चालू घडामोडी : २७ ऑगस्ट

जैव इंधनावरचे भारतातील पहिले उड्डाण यशस्वी

  • भारताच्या पहिल्या जैव इंधनावर (बायो फ्युएल) चालणाऱ्या विमानाचे २७ ऑगस्ट रोजी चाचणी उड्डाण यशस्वी झाले.
  • स्पाईस जेट या भारताच्या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने बम्बार्डियर क्यू ४०० या विमानाची जैविक इंधनावर यशस्वी चाचणी घेतली.
  • डेहराडून येथून उड्डाण केल्यानंतर हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले.
  • या विमानात ७५ टक्के एव्हिएशन टर्बाइन फ्युएल तर २५ टक्के बायो फ्युएल (जैव इंधन) वापरण्यात आले होते.
  • डेहराडूनस्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम या संस्थेने जेट्रोफा वनस्पतींच्या बियांपासून या विमानात वापरण्यात आलेल्या जैवइंधनाची निर्मिती केली होती.
  • नागरी हवाई वाहतूक संचलनालय (डीजीसीए) व स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांसह एकूण २० जणांनी या विमानातून प्रवास केला. सुमारे २५ मिनिटे हे विमान आकाशात होते.
  • या यशस्वी चाचणीबरोबरच जैविक इंधनावर विमानाचे यशस्वी उड्डाण करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.
  • चालू वर्षाच्या सुरुवातीला जगातील पहिल्या जैविक इंधनावर चालणाऱ्या विमानाने लॉस एंजेलिसपासून मेलबर्नपर्यंत उड्डाण केले होते.
  • आतापर्यंत कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या विकसित देशांनीच जैविक इंधनावर विमान उड्डाण करण्याचे तंत्र विकसित केले होते. त्यानंतर आता भारतानेही हे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे.
  • जैविक इंधनावर विमान चालवून विमान संशोधनामध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे. तसेच जैव इंधनावर विमान उड्डाण करणारा भारत हा पहिला विकसनशील देश ठरला आहे.
  • या इंधन प्रकाराची विमानोड्डाण चाचणी यशस्वी झाल्यानंतर याचा देशांतर्गत वापर वाढवण्यावर भर देण्यात येऊ शकतो.
 जैवइंधन व त्याचे फायदे 
  • जैवइंधन हे भाज्यांचे तेल, रिसायकल केलेले ग्रीस आणि जनावरांच्या चरबीपासून तयार होते. तसेच पारंपारिक खनिज तेलाच्या जागी त्याचा वापर करता येणे शक्य आहे.
  • जैवइंधन हे पर्यावरण स्नेही असून त्याच्या वापरामुळे कार्बनचे उत्सर्जन कमी होते. शिवाय, सध्याच्या इंधनाच्या (एटीएफ) तुलनेत ते कमी लागते.
  • २५ टक्के जैवइंधनाच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जन १५ टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते तर, १०० टक्के जैव इंधन वापरल्यास कार्बन उत्सर्जन ६० ते ८० टक्‍क्‍यांनी कमी केले जाऊ शकते.
  • भारतातील विमानासाठीच्या इंधनाचे (एटीएफ) दर जगात सर्वाधिक आहेत. तसेच एटीएफवर मोठ्या प्रमाणात सरकारी कर आणि उपकर लावण्यात येतात.
  • करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
 भारताची योजना 
  • भारत खनिज तेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. देशाच्या एकूण इंधनवापराच्या ८० टक्के इंधन आयात केले जाते.
  • त्यामुळे भविष्यात जैव इंधनाचा वापर वाढवून पारंपरिक इंधनाच्या आयातीवर होणारा खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.
  • या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ‘राष्ट्रीय जैवइंधन धोरण २०१८’ची घोषणा केली होती.
  • त्याअंतर्गत येत्या ४ वर्षांमध्ये इथेनॉलचे उत्पादन तिप्पट वाढविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.
  • जर, असे झाले तर तेलाच्या आयातीवर होणाऱ्या खर्चात १२,००० कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे.
 जेट्रोफा (वनएरंडी) 
  • जेट्रोफा कारकास हे दक्षिण अमेरिका व पश्चिम आशियामध्ये आढळणारे एक बारमासी झुडूप असून त्यापासून अखाद्य प्रकारचे बहुपयोगी तेल मिळते. यास सामान्यतः पायसिक नट अथवा पर्जिंग नट नावाने ओळखतात.
  • जेट्रोफा कारकासचा समावेश युफोर्बियाकी फॅमिलीमध्ये होतो. ह्यापासून रबरासारखा (लॅटेक्स) पदार्थ स्त्रवत असल्याने प्राणी ह्यास तोंड लावत नाहीत.
  • अर्धदुष्काळी वातावरणातदेखील हे तगून राहात असल्याने ह्याचे पीक स्रोतांची उपलब्धता कमी असलेल्या भागांतदेखील ३० वर्षांपर्यंत फायदेशीर रीतीने घेता येते.

आशियाई क्रीडा स्पर्धा: नववा दिवस

  • भालाफेक: भारतीय चमूचा ध्वजधारक नीरज चोप्राला सुवर्णपदक
  • भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने ८८.०६ मीटरची सर्वोकृष्ट फेक करत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले.
  • याबरोबरच आशियाई स्पर्धांमध्ये भालाफेक या क्रीडाप्रकरात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी भारताला या स्पर्धेत भालाफेक कधीही कमावता आले नव्हते.
  • याशिवाय या फेकीमुळे त्याने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. त्याची वैयक्तिक सर्वोकृष्ट कामगिरी ठरली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक आहे.
  • २०१६मध्ये नीरजने २० वर्षांखालील विश्व कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक विक्रमासह सुवर्णपदक मिळवले होते.
  • त्यानंतर त्याने २०१७मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत व गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते.
  • हरयाणातील पानिपत येथे जन्मलेल्या नीरजला यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय चमूचा ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला होता.
  • अॅथलेटीक्स: नीना, सुधा आणि अय्यास्वामी यांना रौप्यपदक
  • महिला लांबउडीपटू नीना वरकिलने ६.५२ मी. एवढी लांब उडी मारत भारताला रौप्यपदक जिंकवून दिले.
  • नीनाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिले पदक आहे. यापूर्वी नीनाने २०१७साली भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते.
  • भारताची युवा धावपटू सुधा सिंगने स्टीपलचेस ३००० मी. या प्रकारात सुधाने दमदार कामगिरी करत देशाला आज रौप्यपदक पटकावून दिले.
  • हे अंतर ९ मिनिटे ४० सेकंद एवढ्या वेळेत पूर्ण केले. तिचे सुवर्णपदक फक्त चार सेकंदांनी हुकले.
  • सुधाने यापूर्वी २०१०साली झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत २०१७साली रौप्यपदक पटकावले होते.
  • पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत धरुण अय्यास्वामीने राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली. धरुणने ४८.९६ सेकंद वेळ नोंदवून दुसरे स्थान मिळवले.
  • धरुणने मार्च २०१८मध्ये फेडरेशन कपमध्ये ४९.४५ सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम रचला होता.
  • बॅडमिंटन: सायना नेहवालला कांस्यपदक
  • बॅडमिंटनच्या महिला एकेरीत सायना नेहवालने कांस्यपदक पटकावले. उपांत्य फेरीत जागतिक क्रमावारीत अव्वल असलेल्या चीनी ताइपेच्या ताइ जू यिंगने तिचा पराभव केला.
  • १९८२नंतर आशियाई स्पर्धांमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये पदक मिळवून देणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी १९८२मध्ये सय्यद मोदीला एकेरीत कांस्यपदक मिळाले होते.
  • याशिवाय आशियाई स्पर्धांमध्ये बॅडमिंटनच्या अंतिम स्पर्धेपर्यंत पोहोचणारी सिंधू ही पहिली भारतीय ठरली आहे. तिने जपानच्या यामागुचीचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.

रिलायन्स जिओचा महसुली उत्पन्नाच्या बाबतीत देशात दुसरा क्रमांक

  • मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमने दूरसंचार क्षेत्रात महसुली उत्पन्नाच्या बाबतीत व्होडाफोनला मागे टाकत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
  • ग्रामीण भागात केलेली दमदार कामगिरी आणि कमी किमतीत दिल्या जाणाऱ्या सेवांमुळे जिओच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे.
  • जिओने २ वर्षांपूर्वी ४जी सेवा देण्यास सुरुवात केली. दोनच वर्षांच्या कालावधीत रिलायन्स जिओने महसुली उत्पन्नाच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे.
  • देशातील दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांचा महसूल लक्षात घेता, त्यातील रिलायन्स जिओचा वाटा २२.४ टक्के इतका आहे.
  • महसुलाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारती एअरटेलचा महसुली उत्पन्नातील वाटा घसरला असून, तो सध्या ३१.७ टक्के इतका आहे.
  • व्होडाफोनचा महसुली उत्पन्नातील वाटा १९.३ टक्के, तर कुमार मंगलम बिर्ला यांच्या आयडियाचा वाटा १५.४ टक्के आहे.
  • टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरटी ऑफ इंडियाने (ट्राय) ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
  • लवकरच आयडिया आणि व्होडाफोनच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कंपन्या एकत्र आल्याने नव्याने तयार होणारी कंपनी देशातील सर्वांत मोठी कंपनी ठरणार आहे.
  • या नव्या कंपनीचे एकूण महसुली उत्पन्न ३५ टक्के असेल. त्यानंतर एअरटेल दुसऱ्या आणि जिओ तिसऱ्या क्रमांकावर जाईल.

निधन: अमेरिकेचे युद्धनायक जॉन मॅक्केन

  • व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेचे हिरो मानले गेलेले आणि अमेरिकेचे विद्यमान सिनेटर जॉन मॅक्केन यांचे दीर्घ आजारानंतर २७ ऑगस्ट रोजी वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले.
  • मॅक्केन यांना युद्धनायक (वॉर हीरो) म्हणून ओळखले जाते. ५ वर्षे ते व्हिएतनाममध्ये तुरुंगात होते. तेथे त्यांच्यावर अन्ववित अत्याचार करण्यात आले होते.
  • व्हिएतनाम युद्धात त्यांनी अमेरिकेसाठी बाजूने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या युद्धतंत्रामुळेच त्यांना अमेरिकेत हिरो मानले गेले होते.
  • मॅक्केन दोनवेळा अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार राहिले होते. २००८च्या निवडणुकीत मॅक्केन हे बराक ओबामा यांच्याकडून पराभूत झाले होते.
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे ते टीकाकार मानले जायचे. अमेरिकेच्या प्रभावशाली सिनेटर्सपैकी एक असलेले मॅक्केन हे भारतमित्र होते.
  • त्यांची कारकीर्द नौदलातून सुरू झाली. ॲरिझोनातून पहिल्यांदा १९८६मध्ये त्यांची सिनेटर म्हणून निवड झाली. शेवटपर्यंत ते सिनेटर होते इतका लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास होता.
  • लोकशाही मूल्यांचा खंदा पुरस्कर्ता, लढवय्या राजकारणी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी युद्ध, शांतता, देशाची स्थिती या मुद्यांवर उघडपणे मत मांडले.

डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना ‘आयर्नमॅन’ हा किताब

  • फ्रान्समधील विची येथे पार पडलेल्या ‘आयर्नमॅन २०१८’ या स्पर्धेचा किताब ५२ वर्षीय नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पटकावला.
  • सायकलिंग, स्विमिंग आणि रनिंग अशा तीनस्तरावर होणारी अत्यंत खडतर व अवघड अशी ही स्पर्धा जागतिक स्तरावर मानाची समजली जाते.
  • यामध्ये स्पर्धकाला निर्धारित १६ तासांच्या कालावधीमध्ये १८० किमी अंतराची सायकलिंग, त्यानंतर ४ किमी अंतराचे पोहणे (स्विमिंग) आणि त्यानंतर ४२ किमी अंतर धावावे (रनिंग) लागते.
  • यामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी १५ तास १३ मिनिटांमध्ये अंतर पार करीत ‘आयर्नमॅन’ हा किताब पटकावला.
  • या स्पर्धेसाठी जगभरातून सुमारे १३०० स्पर्धक सहभागी झाले होते. यात महाराष्ट्र पोलीस दलातून डॉ. रवींद्रकुमार सिंगल हे एकमेव आयपीएस अधिकारी सहभागी झाले होते.

मेजर गोगोई यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई

  • श्रीनगरमधील एका हॉटेलबाहेर तरुणीसोबत असताना अटक करण्यात आलेल्या मेजर लितुल गोगोई यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
  • कर्तव्यावर असताना गोगोई त्यांना नेमून देण्यात आलेल्या हद्दीच्या बाहेर होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे.
  • याशिवाय मेजर गोगोई यांनी त्यांना देण्यात आलेल्या सूचनांविरोधात जाऊन स्थानिकांनी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केल्यानेही न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे.
  • २३ मे रोजी त्यांना श्रीनगरमधील हॉटेलमध्ये एका तरुणीसोबत जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आले होते.
  • या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी ब्रिगेडिअर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी समिती नेमण्यात आली होती.
  • या समितीने त्यांना दोषी मानत लष्कराला शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. चौकशीदरम्यान, संबंधित दस्ताऐवजांची तपासणी केल्यानंतर इतर लष्करी अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवण्यात आले होते.
  • मेजर गोगोई दोषी ठरल्याने त्यांच्यावर आर्मी अॅक्टनुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते किंवा कोर्ट मार्शल होण्याची शक्यताही आहे.
  • यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या एका स्थानिक तरुणाला लष्कराच्या जीपला बांधल्याने मेजर गोगोई वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा