चालू घडामोडी : ७ ऑगस्ट

द्रमुकचे सर्वेसर्वा एम के करूणानिधी यांचे निधन

  • तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे सर्वेसर्वा एम के करूणानिधी यांचे ७ ऑगस्ट रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले.
  • त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूत ७ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. चेन्नई येथील कावेरी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
  • गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण वयोमानामुळे त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळू शकला नाही.
  • त्यांना उपचारासाठी दाखल केल्यापासून रूग्णालयाबाहेर त्यांचे चाहते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. राज्यात विविध ठिकाणी प्रार्थना केली जात होती. अनेक कार्यकर्त्यांनी आत्महत्याही केली होती.
  • भारताच्या सर्वांत ज्येष्ठ नेत्यांमध्ये करूणानिधी यांच्या नावांचा समावेश होता. त्यांच्या निधनामुळे दक्षिण भारतातील राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.
 करुणानिधी यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास 
  • करूणानिधी यांचा जन्म ३ जून १९२४ रोजी तिरुकुवालाई (तामिळनाडू) येथे झाला. त्यांनी वयाच्या १४व्या वर्षी द्रविडी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला होता.
  • करुणानिधी यांनी एकूण तीन विवाह केले. त्यांच्या तीन पत्नींपैकी पद्मावती यांचे निधन झाले आहे. करुणानिधी यांना चार मुले आणि दोन मुली आहेत.
  • राजकारणात येण्यापूर्वी करूणानिधी यांनी तामिळ चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून प्रचंड यश मिळवले होते.
  • पटकथा लेखक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरूवात करणाऱ्या करूणानिधींनी समाजवादी आणि बुद्धिवादी आदर्शांना प्रोत्साहन देणाऱ्या ऐतिहासिक, सामाजिक (सुधारणावादी) कथा लिहिल्या. त्यांच्या या प्रयत्नालाही प्रचंड यश मिळाले.
  • त्यांनी राजकुमारी या आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर सुमारे ७५ चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिल्या.
  • विधवा पुनर्विवाह, जमिनदारीची प्रथा पूर्णपणे बंद करण्याची मागणी, धर्माच्या नावाखाली होणारी दुष्कृत्य, अस्पृश्यता निवारण, शोषित जनतेला दिलासा देणाऱ्या पटकथांवर त्यांनी भर दिला.
  • याशिवाय कविता, पत्र, कथा, चरित्र, कादंबऱ्या, ऐतिहासिक कादंबऱ्या, पटकथा, चित्रपट गीते, चित्रपटाचे संवाद असा मोठा ऐवज त्यांनी लिहीला आहे.
  • साहित्याबरोबर करुणानिधी यांनी कला आणि स्थापत्यशास्त्रामार्फत तमिळ भाषेसाठीही योगदान दिले.
  • कन्याकुमारीमध्ये त्यांनी विद्वानांचा सन्मान करण्याच्यादृष्टीने त्यांनी कन्याकुमारी येथे १३३ फूटांचा तिरुवल्लुवरचा पुतळा उभारला.
  • त्यांची पुस्तके आणि कवितासंग्रह मिळून एकूण १००हून अधिक पुस्तके आहेत. याबरोबरच त्यांनी काही नाटकांचेही लेखन केले.
 करुणानिधी यांचा राजकारणातील प्रवास 
  • १९३८मध्ये अलागिरिस्वामी यांच्या भाषणापासून प्रभावित होऊन ते जस्टिस पार्टीमध्ये सामील झाले.
  • तामिळनाडूमध्ये द्रविडी चळवळ रुजविण्यात व हिंदी भाषाविरोधी आंदोलन उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
  • त्यांनी तमिळनाडू मनवर मंद्रम नावाची एक विद्यार्थी संघटना सुरु केली. द्रविड चळवळीच्या विद्यार्थी शाखेचे काम करणारे ते पहिले विद्यार्थी होते.
  • यानंतर त्यांनी एका वर्तमानपत्राची स्थापना केली. आज त्यामध्ये बदल होत मुरासोली नावाचे वर्तमानपत्र तयार झाले आहे. द्रमुक पक्षाचे ते अधिकृत मुखपत्र आहे.
  • पेरियार व अण्णादुराई यांच्याकडून त्यांना राजकारणातील धडे मिळाले. १९४९मध्ये अण्णादुराई यांच्याबरोबर करुणानिधी यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केली आणि ते त्या पक्षाचे पहिले कोषाध्यक्ष झाले.
  • १९५७मध्ये करुणानिधी यांनी कुलीतलाईमधून मतदारसंघातून विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी एकाही निवडणुकीत पराभव स्वीकारला नव्हता. त्यांनी विक्रमी १२ वेळा विधानसेभेची निवडणूक लढवली आणि जिंकली.
  • १९६९मध्ये अण्णादुराई यांचे निधन झाले. त्यावेळी ते द्रमुक पक्षाचे अध्यक्ष झाले आणि पहिल्यांदाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले.
  • तामिळनाडूच्या जनतेने त्यांना ५ वेळा (१९६९-७१, १९७१-७६, १९८९-९१, १९९६-२००१ आणि २००६-२०११) मुख्यमंत्रिपदी विराजमान केले.
  • १९९९ ते २००४ पर्यंत ते भारतीय जनता पार्टीबरोबर आघाडी सरकारमध्ये राहिले. २००४साली करुणानिधी यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करत संपुआ सरकारमध्ये स्थान मिळवले.
  • २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये करुणानिधींच्या पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
  • २०१६मध्ये तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्ष विजयी झाला. सध्या करुणानिधींचा पक्ष तामिळनाडू विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे.
  • २७ जुलैला त्यांनी द्रमुकच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून ५० वर्षे पूर्ण झाली होती. गेले काही वर्षे ते सक्रीय राजकारणापासून दूर होते.
  • तामिळनाडूच्या राजकारणावर प्रदीर्घ प्रभाव पाडणाऱ्या करुणानिधी यांनी आपले तिसरे पुत्र एम. के स्टॅलिन यांना आपला राजकीय वारस घोषित केले होते.
  • चित्रपटातील यश, जबरदस्त मेहनत, चतुरस्त्र व्यक्तिमत्व यामुळे राजकारणातही ते कमालीचे लोकप्रिय ठरले.
  • ते यशस्वी राजकारणी, मुख्यमंत्री, चित्रपट लेखक, गीतकार, साहित्यिकबरोबरच पत्रकार, प्रकाशक आणि व्यंगचित्रकारही होते.
  • करूणानिधींना त्यांच्या अष्टपैलू प्रतिभेमुळेच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘कलैगनार’ (अर्थ : कला निपुण) हे नाव दिले होते. त्याचबरोबर त्यांना मुथामिझ कविनार ही म्हटले जात.
  • तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणामध्ये करूणानिधी यांनी ६० वर्षे योगदान दिले आहे. त्यांना द्रविडी नेता म्हणूनही ओळखले जात होते.
  • करुणानिधी हे दक्षिणेतील दिग्गज राजकीय नेत्यांपैकी एक होते. तामिळनाडूच्या आणि देशाच्या राजकारणात त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला.
  • करुणानिधी यांचे आत्मचरित्र सहा खंडात प्रसिद्ध झाले असून, त्याचे शीर्षक ‘नेंजुक्कू निथी’ असे आहे.
  • त्यांना आण्णामलाई विद्यापिठाने १९७१मध्ये आणि मदुराई कामराज विद्यापिठाने २००६मध्ये सन्माननीय पदवी प्रदान केलेली आहे.
  • द्रविड आंदोलनाशी संबंधित इतर अनेक नेत्यांप्रमाणे हिंदू असूनही ८ ऑगस्ट रोजी त्यांना मरीना बीचवरच दफन करण्यात आले.
  • पेरियार, सीएन अण्णादुराई, एमजी रामचंद्रन, जयललिता यांनाही मृत्यूनंतर मरीना बीचवर दफन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे वीरपूत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद

  • उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत महाराष्ट्राचे वीरपूत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले.
  • २९ वर्षीय कौस्तुभ राणे यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदकाने सन्मान करण्यात आला होता.
  • मीरा रोडच्या शीतल नगरमधील हिरलसागर इमारतीत राणे राहत होते. ते मूळचे कोकणातील वैभववाडीतील सडूरे गावाचे आहेत.
  • २०१०मध्ये कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चेन्नई येथून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.
  • २०११मध्ये ते सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू झाले. २०१३मध्ये त्यांना कॅप्टनपदी तर २०१८मध्ये मेजरपदी बढती मिळाली.
  • ३६व्या बटालियनमध्ये असणारे मेजर कौस्तुभ सध्या उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते.
  • मेजर कौस्तुभ यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. त्यानंतर मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

महाराष्ट्रात बांबू प्रवर्तन प्रतिष्ठानची स्थापना होणार

  • राज्यात बांबू क्षेत्राचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक एजन्सीचा समावेश करून महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान या कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला.
  • बांबू क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाकरीता कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने समितीची स्थापना करण्यात आली होती.
  • सदर समितीने राज्य सरकार, ट्रस्ट, खाजगी कंपन्या, बँका आणि इतर चांगल्या संघटना एकत्रित येवून महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान सुरू करावे असे सुचविले आहे.
  • प्रारंभी हे प्रतिष्ठान राज्य शासन व इतर संस्थांकडून कॉर्पस फंडाने सुरूवात करता येईल तसेच सीएसआर निधीचाही वापर करता येईल. नंतर सदर कंपनी स्वत:च्या उत्पन्नातून विविध प्रकल्पाची अंमलबजावणी करेल.

भारतीय फुटबॉल संघाचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय

  • भारतीय फुटबॉल संघाने कॉटीफ कप स्पर्धेत सहावेळा २० वर्षांखालील विश्वचषक उंचावणाऱ्या अर्जेंटिनावर २-१ असा आश्चर्यकारक विजय मिळवला.
  • १० खेळाडूंसह खेळूनही भारतीय संघाने मिळवलेला हा विजय फुटबॉल इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला.
  • या सामन्यात भारतासाठी गोल करणारे दीपक तांग्री (४थ्या मिनिटाला) आणि अन्वर अली (६८ मिनिटाला) हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

गगनजित भुल्लरला फिजी इंटरनॅशनलचे विजेतेपद

  • भारतीय गोल्फर गगनजीत भुल्लर याने ऑस्ट्रेलियाच्या अँथोनी क्वाएलला पराभूत करत फिजी इंटरनॅशनलचे विजेतेपद पटकावले.
  • हे त्याचे युरोपीय टीमवरील पहिले जेतेपद आहे. गतवर्षी त्याने मकाऊ खुल्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते.
  • यासोबतच भुल्लर आशियाई टूरवरील भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. तसेच तो ऑस्ट्रेलिया टूरवर विजेतेपद मिळवणारा पहिला भारतीय आहे.
  • हे त्याचे एकूण दहावे आंतरराष्ट्रीय विजेतेपद असून, आशियाई टूरवर त्याचा नववा विजय आहे.
  • यापूर्वी भारताच्या अर्जुन अटवाल व ज्योती रंधवा यांनी प्रत्येकी ८ स्पर्धा जिंकल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा