चालू घडामोडी : २८ ऑगस्ट

आशियाई क्रीडा स्पर्धा: दहावा दिवस

  • अॅथलेटिक्स: मनजीत सिंहला सुवर्णपदक
  • ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या मनजीत सिंह आणि जिनसन जॉन्सन यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली. मनजीतने १:४६:१५, तर जिनसनने १:४६:३५ अशी वेळ नोंदवली.
  • ४ बाय ४०० मी. मिश्र रिले प्रकारात भारताच्या हिमा दास, पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी रौप्यपदक जिंकले. ४ बाय ४०० मी. अंतर पार करण्यासाठी भारतीय संघाने ३:१५:७१ मिनिटे एवढा वेळ लागला.
  • मिश्र रिले शर्यतीचा या एशियाडमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत बहारिनच्या संघाने सुवर्णपदक तर कझाकस्तानच्या संघाने कांस्यपदक पटकावले.
  • तिरंदाजी: पुरुष व महिला संघाला रौप्यपदक
  • पुरुष तिरंदाजी संघाने अटीतटीच्या लढतीत रौप्यपदकाची कमाई केली आहे. दक्षिण कोरियाच्या संघाने भारतीय संघावर मात करत सुवर्णपदक पटकावले.
  • भारतीय पुरुष संघाचे खेळाडू: अभिषेक वर्मा, रजत चौहान, अमन सैनी
  • महिलांनाही सांघिक तिरंदाजी प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांचाही पराभव दक्षिण कोरियाच्या महिला संघाने केला.
  • भारतीय महिला संघाच्या खेळाडू: मुस्कार किरार, मधुमिता कुमारी, ज्योती सुरेखा वेन्नाम
  • अत्यंत निकराची झुंज देऊनही भारतीय पुरुष आणि महिलांना दक्षिण कोरियाकडून निसटता पराभव सहन करावा लागला.
  • २०१४च्या आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष संघाने या प्रकारात सुवर्ण पटकावले होते, तर महिला संघाने याच प्रकारात कांस्यपदक पटकावले होते.
  • टेबल टेनिस: भारतीय संघाला कांस्यपदक
  • भारताच्या टेबल टेनिस संघाला दक्षिण कोरियाने ०-३ असे पराभूत केल्यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • भारतीय संघ: जी. सत्ययन, मानव ठक्कर, हरमीत देसाई, अचंता थरथ कमाल आणि ए. अमलराज
  • आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसमधील भारताचे हे पहिले पदक ठरले.
  • बॅडमिंटन: रौप्यपदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला
  • महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सिंधूवर मात केली.
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी तसेच रौप्यपदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला आहे.
  • भारताने यावेळी प्रथमच एकाच आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये २ पदके जिंकली आहेत. यापूर्वी साईना नेहवालने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले आहे.
  • कुराश: भारताला एक रौप्य व एक कांस्यपदक
  • कुराश या अभिनव खेळप्रकारात ५२ किलो वजनी गटात भारताच्या पिंकी बलहाराने रौप्य तर मलप्रभा जाधव हिने कांस्यपदकाची कमाई करून भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली.
  • अंतिम फेरीत पिंकीला उझबेकिस्तानच्याच सुलयमॅनोवा गुलनोरने थेट १० -० असे मोठ्या फरकाने पराभूत केले.
  • कुराश हा कुस्तीप्रमाणेच खेळला जाणारा एक खेळ आहे.

एस. के. अरोरा यांना तंबाखू विरोधी दिन २०१८ पुरस्कार

  • दिल्ली सरकारचे आरोग्य विभागाचे अतिरिक्‍त संचालक एस. के. अरोरा यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या मानाच्या तंबाखू विरोधी दिन २०१८ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
  • तंबाखू नियंत्रणाच्या कामामध्ये अमूल्य योगदानाबद्दल अरोरा यांना या मानाच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
  • अरोरा यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून तंबाखूचे सेवन व धूम्रपान यावर नियंत्रण मिळवले. दक्षिण व आग्नेय आशियातून हा पुरस्कार जिंकणारे अरोरा हे एकमेव व्यक्ती आहेत.
  • जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार दिल्लीमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण २७ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. त्याच्या तुलनेत देशभरातील तंबाखू सेवनाचे सरासरी प्रमाण १७ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे.
  • अशाच प्रकारे दिल्लीतील धुम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण ३५ टक्‍क्‍यांनी घटले आहे. तर देशभरातील हेच प्रमान २३ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे.
  • गेल्या सहा वर्षात दिल्लीतील तंबाखूचे सेवन ६.५ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. ही टक्केवारी उर्वरित देशातील सरासरीपेक्षाही जास्त आहे.
  • हे साध्य करण्यासाठी अरोरा यांनी दिल्लीत तंबाखू व सिगारेटच्या छुप्या जाहिरातींवरही नियंत्रण ठेवले.
  • त्यांनी सीबीएसई व एनसीईआरटी यांना पत्रे पाठवून तंबाखू नियंत्रणाचे पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास सांगितले. सहावी ते बारावी या वयोगटातच मुलांना तंबाखूविरोधी धडे दिले तर ते परिणामकारक ठरते असा त्यांचा अनुभव आहे.
  • रुग्णालये, शाळा, सरकारी कार्यालये येथे त्यांनी तंबाखूविरोधी मोहीम जोरात राबवली. त्यांच्याच प्रयत्नांतून तंबाखू कंपन्या व त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती करणारे अभिनेते यांना नोटिसा देण्यात आल्या.
  • दिल्लीतील हुक्का पार्लरवर त्यांनी कठोर कारवाई केलीच; शिवाय ई-सिगारेटवरही बंदी घातली. ई-सिगारेटवर एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होणार होते, तेही त्यांनी हाणून पाडले.
  • देशाच्या २०१७च्या आरोग्य धोरणानुसार तंबाखू सेवनाचे प्रमाण २०२०पर्यंत १५ टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

वॉरेन बफेट यांच्याकडून पेटीएममध्ये गुंतवणूक

  • ख्यातनाम उद्योगपती वॉरेन बफेट भारतातील आघाडीची डिजिटल वॉलेट कंपनी पेटीएममध्ये गुंतवणूककरणार आहे.
  • या गुंतवणुकीबाबत वॉरेन बफेट यांच्या बर्थशायर हॅथवे आणि पेटीएममध्ये बोलणी सुरू असून येत्या २ ते ३ आठवड्यांमध्ये याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
  • बर्थशायर हॅथवे पेटीएममध्ये २,४४८ कोटी रुपयांची गुंतवणूककरत सुमारे ३ ते ४ टक्के समभाग खरेदी करणार आहेत.
  • त्यामुळे बफेट यांच्या बर्थशायर हॅथवे या कंपनीची गुंतवणूक असलेली पेटीएम ही भारतातील पहिली कंपनी ठरणार आहे.
  • पेटीएममध्ये या आधीच चीनच्या अलीबाबा आणि जपानच्या सॉफ्टबँकच्या वन-९७ कम्युनिकेशन या कंपनीची सुमारे १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.
  • जपानच्या सॉफ्टबँकेने गेल्या वर्षी सुमारे ९ हजार कोटी रुपयांना पेटीएममधील २० टक्के भांडवल विकत घेतले होते.
  • या गुंतवणूकीमुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी पेटीएमला अधिक बळ मिळणार आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीचे व्यवस्थापन आणि ई-व्यापार क्षेत्रात पुढे जाणेही शक्य होणार आहे.
  • पेटीएमने भारतातील पेमेंट सुविधेत व आर्थिक सेवेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. देशातील ५० कोटी नागरिकांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणणे हे पेटीएममचे उद्दिष्ट आहे.
  • पेटीएमचे सीईओ: विजयशेखर शर्मा

ओडिशामध्ये विधान परिषद अस्तित्वात आणण्याचा निर्णय

  • बिजू जनता दलाची सत्ता असलेल्या ओडिशा राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणण्याचा निर्णय तेथील राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब केले जाईल.
  • पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची राजकीय सोय लावण्याकरिता हा निर्णय घेतलाचे स्पष्ट आहे.
  • देशात सध्या ७ राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात असून, ओडिशा हे विधान परिषद असलेले आठवे राज्य ठरेल.
  • विधान परिषद अस्तित्वात असलेली राज्ये : महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा
 विधान परिषद 
  • भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठ गृहाला विधान परिषद म्हणतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत.
  • राज्यघटनेच्या कलम १६९ (१) नुसार विधान परिषद निर्मितीसाठी विधानसभेला प्रथम सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदानात भाग घेतलेल्या एकूण सदस्यांपैकी दोनतृतीयांश सदस्यांच्या पाठींब्याने ठराव मांडावा लागतो.
  • दोन तृतीयांश सभासदांच्या बहुमताने हा ठराव संमत झाल्यास, संसदेच्या मंजुरीनंतरच राज्यात विधान परिषद अस्तित्वात येऊ शकते.
  • विधान परिषद अस्तित्वात आणण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच विधान परिषद रद्द करता येते. विधानसभेतील दोनतृतीयांश सदस्यांनी तसा ठराव संमत केल्यावर संसदेच्या मान्यतेनंतर तसे करता येते.
  • यापूर्वी तमिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांची विधान परिषद रद्द करण्यात आली होती. परंतु कालांतराने सत्ताबदलानंतर टी पुन्हा कार्यरत करण्यात आली.
  • विधान परिषदेची सदस्य संख्या ४० पेक्षा कमी नसावी तसेच राज्य विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एकतृतीयांश सदस्यांपेक्षा जास्त नसावी, अशी घटनेत तरतूद आहे.
  • विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य (१/३), स्थानिक स्वराज्य संस्था (१/३), पदवीधर (१/१२), शिक्षक मतदारसंघातून (१/१२) निवडले जातात.
  • तसेच राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना (१/६) विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात.
  • विधान परिषद सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. दर २ वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवे सभासद निवडले जातात.

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

  • महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवेमध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पडसलगीकर सेवाज्येष्ठतेनुसार ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार होते.
  • पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे १९८२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
  • पुण्यातील एल्गार परिषदेशी संबंधीत डाव्या विचारसरणींच्या विचारवंतांवर देशभरात महाराष्ट्र पोलिसांकडून सध्या छापेमारी आणि अटकसत्र सुरु आहे. यांपैकी ४ जणांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पडसलगीकर यांची निवृत्ती पुढे ढकलण्यात आली आहे.

द्रमुकच्या अध्यक्षपदी एम के स्टॅलिन

  • एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या (द्रमुक) अध्यक्षपदी त्यांचे पुत्र एम के स्टॅलिन यांची निवड करण्यात आली आहे.
  • पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत स्टॅलिन यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. एम. करुणानिधी यांच्यानंतर ते पक्षाचे दुसरे अध्यक्ष बनले आहेत.
  • या बैठकीत दुरई मुरुगन यांची पक्षाच्या खजिनदारपदी निवड करण्यात आली. तसेच करुणानिधी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीचा ठरावही मंजूर करण्यात आला.
  • स्टॅलिन हे दीर्घकाळापासून करुणानिधींसोबत पक्षाचे कामकाज पाहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांची डीएमकेचे कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
  • स्टॅलिन यांनी तमिळनाडूचे उपमुख्यमंत्रिपद, २ वेळा चेन्नईचे महापौरपद सांभाळले आहे. तसेच डीएमके सत्तेत असताना त्यांनी अनेक मंत्रीपदेही भूषविली आहेत.
  • तमिळनाडूतील विधानसभा निवडणूकीत त्यांनी करूणानिधींच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.
  • सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे ७ ऑगस्ट रोजी निधन झाले होते.
  • करुणानिधी हयात असतानाच त्यांचे पुत्र स्टॅलिन आणि अलागिरी यांच्यात पक्षातील वर्चस्वावरुन वाद निर्माण झाला होता. अलागिरी यांची २०१४मध्ये पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा