चालू घडामोडी : ८ सप्टेंबर

अटल पेंशन योजनेच्या तरतुदींमध्ये बदल

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेंशन योजनेची मुदत अनिश्चित काळासाठी वाढविण्याचा निर्णय घेतला.
  • ऑगस्ट २०१८मध्ये या योजनेची मुदत संपली होती. परंतु लोकांनी योजनेला दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे ही मुदत वाढविण्यात आली.
  • याबरोबरच अधिकाधिक लोकांना अटल पेंशन योजनेमध्ये सामील होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी वय मर्यादेमध्येही बदल करण्यात आले आहेत.
  • यापूर्वी या योजनेत अंशदान करण्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ६० वर्षे होती. त्यामध्ये वाढ करून आता ती ६५ वर्षे करण्यात आली आहे.
  • तसेच ऑगस्ट २०१८नंतर या योजनेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना २ लाख रुपयांचा अपघात विमाही देण्यात येईल. यापूर्वी ही रक्कम १ लाख रुपये होती.
  • या योजनेतील ओव्हरड्राफ्ट सुविधा ५ हजार रुपयांवरून वाढवून १० हजार रुपये करण्यात आली आहे.
 अटल पेंशन योजनेबद्दल 
  • ही निवृत्तीनंतर दरमहा ठरावीक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. ज्यांच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही अशा नागरिकांसाठी ही योजना लाभदायक आहे.
  • ९ मे २०१५ रोजी कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे उद्घाटन केले. ही योजना सरकारच्या स्वावलंबन योजनेऐवजी सुरु झाली आहे.
  • ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. ही योजना मुख्यत्वे देशातील असंघटित क्षेत्रातील कर्मचारी वर्गाच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी आहे.
  • १८ ते ४० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात.

  • जगातील आघाडीची आयटी कंपनी गूगलने विशेषतः वैज्ञानिकांसाठी ‘डाटासेट सर्च’ नावाचे सर्च इंजन लाँच केले.

रिकाको इकी: आशियाई स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू

  • आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानची युवा जलतरणपटू रिकाको इकी हिची स्पर्धेतील ‘सर्वात मौल्यवान खेळाडू’ म्हणून निवड करण्यात आली.
  • १९९८च्या आशियाई क्रीडा स्पर्धांपासून सर्वात मौल्यवान खेळाडू (Most Valuable Player) हा पुरस्कार दिला जातो.
  • हा पुरस्कार प्राप्त करणारी रिकाको पहिली महिला आणि जपानची चौथी खेळाडू आहे. तसेच आशियाई स्पर्धांमध्ये ६ सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच महिला आहे.
  • पुरस्कारस्वरूप तिला चषक व ५०,००० डॉलर्सचा (३५ लाख रुपये) धनादेश प्रदान करण्यात आला.
  • रिकाकोने या स्पर्धेत ६ सुवर्ण आणि २ रौप्य अशा एकूण ८ पदकांची कमाई करत कोरियन नेमबाज सो जिन मैनच्या विक्रमाशी बरोबरी केली. जिनने १९८२च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत ८ पदके जिंकली होती.
  • तिने ५० मी. बटरफ्लाय, १०० मी. फ्लाय, ५० मी. फ्रीस्टाइल, 100 मी. फ्रीस्टाइल, ४ बाय १०० मी. फ्रीस्टाइल तसेच ४ बाय १०० मी. मेडले प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.
  • याशिवाय तिने ४ बाय २०० फ्रीस्टाइल तसेच मिश्र मेडले रिलेमध्ये रौप्यपदकावर नाव कोरले.
  • जपानने या स्पर्धेत एकूण २०५ पदके जिंकून पदक तालिकेत दुसरा क्रमांक मिळविला.

निधन: गुजराती साहित्यिक, पत्रकार भगवतीकुमार शर्मा

  • ५०हून अधिक वर्षे गुजराती साहित्य क्षेत्र आपल्या लेखनकर्तृत्वाने गाजविणारे चतुरस्र गुजराती साहित्यिक, पत्रकार भगवतीकुमार शर्मा यांचे ५ सप्टेंबर रोजी निधन झाले.
  • भगवतीकुमार शर्मा यांचा जन्म ३१ मे १९३४ रोजी सुरतमध्ये झाला. परिस्थितीमुळे त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही. नंतरच्या काळात १९६८मध्ये त्यांनी गुजराती व इंग्रजी भाषेत पदवी घेतली.
  • महात्मा गांधी यांच्या निधनावेळी (३१ जानेवारी १९४८) त्यांनी त्यांची पहिली कविता लिहिली. त्यानंतर १९५२मध्ये त्यांची २ सुनीत काव्ये ‘गुजरातमित्र’ या सुरतमधील वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती.
  • कादंबरी, लघुकथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा अशा अनेक साहित्यप्रकारांतून त्यांनी लेखन केले. त्यांनी सुमारे ८०हून अधिक पुस्तके लिहिली.
  • त्यांना १९८४मध्ये रणजितराम सुवर्ण चंद्रक तर त्यांच्या ‘असूर्यलोक’ पुस्तकाला १९८८मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
  • ‘सुरत मुज घायल भूमी’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यांनी ‘अमेरिका आवजे’ हे प्रवासवर्णनही लिहिले. त्यांच्या निवडक कथा ‘भगवतीकुमारनी श्रेष्ठ वार्ता’ नावाने प्रसिद्ध आहेत.
  • गुजराती साहित्य परिषदेचे ते २००९ ते २०११ या काळात अध्यक्ष होते. गुजरात मित्रच्या संपादक विभागात ते बराच काळ काम करीत होते.
साहित्यसंपदा
लघुकथासंग्रह
समयद्वीप रातराणी
हृदयदान छिन्नभिन्न
कई याद नथी व्यर्थ कक्को
अकथ्य मांगल्य कथाओ
छाल बाराखडी अडबीद
महेक माली गई तुमने फूल दिधानु याद नथी दीप से दीप जले
गझलसंग्रह
संभव झलहल
छांदो छे पनदादा जेनान आधी अक्षरनु चोमासु
उजागरो गझलयान
पुरस्कार
कुमार चंद्रक रणजितराम सुवर्ण चंद्रक
साहित्य अकादमी पुरस्कार हिरद्र दवे स्मृती पुरस्कार
कलापी पुरस्कार नचिकेत पुरस्कार
अकथ्य मांगल्य कथाओ
गुजरात साहित्य अकादमी पुरस्कार साहित्यरत्न पुरस्कार

चीनी बंदरांचा वापर करण्याची नेपाळला परवानगी

  • भारताच्या शेजारी राष्ट्रांना मदत करुन भारताची कोंडी करण्यासाठी नेपाळला चीनने त्यांच्या देशातील बंदरांचा वापर करु देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • व्यापारासाठी भारताच्या बंदरांवर अवलंबून असलेल्या नेपाळला यामुळे आता व्यापारासाठी भारताची आवश्यकता भासणार नाही.
  • चीनने नेपाळला शेनजेन, लियानयुगांग, झाजियांग आणि तियानजिन ही चार बंदरे खुली केली आहेत.
  • चीनच्या बंदरांवरुन व्यापार करणे हे नेपाळच्या व्यापाऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. नेपाळपासून चीनमधील सर्वात जवळचे बंदर हे २६०० किमीवर आहे.

जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत अंकुरचा सुवर्णवेध

  • जागतिक नेमबाजी अजिंक्यपद (ISSF World Championship) स्पर्धेत भारताच्या अंकुर मित्तलने डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले.
  • याशिवाय अंकुरने डबल ट्रॅप सांघिक प्रकारात शार्दुल विहान आणि मोहम्मद असबसोबत कांस्यपदकाची कमाई केली.

शिकागोमध्ये विश्व हिंदू संमेलनाचे आयोजन

  • स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये विश्व हिंदू काँग्रेसच्या संमेलनात दिलेल्या भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिकागोमध्येच विश्व हिंदू काँग्रेसच्या संमेलनाचे आयोजन ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले.
  • या संमेलनामध्ये जगभरातील ८० देशांचे २५००पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर चिन्मय मिशनचे प्रमुख स्वामी स्वरूपानंद, दलाई लामा हे प्रमुख वक्ते म्हणून संमेलनात सहभागी होणार आहेत.
  • या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी भारताचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू समारोपाचे भाषण करणार आहेत.
  • या संमेलनात आर्थिक, शैक्षणिक, संघटन, राजकीय, महिला तसेच तरुणांशी निगडीत मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यामध्ये जागतिक हिंदू समाजाची मुल्ये मांडली जाणार आहेत.
  • ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे विश्व हिंदू परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वामी विवेकानंद यांनी ऐतिहासिक भाषण केले होते.
  • विश्व हिंदू काँग्रेस जगभरात काम करणाऱ्या हिंदू संघटनांचा हा एक समूह आहे. दर ४ वर्षांनी विश्व हिंदू काँग्रेसद्वारे विश्व हिंदू संमेलनाचे आयोजन केले जाते.
  • या समूहाचा मुख्य हेतू हिंदू समाजाला एकजूट करणे, समाजाच्या हिताची काळजी घेणे आणि देशभरातील वंचित समुदायांची मदत करणे हा आहे.

सेऊल येथे तिसरी ASEM परिषद

  • ग्लोबल एजिंग आणि वृद्ध व्यक्तींचे मानवाधिकार या विषयांवर आधरित तिसऱ्या ASEM (आशिया यूरोप बैठक) परिषदेचे आयोजन दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे करण्यात आले.
  • ही परिषद दक्षिण कोरिया आणि कोरियन मानवाधिकार आयोगाने संयुक्तपणे आयोजित केली होती.
  • या ३ दिवसीय परिषदेत संयुक्त राष्ट्र, UNESCAP, UNECE, युरोपियन युनियन, आसियान, GANHRI अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी सहभाग घेतला.
  • या परिषदेत भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थवरचंद गेहलोत यांनी केले.
  • या बैठकीत वृद्ध व्यक्तींचे अधिकार आणि त्यांच्याशी होणाऱ्या भेदभावांवर चर्चा करण्यात आली.
  • या परिषदेतुन मिळालेल्या अनुभवाचा उपयोग ज्येष्ठ नागरिकांसाठीची धोरणे राबविण्यासाठी केला जाणार आहे.
 आशिया युरोप बैठक (ASEM) 
  • आशिया युरोप बैठकीमध्ये (Asia Europe Meeting) आशिया व युरोपातील ५१ देश भाग घेतात. ASEMची स्थापना मार्च १९९६मध्ये झाली. या परिषदेत राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात येते.
  • ASEMच्या पहिल्या परिषदेचे आयोजन थायलंडची राजधानी बँकॉक येथे करण्यात आले होते.
  • ASEM जगातील ६२.३ टक्के लोकसंख्या, ५७.२ टक्के जीडीपी आणि ६० टक्के व्यापाराचे प्रतिनिधित्व करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा