चालू घडामोडी : १ ऑगस्ट

भ्रष्टाचार प्रतिबंध (सुधारणा) कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी

  • भ्रष्टाचार प्रतिबंध (सुधारणा) कायदा, १९८८ला या नव्या लाचविरोधी कायद्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली असून, या कायद्याची अंमलबजावणी २६ जुलै २०१८पासून सुरु झाली आहे.
  • सुधारित कायद्यानुसार भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये निर्णय देण्यासाठी २ वर्षांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
  • तसेच नव्या लाचविरोधी कायद्यानुसार लाच देणाऱ्या व्यक्तीला आता जास्तीत जास्त ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
  • याशिवाय लाच घेणाऱ्यांनादेखील किमान ३ ते कमाल ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.
  • बळजबरीने लाच देण्यास भाग पडलेल्या व्यक्तीला या कायद्याने संरक्षण दिले असून, अशा मजबूर व्यक्तीला या प्रकाराची माहिती ७ दिवसांच्या आत तपास यंत्रणांना द्यावी लागणार आहे.
  • या कायद्यानुसार सरकारी कर्मचारी आणि अधिकारी या व्यतिरिक्त लोक प्रतिनिधी, नोकरशहा आणि बँकर यांनाही खटला दाखल होण्यापासूनचे संरक्षण कवच मिळाले आहे.
  • त्यानुसार सीबीआयसारख्या संस्थांना संबंधितांविरोधात चौकशी सुरू करण्यापूर्वी कार्यक्षम संस्थेची परवानगी घ्यावी लागणार आहे.
  • कथित गुन्हा कार्यालयीन कामकाज किंवा कर्तव्ये पार पाडत असताना केलेल्या कृतीशी संबंधित असेल्यास, पोलिस अधिकाऱ्यांना संबंधित सरकारी कर्मचाऱ्याची चौकशी पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय करता येणार नाही.
  • मात्र सरकारी कर्मचारी स्वत:साठी किंवा इतरांसाठी लाच घेताना आढळल्यास त्याला घटनास्थळी अटक करताना अशा परवानगीची गरज असणार नाही.
  • या कायद्यामुळे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनाही चौकशीपासूनचे संरक्षण कवच मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ

  • रिझर्व्ह बँकेने १ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या पतधोरणात वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये पाव टक्क्याने वाढकरण्यात आली आहे.
  • रेपोरेटमध्ये वाढ झाल्याने कर्जदारांना याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. गृह, वाहन तसेच वैयक्तिक कर्ज महागण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ होऊन तो ६.५० टक्के इतका झाला आहे. तर रिव्हर्स रेपो रेटही २५ टक्क्यांची वाढवून ६.२५ टक्के इतका करण्यात आला आहे.
  • आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या ६ सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
  • आंतरराष्ट्रीय व्यापारात सध्या आव्हानात्मक स्थिती असून भारताच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची भीती पतधोरणाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे.
  • पतधोरणात होणारी वाढ ही महागाईची सूचक असून महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाढ केली जात असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
  • मात्र भारताची अर्थव्यवस्था या आर्थिक वर्षात आधी अंदाज केलेल्या ७.४ टक्के दराने वाढेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
  • २०१८-१९मधील हे तिसरे द्विमासिक पतधोरण आहे. यापूर्वीच्या ६ जूनला जाहीर केलेल्या पतधोरणात आरबीआयने रेपो रेटमध्ये पाव टक्का वाढ करत ६.२५ टक्के केला होता.
 रेपो रेट 
  • बँकांची मोठ्या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय आरबीआय देशातल्या बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो, त्याला रेपो रेट म्हणतात.
  • आरबीआयकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. परंतु, हे दर वाढले तर बँकांचं कर्जही महाग होते आणि त्याचा फटका ग्राहकांना बसतो.
 रिव्हर्स रेपो रेट 
  • बँकांकडे शिल्लक राहिलेली रक्कम बँका अल्प मुदतीसाठी आरबीआयकडे जमा करतात. त्या रकमेवर आरबीआय ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
  • रिव्हर्स रेपो रेट बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचे काम करतो.
  • जेव्हा बाजारात जास्त तरलता असते तेव्हा आरबीआय रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वतःकडील पैसे आरबीआयकडे जमा करतात. परिणामी बाजारातील तरलता कमी होते.

भारतातील बेरोजगारीचा दर ३.५ टक्के

  • जागतिक कामगार संघटनेने जागतिक पातळीवर २०१८मध्ये रोजगार व सामाजिक स्थिती कशी असेल याचा आढावा घेणारा ‘द वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अॅण्ड सोशल आउटलूक ट्रेंड्स २०१८’ हा अहवाल प्रसिध्द केला.
  • या अहवालानुसार, भारतातील बेरोजगारीचा दर यावर्षी ३.५ टक्क्यांवर स्थिर राहणार असून, चीनमधली बेरोजगारी ४.७ टक्क्यांवरून वाढून ४.८ टक्के होईल.
  • भारतातली बेरोजगारी कमी असली तरी एकूण रोजगारापैकी ७७ टक्के कर्मचाऱ्यांचा रोजगार अशाश्वत आहे. चीनमध्ये हे प्रमाण अवघे ३३ टक्के आहे.
  • आयसीटी किंवा इन्फर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये भारतात चांगलीच रोजगारवाढ झाली असून सेवा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे.
  • परंतु सेवा क्षेत्रातल्या रोजगारामध्ये अशाश्वतता अधिक असून कामाचा व एकंदर सोयीसुविधांचा दर्जाही खालच्या पातळीवर असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
  • संघटित क्षेत्रापेक्षा असंघटित क्षेत्रामधील रोजगारामध्ये सोयीसुविधा व शाश्वती कमी असून भारत, बांग्लादेश, कंबोडिया व नेपाळमधले ९० टक्के कर्मचारी यामध्ये मोडतात.
  • या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना रोजगाराची हमी, किमान सोयीसुविधा, सामाजिक सुरक्षा आदी बाबींना वंचित रहावे लागत आहे.
  • त्यामुळे रोजगाराचे प्रमाण जास्त असले तरी नोकरीची अशाश्वतता आणि सोयीसुविधांची वानवा याबाबतीत भारतातला ७७ टक्के कर्मचारी वर्ग भरडला जात असून २०१९पर्यंत ही परिस्थिती अशीच राहील असा अंदाज आहे.
  • अस्थिर व अशाश्वत असे रोजगार जगभरात १.४ अब्ज असून यापैकी ३९.४ कोटी रोजगार एकट्या भारतात आहे.
  • या रोजगारामध्ये स्वयंरोजगार, कौटुंबिक व्यवसायातला रोजगार, कृषी, बांधकाम, होलसेल आणि रिटेल व्यापार क्षेत्रातील रोजगार आदींचा समावेश आहे.
  • आशिया व पॅसिफिक क्षेत्रात आर्थिक वाढ जोमाने होणार असून अर्थव्यवस्था ५.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
  • भारतीय अर्थव्यवस्था ही दक्षिण आशियातील आर्थिक व्यवहारांना चालना देत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
  • २०१८मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा ७.४ टक्क्यांनी विकास होईल असा अंदाज आहे. २०१७मध्ये भारताचा विकासदर ६.७ टक्के इतका होता.

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेसेवा लवकरच सुरु होणार

  • कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी येथून कोल्हापूरला जाण्यासाठी रेल्वेसेवा सुरू होणार असून, बऱ्याच वर्षांपासून नियोजित असलेल्या या रेल्वे मार्गाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.
  • केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आयोजित कोकण रेल्वे आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • वैभववाडी ते कोल्हापूर या रेल्वे मार्गाची एकूण लांबी १०३ किमी असेल. तसेच या मार्गावर एकूण १० स्थानके असतील.
  • सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जाणारा हा मार्ग प्रत्यक्षात उतरल्यावर कोकणातून कोल्हापूरला जाणे अधिकच सोपे होणार आहे.
  • कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी ५० टक्के खर्च भारतीय रेल्वे करणार असून उर्वरित ५० टक्के खर्च महाराष्ट्र राज्य शासन करणार आहे.
  • हा मार्ग कोकण रेल्वेबरोबरच महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ठरेल.


१ एक ऑगस्ट : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा