चालू घडामोडी : १३ सप्टेंबर

दैनंदिन वापरातील ३२८ औषधांवर बंदी

  • ड्रग टेक्नॉलॉजी अॅडव्हायजरी बोर्ड अर्थात डीटीएबीने दिलेल्या शिफारसींनुसार केंद्र सरकारने दैनंदिन वापरातील ३२८ औषधांच्या उत्पादन, विक्री किंवा वितरणावर बंदी घातली आहे.
  • ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
  • आजार लवकर बरा व्हावा यासाठी अशाप्रकराची औषधे अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतात. ही औषधे आरोग्यास हानीकारक असून यावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
  • औषधे आणि सौंदर्य प्रसाधन सामग्री अधिनियम १९४०च्या कलम २६-ए अंतर्गत एफडीसीच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.
  • या निर्णयामुळे एबॉट, पिरामल, मॅक्सिऑड्स, सिप्ला आणि ल्यूपिन सारख्या घरगुती औषध निर्मात्या कंपनीच्या औषधांवर प्रभाव होणार आहे.
  • या औषधांचा भारतातील व्यवसाय ३८०० कोटी रूपयांचा आहे. भारताच्या फार्मा सेक्टरच्या तीन टक्के हा व्यवसाय आहे.
  • एफडीसीजवर बंदी घातल्यास देशातील १ लाख रुपयांच्या औषध बाजारात सुमारे २ टक्के म्हणजेच २००० कोटी रुपयांचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंडसारख्या अनेक देशांमध्ये एफडीसीवर बंदी आहे. भारतासह अन्य काही देशांमध्ये ही औषधे विकली जात आहे.
  • भारतातील पुद्दुचेरी हे असे एकमेव राज्य आहे, ज्या राज्याने या औषधावर बंदी घातली आहे.
  • देशात अजूनही अनेक इतर एफडीसी औषधे विकली जात आहेत. सरकार आणखी ५०० अशा औषधांवर बंदी आणण्याची शक्यता आहे.
  • प्रतिबंधित औषधे: डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल, विक्स ॲक्शन ५००, पेन किलर, कोरेक्स, जिंटाप, सुमो, जीरोडॉल, मधुमेह आणि हृदय रोगावरील औषधे.
एफडीसी म्हणजे काय?
  • दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रकार एकत्र करून जी औषधे तयार केली जातात त्यांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन अथवा एफडीसी म्हंटले जाते.
  • ही औषधे शक्तिशाली प्रतिजैविकांचे (अँटीबायोटिक्स) मिश्रण म्हणून बाजारात विकली जातात.
  • देशातील हजारो एफडीसी औषधे तयार केली जातात आणि त्यापैकी अनेक औषधे परवानगीशिवाय तयार केली जातात. यामध्ये मुख्यत्वे वेदनाशामक औषधांचा समावेश आहे.
  • मोठ्या प्रमाणात प्रतिजैविकांचा वापर शरीरासाठी धोकादायक आहे, त्यामुळे सरकारने या औषधांवर बंदी घातली आहे.
  • प्रतिजैविकंच्या अतिवापरामुळे चेतासंस्थेवर परिणाम होतो. तसेच ते यकृतासाठीही हानिकारक आहे. यामुळे ह्रदयविकाराचा धोकादेखील वाढतो.
पार्श्वभूमी
  • औषधनियंत्रक विभागाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत मार्च २०१६मध्ये अशा ३४३ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या औषधांवर बंदी घालण्यात आली होती.
  • मात्र या निर्णयाविरोधात औषध कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यानुसार दीड वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात घातलेली ही बंदी उठवण्यात आली.

प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (PM-AASHA) या नवीन एकीकृत योजनेला मंजुरी दिली आहे.
  • सरकारच्या शेतकरी कल्याण उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि अन्नदात्याप्रति कटिबद्धता लक्षात घेऊन या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
  • २०१८च्या अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य दर सुनिश्चित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • शेतमालाला हमीभावाएवढी किंमत हमखास मिळवून देणे व त्यायोगे शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२पर्यंत दुप्पट करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
पीएम-आशाचे घटक:
  • मूल्य समर्थन योजना
  • किमान मूल्य भरणा योजना
  • प्रायोगिक खासगी खरेदी आणि साठवणूक योजना
  • गहू, तांदूळ आणि अन्य धान्ये खरेदीसाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या, तसेच कापूस आणि ज्यूटसाठीच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सध्या सुरु असलेल्या योजना, शेतकऱ्यांना या पिकांसाठी किमान हमी भाव देण्यासाठी सुरु राहतील.
खर्च:
  • मंत्रिमंडळाने शेतमाल खरेदीच्या या नव्या पद्धतीस मंजुरी देताना केंद्र सरकारकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या हमी रकमेत १६,५५० कोटी रुपयांनी वाढ करण्याचाही निर्णय घेतला. त्यामुळे एकूण हमी रक्कम ४५,५५० कोटी रुपये झाली आहे.
  • शेतमाल खरेदीसाठीची अर्थसंकल्पीय तरतूदही वाढविण्यात आली असून या योजनेसाठी वेगळे १५,०५३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

हॉकीपटू सरदार सिंग निवृत्त

  • भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविणारा दिग्गज खेळाडू सरदार सिंग याने १२ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्ती जाहीर केली.
  • नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. या स्पर्धेत सरदारसिंगलाही आपली छाप पाडता आली नाही.
  • वय आता सरदार सिंगच्या बाजूने नाही. त्याचबरोबर हॉकीसाठी लागणारा वेगही आता तो राखू शकत नाही, म्हणूनही सरदारसिंग टीकेचा धनी ठरला होता. यामुळे त्याने अखेर निवृत्तीचा निर्णय घेतला.
  • सरदारसिंग...
  • २००६मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या लढतीद्वारे आंतरराष्ट्रीय हॉकीत पदार्पण केले.
  • ३५० आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • २००८ ते २०१६ असे ८ वर्षे भारतीय हॉकी संघाचा कर्णधार होता.
  • भारताचे नेतृत्व करणारा तो सर्वात युवा कर्णधार ठरला होता.
  • २०१२मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने, तर २०१५मध्ये पद्मश्रीने गौरविण्यात आले आहे.
  • दोन ऑलिंपिकमध्येही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • भारतीय वंशाच्या ब्रिटिश महिलेने सरदारवर बलात्काराचा आरोप केल्याने त्याच्या कारकिर्दीला वादाचे गालबोटही लागले होते. याप्रकरणी लुधियाना पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला क्लीन चिट दिली.

भारत आणि माल्टादरम्यान पर्यटन क्षेत्रासंबंधी सामंजस्य करार

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने पर्यटन क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी भारत आणि माल्टा यांच्यात सामंजस्य कराराला मंजुरी दिली. माल्टाच्या उपराष्ट्रपतींच्या आगामी दौऱ्यादरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील.
या सामंजस्य कराराची मुख्य उद्दिष्ट्ये:
  • उभय देशांदरम्यान पर्यटन उद्योगातील दर्जेदार ठिकाणांना प्रसिद्धी मिळवून देणे.
  • दोन्ही देशांमध्ये जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणे.
  • पर्यटनात मनुष्यबळ विकास तसेच दोन्ही देशातील प्रवाससंबंधी उद्योगांना प्रोत्साहित करणे.
  • नैसर्गिक तसेच मूर्त अथवा अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या माध्यमातून पर्यटन सादरीकरण करणे.
  • शाश्वत पर्यटन विकासासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे.
  • उभय देशांच्या जनतेमधील संबंध दृढ करण्याचा उपाय म्हणून पर्यटनाला मान्यता देणे.
या सामंजस्य कराराचे फायदे:
  • या करारामुळॆ पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा निर्माण करण्यात उभय देशांना मदत मिळेल.
  • यामुळे भारतात माल्टाहून येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या वाढवण्यात मदत होईल. त्यामुळे आर्थिक विकास आणि रोजगाराच्या संधीत वाढ होईल.
  • या करारामुळे सहकार्याच्या व्यापक क्षेत्रात सर्व संबंधितांच्या परस्पर लाभासाठी दीर्घकालीन पर्यंटन सहकार्यासाठी पूरक वातावरण तयार होईल.

क्रीडा पुरस्काराच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी न्या. मुदगल

  • न्यायमूर्ती मुकुल मुदगल यांची यावर्षीच्या द्रोणाचार्य व ध्यानचंद पुरस्काराच्या ११ सदस्यीय निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
  • समितीचे इतर सदस्य: समरेश जंग (राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक विजेता), अश्विनी पोनाप्पा (बॅडमिंटनपटू), जी. एस. संधू (माजी राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक), ए के बंसल (हॉकी प्रशिक्षक), संजीव सिंह (तिरंदाजी कोच)
पार्श्वभूमी
  • हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद या महान खेळाडूंच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृत्यर्थ प्रतिवर्षी २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो आणि यावेळी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरणही केले जाते.
  • परंतु यावर्षी २५ सप्टेंबर २०१८ रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातील. २ सप्टेंबरपर्यंत सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू व्यस्त असल्यामुळे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समारंभांची तारीख बदलण्यात आली आहे.
  • ध्यानचंद पुरस्कारः हा पुरस्कार खेळाडूला जीवनगौरव म्हणून, तसेच खेळाडूने कारकिर्दीतील किंवा निवृत्तीनंतर दिलेल्या क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी प्रदान करण्यात येतो.
  • द्रोणाचार्य पुरस्कार: गत ३ वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येतात. रोख ७५ हजार रूपये, मानपत्र व मानचिन्ह यांचा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
न्या. मुकुल मुदगल
  • ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश आहेत. सध्या ते फिफा गव्हर्नन्स समिती आणि पुनरावलोकन समितीचे उपाध्यक्ष आहेत.
  • यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने २०१३च्या आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांची नियुक्ती केली होती.

रेल्वे मंत्रालयाचे ‘रेल सहयोग’ वेब पोर्टल

  • रेल्वे मंत्रालयाने कॉर्पोरेट आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी ‘रेल सहयोग’ हे वेब पोर्टल सुरू केले आहे.
  • या पोर्टलमुळे कॉर्पोरेट आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडद्वारे (सीएसआर) रेल्वेला नवीन सेवा सुरू करण्यासाठी सहकार्य करू शकतात.
  • या पोर्टलमुळे सीएसआर निधीमधील कंपन्यांच्या योगदानामध्ये पारदर्शकता येईल. तसेच यामुळे कंपन्यांना रेल्वेसह मिळून काम करण्याची संधी मिळेल.
  • सीएसआर फंडामधून रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी विविध सुविधा पुरविल्या जातात.

नोमेडिक एलीफंट २०१८: भारत आणि मंगोलिया संयुक्त सैन्य अभ्यास

  • भारत आणि मंगोलिया यांच्यातील नोमेडिक एलीफंट २०१८ हा संयुक्त सैन्य अभ्यास मंगोलियाच्या राजधानी उलानबातर येथील ‘मंगोलियन आर्म्ड फोर्सेस फाइव हिल्स ट्रेनिंग एरिया’मध्ये सुरू झाला.
  • हा वार्षिक द्विपक्षीय सैन्य अभ्यास आहे. याची सुरुवात २००६मध्ये झाली. भारतीय आणि मंगोलियन सैन्यामधील भागीदारीला प्रोत्साहन देणे, हा या लष्करी प्रयोगाचा हेतू आहे.
  • नोमेडिक एलीफंट २०१८ ही नोमेडिक एलीफंट ची १३वी आवृत्ती आहे. या लष्करी अभ्यासाचे आयोजन १० ते २१ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे.
  • यामुळे दहशतवादविरोधी कारवायांमध्ये दोन्ही देशांच्या सैन्याच्या तांत्रिक आणि रणनीतिक क्षमतेमध्ये वाढ होईल.
  • या अभ्यासात भारतातून १७ पंजाब रेजिमेंट सहभागी होत आहे, तर मंगोलियाच्या ०८४ युनिटने भाग घेतला आहे.
  • या अभ्यासामध्ये दोन्ही सैन्य एकत्रितपणे योजना आखून तिची अंमलबजावणी करणार आहेत. याव्यतिरिक्त ते आपल्या अनुभव आणि कौशल्याचे आदान प्रदानही करतील.

अॅलिस्टर कूक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

  • इंग्लंडचा यशस्वी सलामीवीर आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कूक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
  • भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळून तो निवृत्त झाला. इग्लंडने हा सामना जिंकत ४-१ मालिका जिंकली.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काउंटी क्रिकेटमध्ये इसेक्सकडून मात्र तो यापुढेही खेळणार आहे.
कूकची कारकीर्द
  • कूक हा इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा आणि सर्वाधिक कसोटी धावा करणारा क्रिकेटपटू आहे.
  • २००६मध्ये कूकने भारताविरुद्धच्या नागपूर कसोटीत पदार्पण केले होते. त्याने सर्वाधिक ५९ कसोटी सामन्यांत इंग्लंड संघाचे नेतृत्व केले आहे.
  • १६१ कसोटी सामन्यांमध्ये त्याने १२,४७२ धावा केल्या असून, यात ५ द्विशतक, ३३ शतक आणि ५७ अर्धशाकांचा समावेश आहे.
  • कसोटी क्रिकेटमध्ये सलग १५९ सामने खेळण्याचा विश्वविक्रम अॅलिस्टर कूकच्या नावावर आहे.
  • कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जगातील फलंदाजांच्या यादीमध्ये तो सहाव्या क्रमांकावर आहे.
  • अॅलिस्टर कूक २०१४साली एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्याने ९२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३,२०४ धावा केल्या आहेत. यात १९ अर्धशतक आणि ५ शतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने ४ टी-२० सामन्यांमध्ये ६१ धावा केल्या आहेत.
  • कसोटी पदार्पणात आणि कारकीर्दीच्या शेवटच्या सामन्यात शतक झळकावण्याची किमया कूकने साधली. ही दोन्ही शतके त्याने भारताविरुद्ध केली.
  • असा पराक्रम करणारा तो इंग्लंडचा पहिला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवा फलंदाज ठरला आहे.
  • भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, ग्रेग चॅपेल, विल्यम पॉन्सफोर्ड आणि रेगिनॉल्ड डफ हे असा पराक्रम करणारे फलंदाज आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा