चालू घडामोडी : २२ ऑगस्ट

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ – चौथा दिवस

  • नेमबाजी: महाराष्ट्राच्या राही सरनोबतला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राही सरनोबतने उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करत २५ मी. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
  • आशियाई स्पर्धेतील तिचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यापूर्वी २०१४च्या आशियाई स्पर्धेत तिने कांस्यपदक कमावले होते.
  • आशियाई स्पर्धेत असा पराक्रम करणारी राही ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.
  • अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या नफास्वान यांगपायबून यांचे गुण समान असल्यामुळे शूटऑफवर निर्णय घेण्यात आला.
  • या शूटऑफमध्ये राहीने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदक नाव कोरले तर कोरियाची मिनजुंग किम हि कांस्यपदकाची मानकरी ठरली.
  • वुशू: भारतला चार कांस्यपदके
  • संतोषकुमारने पुरुषांच्या वुशू सँडा ५६ किलो गटात कांस्यपदक पटकावले.
  • रोशिबिना देवी हिने महिलांच्या वुशू सँडा ६० किलो गटात कांस्यपदक पटकावले.
  • सुर्या भानूप्रताप सिंहने पुरुषांच्या वुशू सँडा ६० किलो गटात कांस्यपदक पटकावले.
  • नरेंदर ग्रेवालने पुरुषांच्या वुशू सँडा ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले.
  • या आधी भारताला २००६मध्ये १ कांस्य, २०१०मध्ये १ कांस्य व १ रौप्यपदक व २०१४च्या इंचिऑन स्पर्धेमध्ये दोन कांस्यपदक मिळाले होते.
  • वुशू चिनी मार्शल आर्ट्सचा एक प्रकार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन

  • राज्य सरकार पुरस्कृत ‘सेंद्रीय शेती विषमुक्त शेती’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन स्थापन्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
  • राज्यातील शेती क्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर तसेच किटकनाशकांचा अति आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे.
  • या मिशनच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसाराबरोबरच त्यातील शेती मालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होणार आहे.
  • पहिल्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यांतही ही योजना राबविण्यात येईल.
  • यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सेंद्रिय शेती - विषमुक्त शेती या योजनेसाठी १०० कोटींची तरतूद केली होती.
  • त्यानुसार केंद्र शासनाच्या याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात सेंद्रिय शेतीसाठी राज्य पुरस्कृत स्वतंत्र योजना प्रस्तावित करण्यात येत आहे.
 या मिशनची उद्दिष्टये 
  • सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे.
  • पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे.
  • ही प्रणाली सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने तयार करून इतरत्र प्रसारित करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय निविष्ठा योग्य पद्धतीने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करणे.
  • सेंद्रिय शेती मालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे.
  • सेंद्रिय शेती मालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे.
  • सहभाग हमी पद्धतीने सेंद्रिय शेतीचे गट प्रमाणीकरण करून घेणे.
  • स्थानिक ग्राहकांना विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध करून देणे.
 सेंद्रिय शेतीची गरज का? 
  • शेतीमध्ये रासायनिक खतांचा असंतुलित वापर वाढल्याने जमिनीतील जैविक घटकांचा विनाश होऊन त्या मृतवत होत चालल्या आहेत.
  • तसेच तणनाशके-किटकनाशकांच्या अतिवापरामुळेही जमिनीची सुपिकता कमी झाली आहे.
  • परिणामी उत्पादित शेतीमालात आरोग्यास अपायकारक अशा रासायनिक घटकांचे प्रमाण वाढून त्याचा मानवी आरोग्यावर अतिशय विपरित परिणाम होत आहे.
  • या पार्श्वभूमीवर नागरिकांचा जैविक शेतीतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांकडे वाढता कल आहे. परदेशातूनही अशाच फळपिकांना मागणी आहे. त्यातून सेंद्रिय (जैविक) शेतीची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे.

परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

  • परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी खुल्या प्रवर्गाबरोबरच विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
  • राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये म्हणून त्यांना राज्य सरकार शिष्यवृत्ती देणार आहे.
  • राज्य सरकारने यापूर्वी अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू केली आहे.
  • त्याच धर्तीवर आता खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षांपासून ही योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेसाठी अंदाजे २० कोटी रुपये खर्च येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत दरवर्षी २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यापैकी १० विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील असतील, तर उर्वरित १० विद्यार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाचे असतील. मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.
  • विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएचडी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
  • शिष्यवृत्तीचा कमाल कालावधी पीएचडीसाठी चार वर्षे, पदव्युत्तर पदवीसाठी दोन वर्षे आणि पदव्युत्तर पदविकेसाठी एक वर्ष इतका आहे.
  • खुल्या प्रवर्गातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे आणि त्यांच्या पालकांचे सर्व प्रकारचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशी अट घालण्यात आली आहे.
  • इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उन्नत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी परदेशातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा फायदा राज्य सरकारला व्हावा या उद्देशाने शासन निर्णयामध्ये तशी तरतूद करण्यात येणार आहे.

निधन: काँग्रेस नेते गुरुदास कामत

  • काँग्रेसमधील अभ्यासू नेते गुरुदास कामत यांचे २२ ऑगस्ट रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.
  • काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडत संघटनकौशल्य सिद्ध केले होते. राज्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क असायचा.
  • गुरुदास कामत यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील अंकोला येथे झाला. त्यांनी मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली.
  • त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केले असून, ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे.
  • २००३-२००८ या काळात ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. २०१३मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिव पदावर त्यांची नियुक्ती झाली.
  • गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली आणि दीव व दमण या राज्यांचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले.
  • कामत यांनी १९७२मध्ये विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. १९७६मध्ये त्यांनी एनएसयूआयचे (कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा) अध्यक्षपद भूषवले.
  • २००९ ते २०११ या कालखंडातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहमंत्रालयाचे राज्यमंत्रीपद सांभाळले. त्यांच्याकडे माहिती-तंत्रज्ञान खात्याची अतिरिक्त जबाबदारीही होती.
  • मुंबईच्या पश्चिम उपनगरात गुरुदास त्यांचे वर्चस्व होते. ईशान्य मुंबई मतदारसंघातून १९८४मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले.
  • त्यानंतर १९९१, १९९८, २००४ व २००९मध्येही निवडून ते गेले होते. २०१४मधील निवडणुकीत शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी कामत यांचा पराभव केला होता.
  • २०१७मध्ये मुंबई काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.

फोर्ब्सच्या यादीत पी व्ही सिंधूला सातवे स्थान

  • २०१८सालात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला सातवे स्थान मिळाले आहे.
  • पहिल्या १० जणांमध्ये सिंधू ही एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे. जाहीराती व इतर माध्यमातून सिंधूने २०१८मध्ये अंदाजे ६० कोटी रुपये कमावले आहेत.
  • अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने या यादीमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. सेरेनाने यंदाच्या वर्षात जाहीरातींच्या माध्यमातून १०२ कोटी रुपये कमाई केली आहे.

बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव

  • उत्तर प्रदेश सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे. या मार्गाचे नाव आत अटल पथ असे करण्यात येईल.
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील काही योजनाही अटलजींच्या नावाने राबविण्याचे जाहीर केले आहे.
  • याशिवाय छत्तीसगडने नव्याने बांधलेली राजधानी नया रायपूरला अटलजींचे नाव देण्याची घोषणा केली आहे. या राजधानीचे नाव आता ‘अटलनगर’ असे करण्यात येणार आहे.
  • १९९८साली पोखरण येथे अणूचाचणी यशस्वी करण्यामध्ये वाजपेयी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ‘छत्तीसगड आर्म्ड फोर्सेस’ (सीएएफ) बटालियनला पोखरण बटालियन असे नाव देण्यात येणार आहे.
  • छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
  • याशिवाय बिलासपूर विद्यापीठ, राजनांदगाव येथे बांधण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय, जांगिर चम्पा जिल्ह्यातील मारवा औष्णिक प्रकल्प व रायपूरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या एक्स्प्रेस मार्गालाही अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे.
  • अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवरचा काव्यपुरसकार देण्यात येणार आहे.
  • याशिवाय मध्यप्रदेश शिक्षण मंडळाकडून येथील शाळांच्या पाठ्यपुस्तकात वाजपेयी यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात आला आहे.

चंद्रावर पाणी असल्याच्या माहितीला नासाकडून दुजोरा

  • भारताकडून १० वर्षांपुर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या अंतराळ यान चांद्रयान-१ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर गोठलेले पाणी आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
  • ‘पीएनएएस’ जर्नलमध्ये प्रकाशित लेखात नासाने चंद्राच्या सर्वात थंड आणि अंधाऱ्या ध्रुवीय क्षेत्रात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याची माहिती दिली आहे.
  • शास्त्रज्ञांनी मून मिनरेलॉजी मॅपरकडून (एम३) प्राप्त झालेल्या आकड्यांचा वापर करत चंद्रावर गोठलेले पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
  • हे संशोधन ‘रिमोट डिटेक्शन ऑफ वाईडस्पेस इंडिजिनस वॉटर इन लुनार पायरोक्लास्टिक डिपोझिट’ या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आले आहे.

1 टिप्पणी: