चालू घडामोडी : २६ ऑगस्ट

आशियाई क्रीडा स्पर्धा: आठवा दिवस

  • इक्वेस्ट्रीयन (घोडेस्वारी): भारताला ३६ वर्षांनंतर वैयक्तिक रौप्यपदक
  • भारताने ‘इक्वेस्ट्रीयन’ या घोडेस्वारीच्या प्रकारात २ रौप्यपदके पटकावली. यापैकी एक पदक हे वैयक्तिक स्वरूपाचे तर एक सांघिक प्रकारातील ठरले.
  • भारताला ३६ वर्षांनंतर या क्रीडाप्रकारात वैयक्तिक पदक मिळाले. यापूर्वी रघुवीर सिंग यांनी १९८२ साली नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत वैयक्तिक गटातील दोन सुवर्णपदके जिंकली होती.
  • वैयक्तिक प्रकारात घोडेस्वार फौवाद मिर्झा याने हे यश संपादन केले. त्याने आणि त्याचा घोडा सिगनूर मेडिकोट याने २२.७० या वेळेत शर्यत पूर्ण केली.
  • या स्पर्धेत जपानच्या ओइवा योशीआकी याला पहिला क्रमांक मिळाला. तो आणि त्याचा घोडा बार्ट एल ज्रा यांनी ही शर्यत २२.६० एवढ्या वेळेत पूर्ण केली.
  • याशिवाय, भारताने सांघिक प्रकारातही इक्वेस्ट्रीयन जम्पिंगमध्येही रौप्यपदक मिळवले. जपान व थायलंड यांनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकले.
  • भारतीय संघात राकेश कुमार, आशिष मलिक, जितेंदर सिंग व फौवाद मिर्झायांचा समावेश होता.
  • ॲथलेटिक्स: हिमा, द्युति आणि अनासला रौप्यपदक
  • ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत महिलांच्या गटात भारताच्या हिमा दासने रौप्यपदकाची कमाई केली. तिने ५०.७९ सेकंदात शर्यत पार करत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.
  • ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासनेही रौप्यपदकाची कमाई केली. अनासने ४५.४९ सेकंदात शर्यत पार करत राष्ट्रीय विक्रम रचला.
  • धावपटू द्युति चंदनेही १०० मीटर शर्यतीमध्ये रौप्यपदकावर नाव कोरले. १०० मी. अंतर तिने ११.३२ सेकंदात पार केले. तिचे सुवर्णपदक अवघ्या २ सेकंदाच्या फरकाने हुकले.
  • महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २० वर्षांनंतर भारताने प्रथमच पदक मिळवले. भारताच्या रचिता मिस्रीने या प्रकारात शेवटचे १९९८मध्ये मिळवले होते.
  • भारताच्या लक्ष्मणन गोविंदनने १० हजार मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. पण पाऊल बाहेर पडल्यामुळे त्याला हे कांस्यपदक गमवावे लागले.
  • ब्रिज: पुरुष आणि मिश्र सांघिकमध्ये भारताला कांस्यपदक
  • ब्रिज या खेळाचा आशियाई स्पर्धांमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पुरुष आणि मिश्र सांघिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळाले.
  • उपांत्य फेरीत भारताच्या पुरुष संघाला सिंगापूरने पराभूत केले. तर मिश्रमध्ये भारताला थायलंडकडून पराभव पत्करावा लागला.
  • पुरुष संघात जे. शिवदासानी, राजेश्वर तिवारी, अजय खरे, राजू तोलानी, डी. मजूमदार आणि सुमीत मुखर्जीचा समावेश आहे.
  • मिश्र संघात किरण नादार, हेमा देओरा, हिमानी खंडेलवाल, बी. सत्यनारायणा, गोपीनाथ मन्ना आणि राजीव खंडेलवालचा समावेश आहे.

केरळमधील पूरग्रस्तांना अॅपलकडून सहाय्य

  • अॅपल या अमेरिकन कंपनीने केरळमधील पूरग्रस्तांना ७ कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.
  • घरे, शाळा यांच्या पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अॅपलकडून हा निधी देण्यात आला.
  • याशिवाय अॅपलने आपले होम पेज, अॅपस्टोअर आणि आयट्यून स्टोअर याठिकाणी ग्राहकांना केरळवासीयांना मदत करण्याचे आवाहनही केले आहे.
  • याबरोबरच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक असलेल्या बिल गेट्स यांच्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे केरळमधील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी ४ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
  • मुसळधार पावसाने केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले असून, केरळमधील पूरप्रकोपात आतापर्यंत ३५०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ लाख नागरिक बेघर झाले आहेत.
  • केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळच्या पूरग्रस्तांना जगभरातील लोकांनी मदतीचा हात दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा