्जा निर्मितीसाठी यामध्ये २ रूपांतरित केएलटी-४० नेवल प्रोपल्शन अणुभट्ट्यांचा वापर केला गेला आहे. याद्वारे ७० मेगावॅट विद्युत आणि ३०० मेगावॉट उष्णता उर्जा उत्पन्न केली जाऊ शकते.
  • या प्रकल्पाला रशियन शिक्षणतज्ञ मिखाइल लोमोनोसोव्ह यांचे नाव देण्यात आले आहे.
  • यामध्ये अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था वापरण्यात आली असून, याला जगातील सुरक्षित अणुसयंत्र मानले जाते.
  • याचा वापर आर्क्टिक प्रदेशात तेल उत्पादन करणाऱ्या विशाल उपकरणांना उर्जा पुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे.

भारताच्या परकीय चलन साठ्यात १६.६ दशलक्ष डॉलर्सची वाढ

  • ७ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा १६.६ दशलक्ष डॉलर्सने वाढून ३९३.७३४ अब्ज डॉलर्स झाला आहे. यापूर्वी तो ३९३.७१८ अब्ज डॉलर्स होता.
  • परकीय चलन साठ्याला याला फॉरेक्स रिझर्व्ह असेही संबोधले जाते. देशाच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक स्थितीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.
डिसेंबर २०१८मधील परकीय चलन साठ्याची स्थिती
  • परकीय चलनातील साठा: ३६८.४९० अब्ज डॉलर्स
  • सोन्याच्या स्वरूपातील साठा: २१.१५० अब्ज डॉलर्स
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत एसडीआर: १.४५७ अब्ज डॉलर्स
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत राखीव निधी: २.६३० अब्ज डॉलर्स

आंतरराष्ट्रीय केरळ चित्रपटाच्या महोत्सव

  • केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी २३व्या आंतरराष्ट्रीय केरळ चित्रपटाच्या महोत्सवादरम्यान पुरस्कार जाहीर केले.
  • मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना केल्यानंतरही केरळमध्ये या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांची यादी
  • द गोल्डन क्रो फजेंट अवॉर्ड (सुवर्ण चकोरम) : ईरानी चित्रपट ‘द डार्क रूम’
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी सिल्व्हर क्रो फजेंट अवॉर्ड (रजत चकोरम) : लीजो जोस पेलिसरी
  • सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑडियंस पोल पुरस्कार : मल्याळी चित्रपट ई.मा.यू.
  • पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी रजत चकोरम : अनामिका हक्सर यांना ‘टेकिंग द हॉर्स टू ईट जलेबीज’
  • सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार : ‘मेट्रो के वार्ता’चे अरविंद
  • विशेष जूरी उल्लेख पुरस्कार : द सायलेन्स
  • के. आर. मोहनन एन्डोमेंट पुरस्कार : बंगाली चित्रपट ‘मनोहर अँड आय’
  • छायाचित्रकार विशेष जूरी उल्लेख : सौम्यानंद साही
आंतरराष्ट्रीय केरळ चित्रपट महोत्सव
  • हा महोत्सवाची स्थापना १९९६मध्ये झाली होती. याचे आयोजन केरळ राज्य फिल्म अकादमीतर्फे दरवर्षी तिरुवनंतपुरममध्ये केले जाते.
  • या महोत्सवात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रीमियर केले जाते. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेमधील चित्रपट यामध्ये भाग घेतात.

कोची-मुजिरिस द्विवार्षिक उत्सव

  • केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केरळमधील कोची-मुजिरिस द्विवार्षिक उत्सवाचे १२ डिसेंबर रोजी उद्घाटन केले.
  • या उत्सवात सहभागींपैकी अर्ध्याहून अधिक सहभागी महिला आहेत. २९ मार्च २०१९पर्यंत चालणाऱ्या या १०८ दिवसांच्या कार्यक्रमात ९४ कलाकार शहरातील १० ठिकाणी आपल्या कलेचे प्रदर्शन करतील.
  • या उत्सवाची यंदाची थीम ‘Possibilities for a Non-Alienated Life’ ही आहे.
कोची-मुजिरिस द्विवार्षिक उत्सव
  • भारतात आयोजित केले जाणारे हे सर्वात मोठे समकालीन कला प्रदर्शन आहे. याचे आयोजन केरळच्या कोची शहरात केले जाते.
  • भारत सरकार आणि कोची बाइनाले फाऊंडेशनद्वारे हा उत्सव आयोजित केला जाते. पहिल्यांदा डिसेंबर २०१२ या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
  • जगभरातील कलाकारांना समकालीन कलांचे प्रदर्शन करण्यास संधी प्रदान करणे, हा या उत्सवाच्या आयोजानामागील मुख्य हेतू आहे.
  • कोची बाइनाले फाऊंडेशन ही एक गैर-लाभकारी समाजकल्याण ट्रस्ट आहे. याची स्थापना २०१०मध्ये झाली. ही संस्था वारसा संपत्तीचे संवर्धन आणि पारंपारिक कलांचे पुनरुज्जीवन यासाठी कार्य करते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा