चालू घडामोडी : ६ सप्टेंबर

समलैंगिकता गुन्हा नाही: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

  • समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय ६ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना हा निर्णय देण्यात आला.
  • सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. आर. एफ. नरीमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला.
  • या निर्णयामुळे मागील १५८ वर्षांपासून अंमलात असलेल्या कलम ३७७ मधील वादग्रस्त समलैंगिक संबंधांना विरोध करणाऱ्या तरतुदी कालबाह्य होणार आहेत.
निकालातील ठळक मुद्दे:
  • सहमतीने एकांतात समलैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही.
  • जुनी विचारधारा बदला, लोकांनी मानसिकता बदलावी.
  • समलिंगिंना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार.
  • कोणाच्याही बाबतीत भेदभाव करता येणार नाही.
  • घटनात्मकदृष्ट्या समलैंगिकांना अन्यांप्रमाणेच समान अधिकार.
कलम ३७७
  • १८६१मध्ये लॉर्ड थॉमस मॅकाले याने भारतीय दंड विधानाचा (आयपीसी: इंडियन पिनल कोड) मसुदा तयार केला होता. १८६२मध्ये कलम ३७७चा त्यात समावेश करण्यात आला.
  • एखाद्याने ‘निसर्ग नियमांच्या विरोधात जाऊन कोणतीही लैंगिक कृती’ केल्यास त्याला जन्मठेप किंवा १० वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद यात करण्यात आली. हा अजामीनपात्र गुन्हा आहे.
  • त्याकाळी संभोग हा फक्त प्रजननासाठीच केला पाहिजे, अशी धारणा होती. त्यामुळे हे कलम लेस्बियन, गे, बायसेक्शूअल आणि ट्रान्सजेंडर यांना लागू झाले.
  • या कलमानुसार एखाद्या प्रौढ विवाहित स्त्री व पुरुष जोडप्याने संमतीने प्रजनन होणार नाही, असे संबंध ठेवले तर तोदेखील गुन्हा ठरतो.
  • प्राण्यांसोबत लैंगिक संबंध ठेवल्यास जन्मठेप किंवा १० वर्षाची शिक्षा आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद या कलमात करण्यात आली आहे.
नाझ फाऊंडेशन
  • या कलमाविरोधात सर्वप्रथम नाझ फाऊंडेशन या संस्थेने २००१मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
  • या याचिकेवर २ जुलै २००९ रोजी दोन प्रौढ व्यक्तींमधील खासगी लैंगिक संबंध जर संमतीने असतील तर तो गुन्हा नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला.
  • डिसेंबर २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला. ३७७ हे कलम काढून टाकण्याचे अधिकार संसदेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
  • घटनेच्या २१व्या कलमाने सर्वच नागरिकांना आत्मप्रतिष्ठेचा अधिकार दिला आहे. त्या अधिकारास या निकालाने बाधा येत आहे, असा दावा नाझ फाऊंडेशनने केला.
  • २०१३मधील निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात नाझ फाऊंडेशन व अन्य समाजसेवी संघटनांनी फेरविचार याचिका दाखल केली होती.
  • शेवटी जानेवारी २०१८मध्ये न्या. दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने या निर्णयाचा फेरविचार करण्याचा निर्णय दिला.
समलैंगिकता आणि जग
  • जगातील ७२ देशात समलैंगिक संबंध गुन्हा ठरवण्यात आला आहे. या देशांमध्ये समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांना जन्मठेपेपासून ते फाशीची शिक्षा केली जाते.
  • तर जगातील केवळ २६ देशात समलैंगिक संबंधांना वैध ठरवण्यात आले आहे.
  • नेदरलँडमध्ये समलिंगी विवाहाला २०००मध्ये सर्वात पहिल्यांदा मान्यता देण्यात आली. २०१५मध्ये अमेरिकेने समलिंगी विवाहाला मान्यता दिली.
  • एलजीबीटी: लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर

भारत आणि अमेरिकेदरम्यान टू प्लस टू बैठक

  • भारत आणि अमेरिकेत ६ सप्टेंबर रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही देशांनी संरक्षणाशी संबंधित सीओएमसीएएसएस करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • या करारामुळे भारताचा अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • दोन्ही देशांचे लष्करी संबंध दृढ करणे आणि आशियातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याचा या करारांमागे उद्देश आहे.
  • अमेरिका आणि भारतामध्ये ‘टू प्लस टू’ची बैठक पार पडली. यापूर्वी दोनवेळा ही बैठक रद्द झाली होती.
  • अमेरिकेकडून संरक्षण मंत्री जिम मॅटिस, परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो तर भारताकडून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या बैठकीत सहभागी झाले होते.
  • दक्षिण आशियात स्थिरता आणि शांतता कशी नांदेल त्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली.
  • भारताचा अण्वस्त्र पुरवठादार गटात (एनएसजी) समावेश करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याचाही या बैठकीत निर्णय झाला.
  • भारतात येण्यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी पाकिस्तानचा दौरा केला. त्यांनी तेथील नवनियुक्त सरकारच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली.

ऋतभ्रता मुन्शी यांना रामानुजन पुरस्कार

  • ऋतभ्रता मुन्शी यांना त्यांच्या नंबर थिअरीवरील संशोधनासाठी यंदाचा रामानुजन पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • दी इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरॉटिकल फिजिक्स या संस्थेकडून रामानुजन पुरस्कार दिला जातो. विकसनशील देशातील ४५ वयाखालील संशोधक गणितज्ञांची निवड त्यासाठी केली जाते.
  • पूर्णाकाचे गुणधर्म हा नंबर थिअरीचा मूळ गाभा आहे. मुन्शी यांनी आधुनिक नंबर थिअरीचा अभ्यास केला आहे.
  • अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी विद्यावाचस्पतीही पदवी घेतली. नंतर डॉक्टरेटनंतरचे प्रशिक्षण घेऊन ते भारतात परतले.
  • सध्या ते कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट या संस्थेत कार्यरत आहेत. त्यांनी नंबर थिअरी व गणितीय भूमितीची सांगड घातली आहे.
  • २०१७मध्ये त्यांना इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनचा गणित विज्ञानाचा पुरस्कार मिळाला होता.
  • याशिवाय इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे सुवर्णपदक, बिर्ला सायन्स प्राइझ, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत.

तेलंगणामध्ये विधानसभा बरखास्त

  • तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा दिला आहे.
  • मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर राव यांनी राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांच्याकडे राज्याची विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली.
  • राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला असून, राज्याची विधानसभा बरखास्त केली आहे. त्यामुळे तेलंगणामध्ये लवकरच मुदतपूर्व निवडणुका होणार आहेत.
  • नव्याने अस्तित्वात आलेल्या तेलंगाणा राज्यामध्ये २०१४मध्ये पहिल्यांदाच विधानसभेसाठी निवडणूक झाली होती.
  • तेलंगणा विधानसभेची मुदत २०१९मध्ये संपणार असून, विधानसभा आणि लोकसभेसाठी एकत्रच निवडणूक होणे नियोजित होते.
  • मात्र राज्यातील राजकीय समिकरणांचा विचार करून विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतला.
  • ११९ सदस्यांच्या तेलंगणा विधानसभेमध्ये सध्या तेलंगणाराष्ट्र समितीचे (टीआरएस) ९० सदस्य असून, विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे १३ तर भाजपाचे पाच सदस्य आहेत.

काझिंद २०१८: भारत-कझाकस्तान संयुक्त युद्धसराव

  • कझाकस्तानच्या ओतार भागात १० ते २३ सप्टेंबर दरम्यान ‘काझिंद २०१८’ (KAZIND) या भारत आणि कझाकस्तान देशांच्या संयुक्त लष्करी युद्धसरावाचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • या दोन्ही देशांमधील ही तिसरा संयुक्त युद्धसराव आहे. या लष्करी सरावाची दुसरी आवृत्ती २०१७मध्ये भारतात आयोजित करण्यात आली होती.
  • या युद्धप्रणालीचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील कौशल्य आणि अनुभवांची देवाणघेवाण करणे आहे. तसेच या युद्ध सरावामुळे दोन्ही देशांमधील लष्करी संबंध मजबूत होतील.

सिंगापूरमध्ये ६वी पूर्व आशिया शिखर परिषद

  • ६व्या पूर्व आशिया शिखर परिषदेचे आणि आसियान संघटनेच्या आर्थिक मंत्र्यांच्या बैठकीचे सिंगापूरमध्ये १ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. सिंगापूर देश आसियानचा विद्यमान अध्यक्ष आहे.
  • पूर्व आशिया शिखर परिषदेमध्ये १० आसियान देश तसेच ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपान, कोरिया, न्यूझीलंड, रशिया आणि अमेरिका या ८ देशांनी भाग घेतला.
  • या बैठकीत, डिजिटल अर्थव्यवस्था आणि ग्लोबल व्हॅल्यु चेन यांचे आर्थिक विकासातील योगदान यावर चर्चा झाली.
  • तसेच नोव्हेंबर २०१८मध्ये मलेशियातील क्वालालंपूर येथे आसियान-भारत व्यापार परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
  • पूर्व आशिया शिखर परिषदेनंतर भारत-आसियान आर्थिक मंत्र्यांची १५वी बैठक आयोजित करण्यात आली होती.
  • सिंगापूरचे व्यापार व उद्योग मंत्री चान चुन सिंग आणि भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
  • या बैठकीत १० आसियान देश सहभागी झाले. यात भारत-आसियानच्या सध्याच्या आर्थिक आणि व्यवसायिक बाबींची चर्चा झाली.
  • २०१७-१८मध्ये आसियान आसियान भारताचा दुसरा सर्वात मोठा द्विपक्षीय व्यापारी भागीदार होता. भारत व आसियान दरम्यान २०१७-१८मध्ये ८१.३३ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला.
 आसियान 
  • ASEAN (आसियान): Association of Southeast Asian Nations
  • आसियान ही आग्नेय आशियातील १० देशांची संघटना असून, याचे सचिवालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे.
  • ब्रुनेइ, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश आसियानचे सदस्य आहेत.
  • ८ ऑगस्ट १९६७ रोजी रोजी ही संघटना स्थापन करण्याची घोषणा झाली, यालाच ‘बँकॉक घोषणा’ म्हणतात. इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड हे आसियानचे संस्थापक देश आहेत.
  • त्यानंतर ब्रुनेइ हा सहावा देश जोडला गेला. १९९५ साली व्हिएतनाम, १९९७ साली लाओस व  म्यानमार आणि १९९९ साली कंबोडिया हे देश जोडले गेले.
  • जगाच्या एकूण जमिनक्षेत्रापैकी ३ टक्के क्षेत्र आसियान देशांनी व्यापलेले आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ८.८ टक्के लोकसंख्या आसियान देशांची आहे.
  • सर्व आसियान देशांची मिळून एक अर्थव्यवस्था मानली तर ती जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.

आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक परिषद २०१८

  • आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक परिषद २०१८ नेपाळची राजधानी काठमांडू येथे ३ ते ५ सप्टेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आली होती.
  • या परिषदेचे उद्घाटन नेपाळचे उपराष्ट्रपती नंद बहादूर पुन यांनी केले. 'Equality begins with Economic Empowerment' हा या परिषदेचा मुख्य विषय होता.
  • दक्षिण आशियाई महिला विकास मंचकडून (SAWDF) या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
  • यशस्वी व आघाडीच्या महिला व्यावसायिक, आंतरराष्ट्रीय सेवा प्रदाते, संसाधन संस्था, विशेषज्ञ, सरकारी प्रतिनिधी यांना एकत्र आणून, चर्चा आणि सहकार्याद्वारे आर्थिक परिवर्तन घडविण्यावर लक्ष केंद्रित करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट होते.
  • या परिषदेमध्ये सार्क, आसियान, युरोपियन युनियन, आफ्रिका, अरब देश आणि चीनमधील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
 दक्षिण आशियाई महिला विकास मंच (SAWDF) 
  • ही महिला उद्योजकांच्या समस्यांवर काम करणारी प्रथम सार्क मान्यताप्राप्त एक स्वायत्त, ना नफा तत्वावर काम करणारी संस्था आहे. 
  • २०१४मध्ये काठमांडूत १८व्या सार्क शिखर परिषदेत या संस्थेला सार्क मान्यताप्राप्त संस्थेचा दर्जा देण्यात आला.

सौरभ चौधरीला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक

  • भारताचा १६ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तुल कनिष्ठ गटात विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले.
  • त्याने २४५.५ गुणांची कमाई करताना विश्वविक्रम नोंदवला. याच गटात भारताच्या अर्जुन सिंग चिमाने कांस्यपदक जिंकले
  • जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत सौरभने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते.
  • त्याने जर्मनी येथे झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत बाजी मारताना विश्वविक्रम केला होता आणि तो विक्रम त्याने मोडला.
  • याशिवाय दिव्यांश सिंग पनवार आणि श्रेया अगरवाल यांनी आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक कनिष्ठ गटात कांस्यपदकाची कमाई केली.
  • २०२०मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा ही पहिली थेट पात्रता स्पर्धा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा